मराठी रंगभूमीवर जे अजरामर असे कलाकार होउन गेले त्यापैकी एक कलाकार म्हणजे सतीश दुभाषी. अवघ्या 41 व्या वर्षी म्हणजे 12 सप्टेंबर 1980 ला त्याचे निधन झाले. पण त्याने आपल्या अल्पशा काळात रंगभूमीवर काम केले ते लक्षात राहणारे असेच होते. सतीश दुभाषीच्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीसाठी प्रेक्षक पुन्हा पुन्हा नाटकाचा प्रयोग पहात होते. विशेषत: सतीश दुभाषी ज्या दिग्गज कलाकाराबरोबर असायचा त्याच्यासोबत त्याची सहज अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळणे हा आनंद होता. आज सतीश दुभाषीचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्याच्या काही कारकीर्दीवरून नजर मारणे हा ही आनंद आहे.
आजच्या पिढीला सतीश दुभाषी माहिती नसेल, कदाचित. पण विविध वाहिन्यांवरून कधीतरी एखादा जुना चित्रपट लागतो आणि त्यात तो कलाकार दिसतो. बाळा गाउ कशी अंगाई, सिंहसन, चांदोबा चांदोबा भागलास का असा एखादा चित्रपट दिसला की नव्या पिढीतले लोक विचारतात कोण आहे हा नट? मस्त काम केलेय. विशेषत: सिंहासनमधील डिकास्टा पाहिल्यावर नव्या पिढीची हीच प्रतिक्रीया येते. कारण अरूण सरनाईक, दत्ता भट, श्रीराम लागू, नीळू फुले यांच्यात अल्पसा वाव मिळूनही डिकास्टा लक्षात राहतो तो सतीश दुभाषींमुळेच. आज सतीष दुभाषी म्हणजे चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. अल्पशः आजारानंतर त्यांचे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले, एवढेच लोकांना माहिती आहे. पण त्यानी जे 1970 चे दशक गाजवले आहे त्याबाबत अनेकांना माहिती नाही.पुरूषोत्तम दारव्हेकरांची अबोल झाली सतारमधील अपघातात हात तुटल्यामुळे सतार वाजवू न शकणार्या कलाकाराची तगमग भयानक होती. सतीष दुभाषींचा मृत्यू 1980 च्या दशकात झाला होता. त्यावेळी व्हिडीओ चित्रिकरणाचा शोधही नव्हता. त्यामुळे त्यांची नाटके पहायला मिळत नाहीत. पण पुरूषोत्तम दारव्हेकर, पु. ल. देशपांडे, शंन्ना नवरे, वसंत कानेटकर यांच्या शब्दांना आणि नाटकांना न्याय देणारा कलावंत अशीच सतीष दुभाषींची ओळख होती.
त्यांची अंमलदार, सूर राहू दे, आनंद ही नाटके खूप गाजली आहेत. यातील आनंद म्हणजे राजेशखन्नाचा गाजलेला आनंद हा सिनेमा. तेच कथानक असलेले हे नाटक तितक्याच ताकदीने रंगभूमीवर गाजले हे अनेकांना माहितीही नसेल.
कन्या सासुरासी जाये, कोंडी, चक्रव्यूह या नाटकांचेही शेकडो प्रयोग झाले. पण त्यांचे तुफान गाजले ते नाटक म्हणजे पु. ल. देशपांडे यांचे ती फुलराणी. सगळ्या चांगल्या गोष्टींची ही जुगलबंदी होती. त्यामुळे हे नाटक नक्की कोणाचे हे सांगणेही कठीण. पु. ल. देशपांडे यांचे शब्द. भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आव्हान वाटावे अशी संहिता. मूळच्या पिग्मिलियनच्या नाटकाचा मराठीतील अस्सल रूपांतर. भक्ती बर्वेचा टायटल रोल. यात कमाल केली ती सतीष दुभाषींनी. भक्ती बर्वे आणि सतीष दुभाषी हे दोघे इतके बेभान होउन हे नाटक करायचे की त्या आनंदात प्रेक्षक अक्षरश: डुंबायचे. पुन्हापुन्हा ते नाटक लोक पहात होते. भक्ती बर्वे आणि सतीष दुभाषी यांचेच लग्न होेणार म्हणून प्रेक्षकही त्या बातमीची वाट पहायचे, इतके लोकांना ते मेड फॉर इच आदर वाटायचे. पण त्यांच्या लग्नाची बातमी आलीच नाही, आली ती फक्त सतीष दुभाषींच्या निधनाची बातमी. 12 सप्टेंबर 1980 हा तो दिवस. पण आजही अनेकांनी हे नाटक केले तरी त्यांची तुलना जुनी पिढी सतीष दुभाषींशीच करते, हा त्या अभिनेत्याचा गौरवच आहे.
त्या काळात ती फुलराणीचे दौरे प्रचंड होते. त्यामुळे त्यांना अनेक नाटकांसाठी फारसा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे तूच माझी राणी, देह देवाचे मंदिर या नाटकांचे फारसे प्रयोग झाले नाहीत. पण त्यानंतर शन्ना नवरेंनी लिहिलेले धुम्मस या नाटकात मात्र त्यांना चांगली संधी होती. तुरूंगातून पळालेला एक कैदी किंवा वेडा एका घरात घुसतो आणि एका खुनाचा तपास लागतो या कथानकावरचे हे नाटक. राजेश खन्ना नंदाचा इत्तफाक या कथानकावर बेतलेला सिनेमा होता. राजेश खन्ना सुपरस्टार होता त्या काळात आनंद आणि इत्तेफाक या दोन चित्रपटांची मराठी नाटके मराठी रंगभूमीवरचा हा सुपरस्टार करत होता. काशिनाथ घाणेकरांना रंगभूमीवरचा सुपरस्टार म्हटले जायचे, पण सहजसुंदर आणि अंडरप्ले नाटकाचे सुपरस्टार समकालीन असलेल्या सतीष दुभाषी हेच होते.
त्यानंतर त्यांनी नटसम्राट, नेपोलियन, पार्टी, बिवी करी सलाम अशी वेगवेगळ्या विषयांवरील अनेक नाटके केली.
पण ती फुलराणीनंतर सतीष दुभाषी दीर्घकाळ स्मरणात राहिले ते वसंत कानेटकर यांच्या बेईमान या नाटकात. मालक कामगार संघर्ष या विषयावर असलेल्या या नाटकात धनराज ही मस्तवाल भूमिका सतीष दुभाषींनी अजरामर केली. या नाटकात प्रभाकर पणशीकर यांचा चंदर आणि सतीष दुभाषी यांचा धनराज याच्यातील जुगलबंदी पाहण्यासारखी होती. विशेष म्हणजे या नाटकाचा विषयही मावळता सुपरस्टार आणि उगवता सुपरस्टार अशा राजेश खन्ना अमिताभ बच्चन यांच्या नमक हराम या चित्रपटाने घेतला होता.
याशिवाय बेकेट, मंतरलेली चैत्रवेल, माणसाला डंख मातीचा, मेजर चंद्रकांत, वाजे पाऊल आपले ही वेगवेगळ्या विषयांवरील नाटके गाजली. पण त्यानंतर आले ते सतीष दुभाषींचे आणखी एक जुगलबंदी असलेले नाटक. ते म्हणजे विजय तेंडुलकरांचे शांतता कोर्ट चालू आहे. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे आणि सतीष दुभाषी या दिग्गजांच्या अजरामर भूमिका या नाटकात पहायला मिळाल्या. विजय तेंडुलकरांच्या समांतर रंगभूमीवरील या नाटकाने व्यावसायीक रंगभूमीचे यश मिळवले.
रंगभूमीवर अल्पकाळ राहून दीर्घकाळ स्मरणात राहणारा हा अभिनेता. टीव्ही आणि वाहिन्यांच्या जमान्यात हा नट आज हयात असता तर तो छोटा पडदाही दीर्घकाळ त्याने व्यापून टाकला असता, इतका हा असामान्य कलाकार होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा