बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

शापीत काळूबाई

   आपल्याकडे अध्यात्मिक, पौराणिक, भक्तीमय चित्रपट काढून एखादे देवस्थान आणि देव मोठा करण्याचे प्रकार मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीने अनेकवेळा केलेले आहेत. म्हणजे शिर्डीचे साईबाबा पन्नास वषार्र्पूर्वी फारसे कोणाला माहितीही नव्हते. नगर जिल्यात शिरडी नावाचे एक गाव आहे एवढीच तेंव्हा माहिती होती. पण मनोजकुमारने शिर्डी के साईबाबा हा चित्रपट काढला. तो सुपरडुपरहिट झाला. त्यातील सुधीर दळवींना साईबाबांचा चेहरा प्राप्त झाला आणि या देवस्थानचे रूपडेच पार बदलून गेले. एक श्रीमंत देवस्थान म्हणून आज त्याची ख्याती आहे.

 1970 च्या दशकातच जय संतोषी माँ/ नावाचा एक अत्यंत लो बजेट चित्रपट आला आणि त्या चित्रपटाने संपूर्ण देशभर उत्पन्नाचे आकडे मोडले. तोपर्यंत संतोषी माता नावाची कोणती देवता आहे हे कोणाला माहितीही नव्हते. पण त्यानंतर संपूर्ण देशभर विशेषत: महाराष्ट्रात महिला संतोषी मातेचे व्रत करायला लागल्या. सोळा शुक्रवार, फुटाणे गुळ, उद्यापनाला खीर पुरी असे आमच्या लहानपणी खायला मिळू लागले. आंबट खायचे नाही, देवीचा कोप होतो या भावनेत अनेकजण व्रत करून या देवीची कृपा प्राप्त करत होते. पण या देवीवर प्रसिद्धीची कृपा केली होती ती बॉलीवूडने. आता ही देवी कुठे दिसत नाही.
   त्यानंतर अनेक संत, बाबा, देवतांवर चित्रपट आले. त्यातून अनेक देवस्थानांचा परिचय करून देण्याची प्रथा सुरू झाली. पण 2005 ला अरूण कचरे यांनी असाच लो बजेट काळुबाईच्या नावानं चांगभलं हा मराठी चित्रपट काढला. अलका कुबल, अशोक सराफ, कुलदीप पवार अशा नामांकीत कलाकारांच्या भूमिका असल्याने हा चित्रपट तुफान चाललाही. त्यामुळे या काळूबाईचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात इतका झाला की त्याची जत्रा करण्यासाठी पौष महिन्यात गर्दी झाली. 25 जानेवारी 2005 ला सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीच्या या यात्रेला मंगळवारी इतकी गर्दी झाली की त्यावेळी झालेल्या अपघातात शेकडो जणांचा मृत्यू झाला. तोपयर्र्त मांढरदेवीला किवा मांढरगडावर कोणीही येत नव्हते. पण या चित्रपटामुळे मुंबईपासून झोपडपट्टीतून हजारोंच्या संख्येने लोक येउ लागले. इतकी तुफान गर्दी झाली की त्यामुळे राज्यभरातील कोणत्याही यात्रांवर नियंत्रण आणणारा कायदा सरकारला करावा लागला. मांढरदेवीच्या काळूबाईवर काढलेला चित्रपट हा शापीत ठरला होता.  या चित्रपटामुळे या देवस्थानची महती वाढवण्याचा झालेला प्रयत्नही खूप चर्चेत आला. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान, झाडाला खिळा ठोकणे, बळी देण्याचे प्रकार, रक्ताचे, तेलाचे पाट वाहण्याचे प्रकार हे अत्यंत भयावह चित्र होते. पण 25 जानेवारी 2005 ला प्रत्यक्षात माणसांच्याच रक्ताचे पाट वाहिले. वाईच्या मिशन हॉस्पिटलला प्रेतांचा खच पडला होता. या अपघाताची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती कोचर आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती. पण एकुणच या काळूबाईच्या चित्रपटाने संतोषी मातेसारखी लोकप्रियता मिळवली नाही. कोणाचे उखळ पांढरे झाले नाही. शिर्डीसारखे संस्थान तयार झाले नाही. पण मराठी वाहिन्यांवर अधूनमधून दाखवण्यासाठी एक चित्रपट मिळाला इतकेच. बाकी हा चित्रपट आणि काळूबाई ही शापीतच ठरली.
 याच प्रकाराची पुनरावृत्ती आज पुन्हा झालेली दिसते आहे. मांढरदेवीच्या याच काळूबाईवर एका मराठी मालिका तयार होते आहे. या मालिकेचे वाई सातारा मांढरदेवी परिसरात चित्रिकरण होताना दिसत आहे. पण या चित्रिकरणाच्या दरम्यान अचानक 27 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यामुळे मालिका वाहिनीवर येण्यापूर्वीच ही काळूबाई इथे शापीत ठरली. यात काळूबाईची भूमिका रडुबाई म्हणजे अलका कुबल करणार आहे. अरूण कचरेंच्या चित्रपटातही त्यांनी काळूबाईची भूमिका केली होती. पण लोकांच्या घराघरात पोहोचली ती अलका कुबल आठल्ये. पण एकुणच काळूबाईवर चित्रपट बनावेत हे नियतीला मान्य नसावे. कदाचित त्या देवीलाही आपली अशाप्रकारे प्रसिद्धी व्हावी असे वाटत नसावे.
      खरं तर अशाप्रकारे अनेक देवस्थानांवर संशोधनात्मक चित्रपट, मालिका सातत्याने येत आहेत. पण यात जी काल्पनिक आणि कपोलकल्पीत कथानके घुसडली जातात त्यामुळे भोळ्या भाबड्या, अडाणी लोकांची तर फसवणूक केली जातेच, पण ते योग्य नसते. त्यातून आपल्या देवदेवता, श्रद्धास्थाने विटंबली जातात हे लक्षात घेतले पाहिजे.
   झी मराठीवर पाच वषार्र्पूर्वी जय मल्हार ही अशीच मालिका महेश कोठारे यांच्या कोठारे व्हीजनने काढली. जेजुरीच्या खंडोबाच्या चरित्रावर आधारीत ही काढलेली मालिका अत्यंत सुंदर होती. त्यातही कल्पकता दाखवली होती. पण कोणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता ही मालिका तयार केली होती. त्यामुळे यातील खंडोबा, बानू, म्हाळसा, हेगडी प्रधान अशी पात्रे लोकांनी देव म्हणूनच स्विकारली. प्रेक्षकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण त्यासाठी प्रॉडक्शन हाउसने प्रचंड अभ्यास केला होता. खर्च केला होता. संशोधन केले होते. त्यामुळे ही मालिका यशाच्या शिखरावर गेली. त्यामुळे आता आपापल्या समाजाची दैवते मालिकेच्या स्वरूपात छोट्या पडद्यावर आणण्याची चढाओढ लागली. कलर्स वाहिनीने तर दर्शन नावाची मालिका काढून अलका कुबलना महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील देवांपर्यत, मंदीरांर्पंत पोहोचवले. अनेक मंदीरांचे महात्म्य वाढवायची वाहिन्यांमध्ये चढाओढ लागली. कुठे बाळुमामाची मेंढरं आली, कुठे आणखी कोणी आले. स्वामी समर्थ, गजानन महाराज अशा अनेक पौराणिक, चमत्कारावर आधारीत मालिका विविध वाहिन्यांवर येत राहिल्या. किशोरी शहाणेंनी देखील मोहोटाची रेणुका नावाचा एक चित्रपट काढला होता. पण लोकांची मने काही मालिकांनी भारावून गेली. काहींनी करमणूक केली. पण यात मांढरदेवीची काळबाई मात्र शापीत ठरताना दिसत आहे. मांढरदेवीवर काढलेल्या चित्रपटानंतर झालेल्या अपघातात शेकडो बळी गेले तर आता वाहिनीवर लगेच येउ पाहणार्‍या मालिकेदरम्यान कोरोनाचा कोप झाला. हा कोप कोरोनाचा आहे की काळुबाईचा आहे असा प्रश्न पडला पाहिजे. पण एकाचवेळी 27 जणांना याची लागण झाली आणि आमची पडद्यावरची सोज्वळ चेहर्‍याची आई आशालता मात्र हिरावून नेली. त्यामुळे प्रसिद्धीसाठी आलेल्या या तंत्राचा फटका काळूबाईच्या बाबतीत शापीत ठरताना दिसतो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: