कोणत्याही दिवसाचे काही विशेष महत्व असते. तसेच आजच्या 28 सप्टेंबर या दिवसाचे आहे. हा दिवस म्हणजे,
जागतिक पातळीवरचा माहितीचा हक्क दिन. आपले मुंबई चौफेर हे माहिती देणारे वर्तमानपत्र असल्यामुळे आम्हाला हा दिवस अधिक महत्वाचा वाटतो. माहिती असणे, असलेली माहिती लोकांना देणे हे फार महत्वाचे असते. म्हणूनच हा दिवस फार महत्वाचा आहे, विशेषत: माध्यमांच्या दृष्टीने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात हा दिवस महत्वाचा आहे.हा दिवस सर्वात प्रथम 28 सप्टेंबर 2003 रोजी साजरा झाला होता. आजकाल अनेक गोष्टींचे दिवस साजरे केले जातात. मातृदिन, पितृदिन, फ्रेंडशिप डे वगैरे वगैरे. पण या सगळ्यात आम्हाला हा दिवस जास्त योग्य वाटतो. कारण प्रत्येकाला नागरी जीवनाची माहिती असणे आवश्यक असते. नागरिकाला सरकार दरबारी नेमके काय चाललंय, हे समजून घेण्याचा अधिकार (माहितीचा अधिकार) मिळालेला असतो व त्याचे महत्त्व सकलजणांना पटावे म्हणून या सोहळ्याचे प्रयोजन असते. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, आपण कररूपाने भरत असलेल्या निधीचा सुयोग्य वापर करतात ना, हे समजून घेण्याचा या अधिकारामागचा हेतू असतो. पण दुर्दैव हेच की हा दिवसच साजरा केला जात नाही. कदाचित माहिती लपवण्याचा यात उद्देश असतो की काय हे माहिती नाही, पण ज्या उत्साहाने तरूण व्हेलेंटाईन डे साजरा करतात, फे्रंडशिप डे साजरा करतात त्या उत्साहात इतका महत्वाचा दिवस साजरा होत नाही. खरं तर सोशल मिडीया पॉवरफुल असताना, आक्रमक असताना हा दिवस दणक्यात साजरा होईल अशी अपेक्षा आहे. पण नेमके तेच होत नाही. कारण कोणती माहिती काढायची आणि कोणती माहिती द्यायची हेही ठरलेले असते असे वाटते.
खरं तर या दिवशी निमसरकारी संघटना आणि प्रत्येक नागरिक वैयक्तिकरित्या काही कार्यक्रम आखून, लोकजागृती करू शकतात. निमसरकारी संस्था स्थानिक संस्थांत तसेच शाळा कॉलेजात वादविवाद स्पर्धा आयोजित करू शकतात. टी-शर्ट, पोस्टर्स, प्रदर्शने याद्वारा लोकजागृती करून त्यांना त्यांच्या समस्या लिखित स्वरुपात देण्यास प्रवृत्त करू शकतात. त्याशिवाय, आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारण करणे, हे सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य ठरते. आज खरं तर कोव्हीड 19 हे फार मोठे संकट या जगासमोर असताना आपल्याकडे काय काय घडले आहे याची संपूर्ण माहिती देण्यासाठी, कुठे काय उलथापालथ झालेली आहे याची कानाकोपर्यात माहिती जाण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. जनजागृतीसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. पण त्या दिवसाबाबत मात्र सर्वच पातळीवर औदासिन्य दिसून येत आहे.
वैयक्तिक पातळीवर, वर्तमानपत्रांना पत्रे लिहून, लोकप्रतिनिधींची गाठीभेटी घेऊन राज्यकारभारात नेमके काय चाललयं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. शाळा-कॉलेजात शिक्षक व विद्यार्थ्यांत या महत्त्वाच्या विषयात संवाद झडायला हवा. वाचनालयातील अधिक्षकांनी आपल्या वाचकांना प्रस्तृत विषयावरील पुस्तके उपलब्ध करून द्यायला हवी. पत्रकारांनी संबंधित विषयावर लेख लिहून वाचकांत जागृती करायला हवी. सरकारी नोकर, लोकप्रतिनिधी, खासगी फर्मचे कामगार; सर्वजण आपापल्या परीने या माहितीच्या यज्ञकुंडात भाग घेऊ शकतात. परंतु आज तसे होताना दिसत नाही. आपल्याकडे अफवा पसरवणे, गॉसिपींग करणे, आजकाल ते मेम तयार करणे यामध्ये ज्याप्रकारे इंटरेस्ट घेतला जातो तितका इंटरेस्ट या माहिती जाणून घेण्याचा हक्क असलेल्या दिवशी घेतला जात नाही हे त्या माहिती तंत्रज्ञानाचा अपमान करण्यासारखेच आहे, असे म्हणावे लागेल.
वास्तविक, माहिती हक्क दिनासंबंधी 2002 साली बल्गेरियातील सोफिया येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय बैठकीत वाच्यता झाली होती व तिथे या मुलभूत हक्कासंबंधी तत्त्वे अंगिकारण्यात आली होती. यामध्ये प्रत्येकाला माहितीचा हक्क, आहे. आपल्या देशातही 2002 ला माहितीचा अधिकार आला, नंतर त्यात सुधारणा होउन 2005 ला आला. पण आपल्याकडे माहिती अधिकार म्हटले की त्याचा संबंध कारण नसताना अण्णा हजारेंशी जोडला जातो. त्याची काही गरज नाही.
या जागतीक धोरणानुसार हक्क प्रथम; गुपित अपवादात्मक
सर्वच सर्वाजनिक संस्थांसाठी हा नियम लागू आहे. याशिवाय
सोपी पद्धत, गतीमान कार्यवाही आणि विनामोबदला सेवा देण्याचा आग्रह या कायद्यात आहे. त्यासाठी अधिकार्यांचे सहकार्य कशाप्रकारे असले पाहिजे याची काही तत्वे आहेत. ते सहकार्य कसे मिळवावे याचे काही नियम आहेत. ते समजून घेण्याचीही गरज आहे. पण याचा कारण नसताना राजकारणाशी संबंध जोडला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी माहिती अधिकार कार्यकता हा बदनाम झालेला दिसतो. त्याच्यावर खंडणीखोरीच आरोप येतात, अनेक ठिकाणी त्यांच्या हत्या घडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे हा चांगला दिवस, चांगली प्रक्रीया बंद पडलेली आहे. कोणतीही माहिती मिळवताना त्यामागे मिळणार्या नकाराचे योग्य समर्थन
आहे का याचा शहानिशा करता आला पाहिजे. तसेच काही बाबीत सार्वजनिक हिताला गुप्ततेपेक्षा प्राधान्य दिले गेले पाहिजे. आपल्याला आवश्यक नसलेली माहिती मिळवण्याचाही अनेकजण प्रयत्न करतात. यामध्ये बर्याचवेळा अधिकार्यांना सूडबुद्धीने त्रास देण्याचा प्रकारही होत असतो. असलेल्या कर्मचारी अधिकार्यामंधून सरकार दरबारी व्यवस्था होत असते. आज माहिती गोळा करण्याच्या कामात कामगारांना अडकवण्याच्या प्रकाराने अनेकवेळा दप्तरदिरंगाई होत असते. म्हणूनच विनाकारण दिरंगाई होत असेल तर अमान्य निर्णयाला आव्हान करण्याची संधीही आपल्याला असते. मिळालेल्या माहितीचे योग्य प्रकारे आवश्यकतेनुसार प्रसिद्धीकरण करण्यास हरकत नसते पण त्यात नागरिकांच्या हक्काची जपवणूक होणेही महत्वाचे असते.
यामुळे, माहितीच्या अधिकाराची व्याप्ती वाढली असून त्यासंबंधीची कारवाईही नेटकेपणाने होत आहे. पण म्हणूनच आजचा हा दिवस फार महत्वाचा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा