गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

संयमी अभिनेत्री फय्याज


मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांमधून गेली पाच दशके सातत्याने प्रेक्षकांना दर्शन देणाºया एक संयमी अभिनेत्री म्हणजे फय्याज. आज फय्याज यांचा जन्मदिवस आहे. अभिनयाच्या बाबतीत कसलीही मर्यादा स्वत:ला न घालून घेता सहजपणे वावरणाºया या अभिनेत्रीचे नाव फय्याज इमाम शेख असे आहे. फय्याज यांचा जन्म सोलापूर येथे झाला. सोलापुरात असताना त्या कला पथकात केवळ नृत्य सादर करीत असत. त्यानंतर त्या हौशी रंगभूमीवर आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकात झरिनाची भूमिका केली आणि त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. तिथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.


१९६६पासून फय्याजनी मराठी नाटकांत कामे करण्यास सुरुवात केली. सोलापूरमध्ये आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात करणाºया फय्याज यांनी गीत गायिले आसवांनी या नाट्यसंपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाट्यसृष्टीत पदार्पण केले. तिथून रंगभूमीला एक नवी दमदार अभिनेत्री मिळाली. नृत्य, गायन, अभिनय असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व त्यांनी उभे केले.

फय्याज यांनी गद्य नाटके, संगीत नाटके, पार्श्वगायन, काव्यवाचन, संगीत शिक्षण, हिंदी-मराठी चित्रपट, मराठी मालिका, हिंदी मालिका अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. गेली अनेक वर्षे अविरतपणे मराठी रंगभूमीची त्या मनोभावे सेवा करीत आहेत. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ कारकीर्द करणाºया नाट्यकलावंतांला मिळणारे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, पण त्यांची संयमी आणि साधेपणाची छाप मात्र प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत अशी आहे.


फय्याज यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्या कोणत्याही एका पठडीत अडकून पडल्या नाहीत. कसल्याही मर्यादा त्यांना नव्हत्या हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या गाण्यातही त्यांनी गझल, ठुमरी, लावणी, नाट्यसंगीत असा चौफेर प्रवास केला आहे. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाट्य-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनऊला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही, मात्र जेव्हा जेव्हा बेगम अख्तर मुंबईत येते, तेव्हा तेव्हा त्या फय्याज यांना गाणे शिकवीत.

अश्रूंची झाली फुले, कट्यार काळजात घुसली, वीज म्हणाली धरतीला, मत्स्यगंधा, होनाजी बाळा, तुझे आहे तुजपाशी, वेड्याचे घर उन्हात, वेगळे व्हायचेय मला, गुंतता हृदय हेही कौटुंबिक, संगीतप्रधान, मेलोड्रॅमॅटीक नाटके त्यांनी केलीच, पण पेइंग गेस्ट सारख्या विनोदी आणि फार्सिकल नाटकातही त्यांनी विक्रम गोखले यांच्याबरोबर जी बाजी मारली ती कायम लक्षात राहणारी आहे. अगदी अलीकडच्या मित्रपर्यंतच्या नाटकांत फय्याज यांच्या भूमिका आहेत. कट्यारमधील झरिना तसेच वीज म्हणाली धरतीलातील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली आहे. गुंतता हृदय हेमध्ये कल्याणी साकारणा‍ºया फय्याज यांनी महानंदा चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. जयवंत दळवींच्या महानंदा कादंबरीवर हे गुंतता हृदय हे नाटक शन्ना नवरे यांनी लिहिले. पुढे जयवंत दळवींच्या याच कादंबरीवर महानंदा हा चित्रपट आला. विक्रम गोखले, शशिकला असे दणदणीत कलाकार असलेल्या या चित्रपटात लक्षात राहतो तो फय्याज यांचा अभिनय. यातील शांताबार्इंनी लिहिलेले मागे उभा मंगेश हे गाणे आणि चित्रपटाचा संपूर्ण अंमल शिल्लक राहतो.


विशेष म्हणजे फय्याज यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजामध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे. याशिवाय दादा कोंडके यांच्या विच्छा माझी पुरी करामध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. याशिवाय सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पंडित सी. आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फय्याज यांना पंडित जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी वटवटमध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या-नव्या सर्वच पिढ्यांमध्ये सहजपणे मिसळणाºया फय्याज कायम अजातशत्रू राहिल्या. २०१०सालच्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन फय्याज यांच्या हस्ते झाले होते. एक उनाड दिवस, दायरे, पैंजण, महानंदा, वजीर, या हिंदी-मराठी चित्रपटांत फय्याज यांनी काम केले आहे. याशिवाय पंचवीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या पैलतीर या मालिकेत माधव वाटवे आणि त्यांनी केलेली भूमिका फार सुंदर होती. २०१५ साली झालेल्या ९५व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्या रंगभूमीशी कायम प्रामाणिक राहिल्याचे दिसते. एखादी भूमिका स्वीकारताना त्या भूमिकेची लांबी रुंदी मोजण्याचे काम न करता नाटकाची गरज नेमकी काय आहे याचा विचार करून त्या अभिनयावर लक्ष केंद्रित करत असत. त्यामुळेच हा संयम म्हणजे फार मोठा समंजसपणा होता. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा.

बिटवीन द लाईन्स/ प्रफुल्ल फडके


9152448055\

5/1/2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: