गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

दुष्टचक्र थांबवा


ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरामध्ये कोविड त्सुनामी अवतरण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच व्यक्त केली आहे. आतापर्यंत युरोप, अमेरिकेत नवे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले होते. तेथे आता कोरोना संसर्गाचे पूर्वीचे सारे विक्रम मोडीत निघाले आहेत आणि भारतामध्येही बघता-बघता गेल्या आठवड्याभरात रुग्णसंख्या कैक पटींनी वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आणि मुंबई, पुण्यातील होत असलेली ही रुग्णवाढ भीती निर्माण करणारी आहे. दिल्ली, मुंबईसह बहुतेक सर्व बड्या शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्याही पुन्हा एकवार फार मोठी उसळी घेताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का, या चिंतेत संपूर्ण महाराष्ट्र आहे. सातत्याने या दुष्टचक्रात आपण अडकत आहोत ते थांबवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

कोरोनाच्या या नव्या प्रकोपाची खबरदारी म्हणून बहुतेक राज्यांच्या सरकारांनी तातडीने कडक निर्बंध लागू केले. दिल्ली सरकारने ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लॅन लागू करून सार्वजनिक उपस्थितीवर कडक निर्बंध घातले. मुंबईत तर महाराष्ट्र सरकारने येत्या १५ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू करून नववर्ष रजनींवर बंदी घातली होती.


अर्थात एवढे निर्बंध घालूनही अनेक लोक बिचवर, रेसॉर्ट, हॉटेलवर गर्दी करण्यास गेले ही खेदाची बाब म्हणावी लागेल. लॉकडाऊनमुळे कामधंदा थांबता कामा नये, पण चैनीला, मौजमजेला आपण लगाम घालू शकतो. खरंतर कोरोनाच्या दुसºया लाटेमध्ये सगळीकडे हाहाकार माजला होता. अनेक कुटुंबे बाधित झाली. कित्येकांचा प्राणवायूविना तडफडून बळी गेला. त्या सगळ्या कटू आठवणी पुन्हा जाग्या होऊ नयेत, यासाठी सरकारने अधिक सक्रियता दाखवण्याची आवश्यकता आहे. रस्तामार्गे राज्यात येणाºया पर्यटकांना व परप्रांतीयांना कोविड लसीकरणाचा पुरावा सीमांवर दाखवावा लागतो आहे, परंतु ती सरकारची नव्हे, तर उच्च न्यायालयाची कृपा आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी हेच वास्तव बोलून दाखवले आहे. आज दीड हजारांपेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण देशात आहेत. महाराष्ट्रात साडेचारशेपेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. ओमिक्रॉन रुग्ण खूप वेगाने हा रोग पसरवत आहेत. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आदी सर्व शहरांमध्ये कोरोना रुग्णसंसर्ग फार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. १५ दिवसांपूर्वी २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदवली असताना, आता पुन्हा २५ हजारांच्या घरात रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने या महिनाअखेर २ लाख रुग्ण आढळतील, अशी शंका व्यक्त केली आहे. हे सगळे वातावरण अत्यंत भयावह असेच आहे.

कोरोना फैलाव होत असूनही राजकीय पक्षांना निवडणुका आणि मोठमोठ्या प्रचारसभा हव्या आहेत, याचे आश्चर्य वाटते. निवडणुकांचा प्रचार, नववर्ष सोहळे, लग्नसराई आणि पर्यटन यांच्यापोटी जनतेचे प्राण धोक्यात येणार नाहीत ना?, सरकारने आणखी वेळ काढू नये. डब्ल्यूएचओने रात्रीची संचारबंदी काही कामाची नसल्याचे म्हटले असले, तरी आपल्याला गर्दी कमी करण्याचे नियोजन करावे लागेल. जमावबंदीसारखे कठोर उपाय तातडीने योजावेत आणि नववर्षात येऊ घातलेल्या संकटाला वेळीच अटकाव करावा. पुन्हा एकवार आपली हलगर्जी दाखवू नये! हा हलगर्जीपणा २०२२ च्या सुरुवातीलाच झाला, तर पुन्हा हे वर्षही चिंतेचे जाणार का, असा प्रश्न उद्भवतो. मुंबई-पुण्यातील रुग्णवाढ ही उचभ्रू सुशिक्षित वस्तीतील आहे. त्यांच्याकडूनही जर निष्काळजीपणा होत असेल, तर या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे अवघड होईल. पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकायला लागेल. हे थांबले पाहिजे.


या भीतीच्या वातावरणात आपण किती काळ जगणार आहोत? शाळा सुरू होऊन १५ दिवस नाही होत, तोवर त्या पुन्हा बंद करण्याची चर्चा होते. राज्यातल्या २० आमदार, १० मंत्र्यांना कोरोनाची लागण होते. खरंतर हेच लोक गर्दीत असणार आहेत. त्यामुळे ते सुपरस्प्रेडर आहेत. नाशिकमध्ये एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात हजारोंची गर्दी जमली होती, तिथे मास्कचे भान कुणीही ठेवलेले नव्हते. एकमेकांवर टीका टिप्पणी करताना, कुरघोड्या करताना या रोगाचा वापर होत आहे, हे चुकीचे आहे. आरोग्य व्यवस्था २४ तास सुरू ठेवण्याचे केंद्र सरकारचे राज्य सरकारला आदेश आहेत. लसीचा पुरवठा भरपूर आहे, तरीही एक विशिष्ट वर्ग लसीकरण करत नाही. हा वर्ग कसलीच लस घेत नाही. पोलिओलाही त्यांनी विरोध केला होता. हा वर्ग गर्दीत मिसळणारा, व्यापार करणारा असतो. त्यांच्यामार्फत या रोगाचा फैलाव होण्याची भीती असते. त्यामुळे हा बेजबाबदारपणा रोखण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

कोणी म्हणते तिसरी लाट नाही, कोणी म्हणते तिसरी लाट सुरू झालेली आहे, अशी विसंगत मते राजकारण्यांकडून व्यक्त होताना दिसत आहेत. हा उथळपणा थांबवून राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्ये केली पाहिजेत. जनतेच्या मनातील भीती काढून टाकत या संकटाला सामोरे जायचे आहे. आता तिसºया लाटेची सुरुवात आहे. ही लाट २ महिने जरी राहिली, तरी अजून २ महिन्यांनी १८ महापालिकांच्या निवडणुका होतील, असे संकेत मिळाले आहेत. अशा परिस्थितीत निवडणुका घेतल्या, तर काय वातावरण तयार होईल? घराघरात विकास पोहोचण्याऐवजी घराघरात कोरोना पोहोचेल, अशी परिस्थिती आज आहे. हे सगळे थांबवले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: