शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

स्वरातून आनंद देणारे रामदास कामत


व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कलाकार रामदास कामत यांचे नुकतेच निधन झाले. संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेल्या रामदास कामत यांची गायकी ही तत्कालीन गायकांपेक्षा वेगळी आणि लक्षात राहणारी अशीच होती. अर्थात त्यांनी आपला ठसा केवळ नाट्यसंगीतावरच नव्हे, तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही तेवढ्याच समर्थपणे उमटविला होता, हे त्यांचे खास वैशिष्ठ आहे. रंगभूमीवर काम करणारे गायक अभिनेते असूनही एका पठडीत स्वत:ला अडकवून न ठेवता सतत नाविन्याचा शोध घेणारी त्यांची गाण्याची पद्धती होती, म्हणूनच त्यांची गाणी आज इतक्या वर्षांनंतरही रसिकांच्या स्मरणात आणि ओठांवर आहेत. त्यांच्या स्वरांमधून श्रोत्यांना कायम आनंद मिळत असे, असे ते गायक होते.


खरंतर रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. अर्थात आपल्याकडे कलाकार आणि खेळाडू यांचे मूळ स्थान गोवा आणि कर्मभूमी मुंबई, महाराष्ट्र हे यशाचे समीकरण झालेले आहे; पण मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत यांनी लहानपणापासून वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते, तर यशवंत देवांकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत संशय कल्लोळ या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती.

मला आठवतं १९८१ मध्ये सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या खुल्या रंगमंचावर त्यांच्या संशय कल्लोळ या नाटकाचा प्रयोग होता. शरद तळवलकर फाल्गुनरावच्या भूमिकेत होते. खूप वर्षांनी संगीत नाटकाचा प्रयोग सातारला आल्यामुळे तुफान गर्दी झाली होती, प्रयोग हाऊस फुल होता. पण यामध्ये शरद तळवलकर यांच्या विनोदासाठी आलेला तरुण वर्ग होता. शरद तळवलकरांची एंट्री झाल्यापासून प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या आणि हशा यायला लागला. प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला होता; पण हे संगीत नाटक आहे. गाणी सुरू झाल्यावर काय होणार, असा अनेकांना त्यावेळी प्रश्न पडला. गोविंदराव बेहरे हा प्रयोग घेऊन आले होते. रामदास कामतांना कसा प्रतिसाद मिळतो?, हा संगीत नाटकाचा प्रेक्षक वाटत नाही, अशी त्यांची आणि काँट्रॅक्टर केसी धोका यांच्यात चर्चा चालू होती; पण काय आश्चर्य रामदास कामतांची एंट्री झाल्यावर त्यांनी पहिले पद सादर केले आणि एकदम पिनड्रॉप सायलेन्स. प्रेक्षक कान देऊन एकेक तान ऐकत होते. माना डोलावत होते, खूश होत होते. त्याच प्रेक्षकांमधून त्या गाण्याला वन्स मोअर मिळाला. शरद तळवलकरांनी हसत-हसत घ्या घ्या वन्स मोअर घ्या म्हटले आणि तितक्याच ताकदीने त्यांनी ते पद म्हटले. यामध्ये प्रयोगाचा कालावधी एवढा वाढला की, त्यांना जायला उशीर झाला. ते काही तरी एअर इंडियात त्यावेळी नोकरी करत होते आणि त्यांना सकाळी लवकर पोहोचायचे होते; पण त्याही अवस्थेत ते प्रयोग संपवून गेले आणि कामावरही पोहोचले. ही त्यांची संगीत, कला, प्रेक्षक आणि नोकरी याठिकाणी असलेली आत्मियता फार महत्त्वाची होती.


कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले; पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते, तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल, तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत. १९६४साली आलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक 'ययाती देवयानी' आले आणि 'सर्वात्मका सर्वेश्वरा...' ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे 'धन्य ते गायनी कळा', 'मीरामधुरा', 'हे बंध रेशमाचे' अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली.

याशिवाय रामदास कामत यांनी एकच प्याला, कान्होपात्रा, धन्य ते गायनी कळा, मदनाची मंजिरी, मानापमान, मीरा मधुरा, मृच्छकटिक, शारदा, संन्याशाचा संसार, सौभद्र, स्वरसम्राज्ञी, होनाजी बाळा आदी संगीत नाटकांतून कामे केली. ही सर्व नाटके आणि त्यातील गाणी गाजली; पण त्यातही मत्स्यगंधा व ययाति आणि देवयानी या नाटकांनी त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. मत्स्यगंधा नाटकात त्यांनी पराशर तर ययाति आणि देवयानी नाटकात कच या भूमिका साकारल्या. मत्स्यगंधा या नाटकांतील गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी, देवाघरचे ज्ञात कुणाला, नको विसरू संकेत मीलनाचा, साद देती हिमशिखरे ही गाणी प्रचंड गाजली, तसेच तम निशेचा सरला, प्रेम वरदान स्मरत राहा ही ययाति आणि देवयानी या नाटाकातील गाणीही तुफान गाजली.


याशिवाय रामदास कामत यांनी गायलेली अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे, जन विजन झाले, बहुत दिनी नच भेटलो सुंदरीला, श्रीरंगा कमला कांता ही गाणीही रसिकांच्या स्मरणात आहेत.

सर्वात लोकप्रिय झालेले, म्हणजे मुंबईचा जावई या चित्रपटासाठी त्यांनी गायलेल्या प्रथम तुज पाहता जीव वेडावला या गाण्याची लोकप्रियता आजही तसूभर कमी झालेली नाही. ते गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहे. कामत यांनी नाट्यसंगीतासह भावगीते, चित्रपट गीतेही गायली आहेत. एचएमव्ही कंपनीने त्यांच्या ६५ गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका आणल्या आहेत. मत्स्यगंधा नाटकातील देवाघरचे ज्ञात कुणाला हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली आकाशी फुलला चांदण्यांचा मळा, देवा तुझा मी सोनार, निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, वाटे भल्या पहाटे यावे, हे आदिमा हे अंतिमा, विनायका हो सिद्ध गणेशा, हे गणनायक सिद्धिविनायक, हे शिवशंकर गिरिजा तनया आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत, तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे; पण अत्यंत सरळमार्गी, सभ्यता पाळणारे आणि आपली कामगिरी चोख बजावणारे, असे गायक कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. वयोमानानुसार पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे साधारण १९९७ साली त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली; पण त्यांची गाणी मात्र कधीही निवृत्त होणार नाहीत. अशा या रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

10/1/2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: