आचार्य ओशो रजनीश हे एक फार मोठे अजब रसायन होते. आपल्या तत्वज्ञानाने संपूर्ण जगाला झपाटून टाकण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा चमत्कारच होता. अशा आचार्य रजनीश यांचा आज स्मृतिदिन आहे. आचार्य रजनीश यांचे मूळचे नाव हे चंद्र मोहन जैन असे होते. १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यानंतर १९७० व १९८०च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाऊ लागले. आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते. रजनीश ते ओशो हा त्यांचा प्रवास झपाटून टाकणारा आहे.
तत्वज्ञानाचे प्राध्यापक असणाºया ओशोंनी १९६०च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकते संबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये ‘सेक्स गुरू’ अशी उपाधी मिळाली. १९७० मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले. शिष्य जमविण्यास, नवसंन्यासी आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. या काळात अनेक मान्यवर कलाकारही त्यांचे शिष्य बनले होते. अगदी कारकिर्दीत यशाच्या शिखरावर जात असताना विनोद खन्नाने रजनीश यांच्यासाठी संन्यास घेतला होता.
आचार्य रजनीश यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४ मध्ये त्यांनी आश्रम स्थापन केला. अनेक पाश्चात्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेंटवर आधारलेल्या उपचार पद्धती पाश्चात्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यत: मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते.
१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. आॅरेगॉन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्युनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या. १९८५ मध्ये कम्युनच्या नेतृत्वाने जैव दहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ओशोंनी उघड केल्यावर आॅरेगॉन कम्युन कोसळले. लवकरच ओशोंना अटक झाली आणि देशागमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादादरम्यानच्या तडजोडीनुसार ओशोंना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि जगभ्रमंतीनंतर ते पुण्यात आले. १९९० मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. आज त्यांचा आश्रम ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र म्हणून ओळखला जातो. ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितीशील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे याबाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते. पाश्चात्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेलीच दिसते आहे.
अठ्ठावीस आॅगस्ट १९६८ला मुंबईच्या भारतीय विद्या भवन सभागृहात ‘प्रेम’ या विषयावरील पाच व्याख्यानांच्या मालिकेतील पहिले व्याख्यान ओशोंनी दिले. लैंगिक ऊर्जेच्या रूपांतरणातूनच प्रेम आणि ध्यान निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले. लोकांमधून या मतावर संतप्त प्रतिक्रिया आल्या. आयोजकांनी व्याख्यानमाला रद्द केली. बरोबर एका महिन्यानंतर मुंबईतच गवालिया टँक मैदानावर प्रचंड श्रोता समुदायासमोर ओशोंनी व्याख्याने देऊन मालिका पूर्ण केली. नंतर संभोगातून समाधीकडे या नावाने प्रकाशित झालेल्या या व्याख्यानमालेमुळे भारतीय माध्यमांनी ओशोंना सेक्स गुरू अशी उपाधी दिली.
त्यानंतर १९६९ मध्ये झालेल्या दुसºया जागतिक हिंदू परिषदेत त्यांनी धर्मगुरूंवर स्वार्थीपणाचा आरोप केला आणि ‘धर्म म्हणजे जीवनाचा आस्वाद कसा लुटावा हे शिकवणारी कला आहे’, असे मत मांडले. त्यांच्या भाषणादरम्यान संतप्त झालेल्या पुरीच्या शंकराचार्यांनी भाषण थांबविण्याचा असफल प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा १९७० मधील एका वसंतकालीन ध्यान शिबिरात ओशोंनी डायनॅमिक मेडिटेशन पद्धत प्रथम सादर केली. जूनच्या अखेरीस मुंबई सोडून ते जबलपूरला निघाले. सव्वीस सप्टेंबर १९७० रोजी त्यांनी नवसंन्यासींचा पहिला गट स्थापन केला.
ओशोंचे शिष्य अर्थात्ा नवसंन्यासी होणे याचा अर्थ नवे नाव स्वीकारणे, विरागी हिंदू साधूंप्रमाणे नारिंगी वस्त्रे परिधान करणे असा होता. वैराग्यापेक्षा उत्सवपूर्ण जीवनशैली स्वीकारण्यास या नवसंन्यासींना प्रोत्साहन दिले जाई. स्वत: संन्याशाची पूजा होणे अभिप्रेत नव्हते, तर फुलाला उमलण्यास उत्तेजन देणारा सूर्य अशी भूमिका त्याने बजवावयाची होती. अर्थात ओशोंची कारकीर्द कितीही वादग्रस्त असली तरी जीवनाचे, जगण्याचे खरे ज्ञान त्यांना समजले होते. धर्म म्हणजे नेमके काय हे त्यांनी ओळखले होते. सर्व धर्मांचे तत्वज्ञान ते कोळून प्यायले होते आणि खरा धर्म शास्त्र, पुराणे, वेद वगैरे काय आहे हे त्यांनी जाणले होते. त्यामुळेच त्यांचे येणारे तत्वज्ञान हे अत्यंत साधेसोपेपणाने दाखले देत समोर येत असे. तो एक चमत्कारच होता.
- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\
19/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा