राज्यातील ३२ जिल्ह्यांतल्या १०६ नगरपंचायतींचे आणि दोन जिल्हापरिषदांच्या निवडणुकांचे निकाल बुधवारी आणि गुरुवारी आले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आणि पक्षीय आघाड्यांची नवी रचना झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्था असोत वा अन्य कोणतीही सत्तास्थाने इथला प्रत्येक निकाल हा राज्यस्तरावरच्या राजकारणावर परिणाम करणारा असतो. त्यामुळे वरकरणी यात महाविकास आघाडीचे संख्याबळ जास्त दिसत असले, तरी सरशी भाजपचीच झालेली आहे. भाजपचे संख्याबळ वाढलेले आहे. त्यामुळे एकाकी लढूनही आणि ग्रामीण भागावर शहरी चेहºयाचा हा पक्ष पकड घेत असेल, तर महाविकास आघाडीला तो आगामी निवडणुकांसाठी इशारा आहे.
खरंतर क्वचितच ग्रामपंचायतींच्या प्रत्येक जागेकडे वा परिषदांच्या गटांकडे इतक्या बारकाईने बघितले गेले असेल. किंबहुना यापूर्वी नगरपंचायती, ग्रामंचायतींचे निकाल राज्य पातळीवर कोणी गांभीर्याने घेत नव्हते. स्थानिक निवडणुका म्हणूनच त्याकडे पाहिले जात होते. तिथे पक्षापेक्षा स्थानिक राजकारण आणि व्यक्तिमत्वाला महत्त्व होते. त्यामुळे त्याची फारशी चर्चा माध्यमांतूनही नव्हती, पण आता हे चित्र बदलले आहे. प्रत्येक पक्षाला मुळापासून पाय रोवायचे असल्यामुळे ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. पूर्वी ग्रामीण भाग म्हणजे काँग्रेस हे समीकरण होते. साखर कारखानदारीचा आणि शेतीचा संबंध त्याच्याशी होता, पण आता भाजप आणि शिवसेनेसारखे मुळचे शहरी चेहरे असलेले पक्ष ग्रामीण भागात रुजत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ एकत्रित मोठे दिसत असले, तरी ती सूज आहे असेच म्हणावे लागेल.
या निवडणुकांतील एकूण जागा जर पाहिल्या, तर अठराशेहून अधिक जागांसाठी या निवडणुकांत मतदान झाले. या निवडणुका यासाठीही महत्त्वाच्या ठरल्या, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण जिथून गेले त्या जागांवर खुल्या प्रवर्गातून मतदान झाले. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर परिणाम करणाºया प्रश्नावर पुढची लढाई न्यायालयात अद्याप सुरू आहे, पण या निवडणुका आरक्षणाविना घ्याव्या लागल्या. म्हणूनही या निवडणुकांकडे लक्ष होते, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवर, गावातल्या पायवाटांवर राजकीय चित्र कसे आहे हे या निवडणुकांमधून समजणार होते. गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये असे दिसले होते की, महाविकास आघाडीच्या रचनेनंतर या आघाडीतल्या पक्षांना एकमेकांच्या मतांच्या देवाण-घेवाणीचा फायदा झाला आणि भाजपला तोटा झाला. शिवसेनेकडे गेलेल्या ग्रामपंचायती सगळ्यांत जास्त होत्या. बहुतांश तसेच चित्र याही निवडणुकांत दिसते आहे. जवळपास सर्व पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी त्यांचे भाग राखले आहेत, काहींना धक्केही मिळाले आहेत, पण एकत्र पक्षीय बलाबल पाहिले, तर भाजपचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आले आहेत, पण गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांच्या हातून काही नगरपंचायती सुटल्या आहेत, हेही नाकारता येणार नाही.
एकएकटे पक्ष म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तीनही पक्ष भाजपच्या मागे राहिले आहेत, पण महाविकास आघाडी म्हणून बघितल्यास एकत्र संख्या मोठी आहे. त्यामुळे आघाडीचा एकत्रित फायदा होऊन ते भाजपवर वरचढ ठरताहेत, हे चित्र याही निवडणुकीत नगरपंचायतींच्या पातळीवर राहिले आहे, पण हा फुगवटा आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील पक्ष आणि कार्यकर्ते एकमेकांशी जमवून घेतातच असे नाही. फक्त ती एक सोय आहे. सर्वप्रथम बुधवारी १६४९ जागांचे निकाल आले आहेत ते पाहता पाहता महाविकास आघाडीला एकत्र मिळून भाजपला मागे टाकण्यात यश आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना एकत्र मिळून ६७ नगरपंचायतींवर ताबा मिळवता आला आहे आणि त्यांच्याकडे ९४४ जागा आल्या आहेत. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत त्या वाढल्या आहेत. आघाडीमध्ये आणि राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादीला या निवडणुकांत सगळ्यांत जास्त फायदा झाला आहे. भाजपच्या खालोखाल त्यांचे ३४४ सदस्य निवडून आलेत, तर २५ नगरपंचायतींवर त्यांचे वर्चस्व असेल. हा कौल एकच सांगतो की, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वरचढ होण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमधील आपले वर्चस्व कायमच राष्ट्रवादीने दाखवून दिले आहे. त्याचा पुरेपूर फायदा उठवत हा पक्ष आता एक नंबरकडेच जाण्याचे आणि एकहाती सत्ता आणण्यासाठी भविष्यात मित्र पक्षांचाही बळी दिल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट होत आहे. यात काँग्रेसचे खच्चीकरण पूर्णपणे झालेले आहे. याचे कारण काँग्रेसच्या जवळपास ११० जागा कमी झालेल्या आहेत. त्यामुळे यात भाजपचा पराभव किंवा नुकसान झाले म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचेच अधिक नुकसान करण्याचे धोरण राबवल्याचे दिसते.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना तेथे सगळ्यात जास्त यश म्हणजे १०१ जागा मिळाल्या आहेत. गेल्या वेळेस त्यांच्याकडून सुटून भाजपकडे गेलेल्या नगरपंचायतीही त्यांनी परत मिळवल्या आहेत. त्यामुळे यंदा महाविकास आघाडीत जास्त फायदा हा राष्ट्रवादीला झाला आहे. शिवसेना आणि काँग्रेसला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये यश मिळाले आहे. शिवसेनेला एकूण २८४ तर काँग्रेसला एकूण ३१६ जागा राज्यभरात मिळाल्या आहेत. सेनेला कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांची आघाडी टिकवता आली आहे. कोकणात सेनेकडे सर्वाधिक ९१ सदस्य असतील, पण एकूण जर आकडा बघितला तर सेनेकडे सर्वांत कमी म्हणजे १४ नगरपंचायती असणार आहेत. काँग्रेसला महाराष्ट्रभर अशी लक्षणीय कामगिरी करता आली नाही आहे, पण विदर्भात जो भाजपचाही बालेकिल्ला आहे, तिथे त्यांनी भाजपला मोठी मात दिली आहे. विदर्भात भाजपच्या १२३ तर काँग्रेसच्या १६१ जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले विदर्भातून येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. काही काळापूर्वी झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसची सरशी झाली होती. त्यामुळे विदर्भ हा त्यांचा पूर्वीचा गड काँग्रेस परत मिळवते आहे असे चित्र आहे.
हे सगळे असले, तरीही आजच्या आकड्यांवरून हे स्पष्ट आहे की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष सदस्यसंख्येकडे पाहता सिद्ध झाले आहे. भाजपचे मोजणी झालेल्या जागांपैकी ३८४ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आघाडी नसेल तर भाजप आजही सर्वात जास्त ताकद असलेला पक्ष आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भाजपच्या २४ नगरपंचायती आता असतील. मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत, पण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात, जिथे त्यांची ताकद आहे, तिथे त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही, पण मराठवाड्यात भाजपला बीड सारख्या चुरशीच्या लढतींमध्ये यश मिळाले आहे.
आता राज्यात नजीकच्या काळात महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. विविध राजकीय घडामोडींनी वातावरण गेल्या काही काळात तापले आहे. या निकालांमध्ये याचे प्रतिबिंब कसे दिसते हे यावरून स्पष्ट होत आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा