पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन. भारतीय मराठी शास्त्रीय संगितातील एक अध्याय म्हणून जितेंद्र अभिषेकींचा उल्लेख करावा लागेल. एक अत्यंत प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार आणि भारतीय संगितात मोलाचे योगदान देणारे गायक, संगितकार म्हणून अभिषेकीबुवांची ख्याती होती.
गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण 21 गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. हे त्यांचे जीवन चरित्र खरोखरच आश्चर्यकारक असेच म्हणावे लागेल.संगीत क्षेत्रातील अत्यंत आदरणीय प्रतिमा अशी त्यांची छबी संगीतक्षेत्रात होती. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. त्यामुळेच प्रत्येक अक्षर, स्वर याचा त्यांचा उच्चार हा कायम श्रवणीय होता. त्यामध्ये अभ्यास, विद्वत्ता ही दिसून येते. म्हणजे अत्यंत सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं.
अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती 1964 साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी एकूण 17 नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. त्यांच्या आयुष्यातील आणि संगित क्षेत्रातील फार मोठी कामगिरी म्हणून उल्लेख करावा लागेल तो कट्यार काळजात घुसली या नाटकाचा. संगीत आणि नाट्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर 1966 साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं. म्हणजे लेकुरे उदंड झाली या नाटकात श्रीकांत मोघे, दया डोंगरे यांनी अभिनयाची जी कमाल केली होती, सहजता होती त्याला प्रवाहीत करण्याचे नेमके काम जितेंद्र अभिषेकींच्या संगिताने केले होते. नाटक असं सहज सरकत आनंदायी अनुभव देत पुढे जात होते.
अभिषेकींनी जसं स्वतः संगीत दिलं तसं दुसर्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले.
आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. 1995 सालच्या नाटयसंमेलनाचं अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती . अत्यंत स्वच्छ मनाचा, शुद्ध वृत्तीचा आणि सभ्य कलाकार म्हणून जितेंद्र अभिषेकींची कारकीर्द होती.
त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले होते. यामध्ये नाट्यक्षेत्रातील मानाचा असा नाट्यदर्पण हा पुरस्कार 1978 साली मिळाला होता. तर बरोबर दहा वर्षांनी पद्मश्री हा मानाचा पुरस्कार 1988 ला मिळाला. त्यानंतर संगीत नाटक अकादमी (1989), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (1990), गोमांतक मराठी अकादमी पुरस्कार ((1992)
बालगंधर्व पुरस्कार (1995), सुरश्री केसरबाई केरकर पुरस्कार (1996), मा.दिनानाथ स्म्रृति पुरस्कार (1996)
लता मंगेशकर पुरस्कार (1996), नाट्यपरिषदेचा बालगंधर्व पुरस्कार (1997), सरस्वती पुरस्कार(कैलास मठ नाशिक)(1997) असे अनेक पुरस्कार मिळाले. पण कधीही त्यांना आपल्या कलेची अथवा पुरस्कारांची ग ची बाधा झाली नाही. त्यांची नम्र वृत्ती अखेरपर्यंत होती.
संगीत नाटकाची लोकप्रियता कमी होत असताना नव्या दमाचे संगीत देउन त्यांनी संगीत रंगभूमीला चिरंजीव बनवले. यामध्ये मत्स्यगंधा, ययाति देवयानी, लेकुरे उदंड झाली, वासवदत्ता ही नाटके विशेष गाजली तर कटयार काळजात घुसली हे नाटक अजरामर झाले. याशिवाय मीरा मधुरा, हे बंध रेशमाचे , धाडिला राम तिने का वनी?,
बिकट वाट वहिवाट, सोन्याची द्वारका, गोरा कुंभार, कांते फार तुला ही नाटकेही चांगली गाजली.
बाळ कोल्हटकरांचे देणार्याचे हात हजार हे वेगळे नाटक त्यांनी संगीतप्रधान केले. जयवंत दळवींचे महानंदा, कधीतरी कोठेतरी, अमृतमोहिनी, तू तर चाफेकळी या नाटकांनाही त्यांनी संगीत दिले होते.
आज त्यांच्या माघारी फार मोठा नामांकीत असा शिष्य परिवार आहे. यामध्ये त्यांचे पुत्र शौनक अभिषेकी हे त्यांचीच गादी चालवत आहेत. तर देवकी पंडित, राजा काळे, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, हेमंत पेंडसे
शुभा मुद्गल यांनी त्यांची गुरुशिष्य परंपरा एका उंचीवर नेउन ठेवली आहे. संगीत क्षेत्रात अनमोल कामगिरी करणार्य अभिषेकींना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मानाचा मुजरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा