बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

दुष्टपणाचे लक्षण

 एखादी व्यक्ती अडचणीत असते तेंव्हा त्याला मदत करायची असते, चौकशी करून धीर द्यायचा असतो, काही पर्याय सुचवायचे असततात, सल्लामसलत करायची असते. त्याच्या अडचणींचा गैरफायदा घेत आपला स्वार्थ काही साधता येईल का हे पाहणे दुष्टपणाचे लक्षण असते. आज केंद्रात असो वा राज्यात विरोधी पक्षांचे हेच चुकते आहे. आज देशापुढे, राज्यापुढे अनेक संकटे आहेत, प्रश्न आहेत. या परिस्थितीत राजकारण सोडून सरकारच्या मदतीला येण्याचे मोठेपण विरोधकांनी दाखवायची गरज असताना दुष्टपणाचे राजकारण केले जात आहे, हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले नाही.

   म्हणजे, राज्यापुढील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी शासनास मदत करण्याऐवजी उखाळ्यापाखाळ्या काढण्यामध्ये विरोधक आपला वेळ खर्च करीत आहेत. जे केंद्रात राहुल गांधींची काँग्रेस करत आहे, तोच प्रकार राज्यात भाजप करत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे भिन्न विचारधारेचे पक्ष आहेत असे वाटतच नाही. याला झाकावा अन त्याला काढावा अशी अवस्था आहे. विरोधकांनी आज संकटग्रस्त परिस्थितीतून देश, राज्य सावरण्यासाठी आपण काय केले असते, काय करू शकलो असतो हे सांगायला पाहिजे. सरकारशी बोलले पाहिजे. विरोधक म्हणजे लोकशाहीचा दुसरा स्तंभ आहे. तो इतका तकलादू मनोवृत्तीचा कसा काय असू शकतो? निंदकाचे घर असावे शेजारी आपण म्हणतो त्याप्रमाणे निंदकाच्या निंदेतून धडा घेउन आपण आपली प्रगती करतो. तसे सरकार आणि विरोधक यांचे नाते असले पाहिजे. निंदा करणारे शेजारी संकटात मदतीला येत असतात. तसेच विरोधकांचे असले पाहिजे, पण दुर्दैवाने तसे ते दिसत नाही.
  एकीकडे कोरोना महामारीशी तोंड देत असतानाच सरकारने काही चांगले निर्णय घेऊन सकारात्मकतेच्या दिशेने  काही पावले टाकली आहेत. सरकार आपल्या परिने प्रयत्न करत आहेच. त्या सरकारला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विरोधकांनी पुढे येणे हा मोठेपणा असतो. पण आज विरोधक खलनायकासारखे दुष्ट प्रवृत्तीने वागतात हे वाईट आहे.
 आता राज्य मंत्रिमंडळाने राज्यात पोलिसांची मेगाभरती करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारी लक्षात घेऊन शासकीय नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली असतानाही येत्या काही महिन्यात 12,528 पोलिसांची भरती करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. या पोलीस भरतीमुळे ग्रामीण भागातील तरुण तरुणींना  पोलीस दलामध्ये काम करण्याची एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात राज्यातील पोलीस दलावर किती प्रचंड ताण पडत आहे याचा अनुभव राज्य घेत आहेच. पोलीस दलामध्ये ही जम्बोभरती  झाल्यानंतर पोलीस दलावर जो विविध प्रकारचा ताण पडत आहे तो कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. पोलीस दलामध्ये ही जी मेगाभरती करण्यात येत आहे ती एवढया मोठया प्रमाणात प्रथमच होत असल्याचा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्यातील युवा वर्गास शासनाच्या या निर्णयाचा नक्कीच लाभ होणार आहे. पोलीस दलात मेगाभरती करण्याचा निर्णय घेऊन राज्य शासनाने एक चांगले पाऊल टाकले आहे. सरकार काहीच करीत नाही, सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यात अनेक प्रकारच्या समस्या उभ्या  राहत आहेत, असा जो आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे त्या आरोपांना मंत्रिमंडळाने जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे उत्तर मिळाले आहे. पण त्यालाही विरोध केला जात आहे. त्यासाठी आरक्षणाचा आणि अन्य मुद्यांचा विषय काढून ही चांगली गोष्ट थांबवण्याचा प्रकार  चालला आहे. मराठा समाजासाठी यात सरकारने अगोदरच 1600 जागांची भरती राखीव ठेवली आहे. त्यावरून राजकारण करण्याची गरज नाही. पण पोलीस भरतीच स्थगित करा म्हणून जो दुष्टपणा चालवला आहे तो राज्याच्या हिताचा नाही. जे केंद्रात काँग्रेसनेते राहुल गांधी करत आहेत तेच राज्यात भाजप नेते फडणवीस, चंद्रकांत पाटील करत आहेत असे दिसते, हे योग्य नाही.
   राज्य सरकारने रस्ते अपघातात सापडणार्यांसाठी एक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना असे या योजनेचे नाव आहे. रस्त्यांवरील अपघातांमध्ये सापडलेल्या व्यक्तीना या योजनेचा लाभ होणार आहे. अपघातात सापडलेली व्यक्ती कोणत्याही राज्यातील वा कोणत्याही देशाची असली तरी या योजनेअंतर्गत त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील, असे या योजनेचे स्वरूप आहे. सध्या राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर दरवर्षी सरासरी 40 हजार व्यक्ती जखमी होतात आणि 13 हजार व्यक्ती मरण पावतात. ही आकडेवारी लक्षात घेता ही रस्ते अपघात विमा योजना निश्चितच उपयुक्त ठरू शकेल. राज्यापुढे कोरोनाची भीषण समस्या असतानाच अनेक महत्वाच्या प्रश्नांवर उपाययोजना शोधण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारही वेगवेळ्या उपाययोजना राबवत आहे. पण त्याला खोडा घालण्याची प्रवृत्ती विरोधकांमध्ये दिसते. वास्तविक केंद्र आणि राज्य यांच्यात मतभेद नाहीत. केंद्राकडून सहकार्य मिळवून राज्याचा कारभार करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण केंद्रात आमचे सरकार आहे म्हणून आम्ही अडवणूक करू असा इशारा देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो दुष्टपणा असेल. आपल्या राज्यासाठी कोणतेही सरकार चांगले काम करत असेल तर त्याचे स्वागत करण्याचा मोठेपणा विरोधकांनी दाखवला पाहिजे. किंबहुना केंद्रात आपल्या पक्षाचे सरकार आहे त्यासाठी राज्यातील सरकारच्या बरोबर राहुन जास्तीत जास्त फायदा उठवून मनाचा मोठेपणा दाखवण्याची संधी भाजप गमावत आहे. काँग्रेसही आमच्याकडे मनमोहनसिंग यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आहेत असा टेंभा मिरवत आहे, तर त्यांनी देशहितासाठी मोदीसरकारला मार्गदर्शन करायला काहीच हरकत नाही. पण असे होताना दिसत नाही. हा राजकीय दुष्टपणा बंद होण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: