संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जया बच्चन यांनी आवाज केल्यनंतर भाजपच्या भोजपुरी खासदारांनीही त्याला उत्तर दिले. पण एकुणच सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर जेवढा हंगामा झाला त्याप्रमाणात बॉलीवूडकडून फारशा प्रतिक्रीया आलेल्या नाहीत. जया बच्चनही खासदार नसत्या तर त्या बोलल्या असत्या का हा प्रश्नच आहे. पण अनेक अभिनेते, लेखक, निर्माते, दिग्दर्शक की जे सहिष्णुता या विषयावर हिरीरीने बोलत होते, पुरस्कार वापसीत हिरीरीने पुढे येत होते आणि सरकारचा तिरस्कार करत होते, ते आत्ता गप्प का आहेत हे अनाकलनीय आहे.
जगातील सर्वांत मोठी चित्रपटसृष्टी भारतात तेही महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत आहे. या चित्रपटसृष्टीचा भाग असणारे दिग्गज कलावंत कधीही सामाजिक गोष्टीवर आपले मत व्यक्त करत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या चित्रपटसृष्टीबाबतच नकारात्मक चर्चा सुरू होते तेव्हा तरी त्यांनी कर्तव्य भावनेतून समोर येऊन भूमिका मांडणे गरजेचे आहे. सुशांतसिंह आत्महत्येच्या निमित्ताने बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा जो विषय समोर आला आहे, त्यामुळे बॉलीवूडमधील अनेक लोक संशयाच्या भोवर्यात आहेत. परिणामी संपूर्ण चित्रपटसृष्टीकडेच संशयाने पाहिले जात आहे, हे थांबवायचे असेल तर चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आता समोर येण्याची गरज आहे.समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत याविषयी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि बॉलीवूडमधील काही कलाकार बॉलीवूडला बदनाम करत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांचा रोख बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघड करणारी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिच्या या भूमिकेला समर्थन देणारा भाजपचा खासदार अभिनेता रवी किशन यांच्या दिशेने होता. रवी किशन किंवा मनोज तिवारी हे भाजपचे खासदार असले तरी तेसुद्धा चित्रपटसृष्टीचे महत्त्वाचे घटक आहेत. भोजपुरी चित्रपटसृष्टीला जिवंत ठेवण्याचे काम या कलाकारांनी केले आहे; पण आपली भूमिका मांडताना त्यांनी ती कलाकारांची भूमिका न मांडता राजकीय नेत्याच्या भूमिकेतून आपले मत व्यक्त केल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका येऊ शकते. म्हणूनच नेहमी स्वत:ला विचारवंत म्हणणारे जावेद अख्तर, शबाना आझमी हे याबाबत गप्प का आहेत हे समजत नाही. अमिर खान यावर काहीच बोलत नाही. शत्रुघ्न सिन्हा काहीच बोलत नाही. अनुपम खेर सध्या कुठे आहेत? या लोकांनी राजकारण सोडून, आपण ज्या पक्षाचे प्रतिनिधी आहोत हे विचार सोडून बॉलीवूडसाठी तरी बोलायला पाहिजे.
याबाबत उर्मिला मातोंडकरचे कौतुक करावेसे वाटते. दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील संवादामध्ये अतिशय परखड मते व्यक्त करीत कंगना राणावतचे ढोंग उघड करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तिच्या बोलण्यात खरेपणा जाणवत होता, काँग्रेसचा वास येत नव्हता, तिच्यातला कलाकार बोलत होता. तसे आपल्या पक्षाचे वस्त्र बाजूला ठेवून हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गप्प का बसले आहेत हा प्रश्न आहे.
जया बच्चन यांचे पती आणि या शतकाचा महानायक असणारे अभिनेते अमिताभ बच्चन कधीच कोणत्याही वादग्रस्त विषयावर टिप्पणी करत नाहीत. यावेळीसुद्धा त्यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. पण त्यांनी याबाबत बोलायला पाहिजे असे वाटते. दादासाहेब फाळके पुरस्कार घेतलेले अनेक दिग्गज आज हयात आहेत, त्यापैकी कोणीच काही बोलत नाही. अमिताभ बच्चन यांनी साधे ट्विट करूनही कंगनाच्या विधानाचा अथवा कृतीचा निषेध केलेला नाही. किंवा समर्थन केले नाही. इतकी न्यूट्रल, उदासिन भूमिका कशी काय ते घेउ शकतात? चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव असणार्या खान मंडळींनीही कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. शाहरुख खान आणि सलमान खान शक्यतो कोणत्याही वादग्रस्त विषयात पडण्याचे टाळतात. आमिर खान मात्र वेळोवेळी आपली मते व्यक्त करत असतो. यावेळी चित्रपटसृष्टीशी संबंधित विषय असूनही आमिर खानने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हे हेतुपुरस्सर केलेयाचे जाणवत आहे. एरव्ही कोठेही काही घडले तर लगेच व्यक्त होणारे महेश भट्ट अथवा गीतकार जावेद अख्तर अथवा नेहमी सरकारच्या बाजूने बोलणारे अभिनेते अनुपम खेर यांच्यापैकी कोणीही बॉलीवूडची बदनामी होत असताना पुढे येऊन बोलण्याचे धाडस दाखवले नाही. हे सगळे कसे काय घडू शकते? म्हणजे बॉलीवूडने तसा काही फतवा काढला आहे का? का कोण आधी बोलतोय याची वाट पहात आहेत?
खरं तर कंगना राणावतने जो ड्रग्ज कनेक्शनचा विषय समोर आणला त्यानंतर सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी या कनेक्शनच्या बाबतीत रिया चक्रवर्तीसह 6 लोकांवर कारवाई करण्यात आली. म्हणजेच चित्रपटसृष्टीत अंमली द्रव्यांचा प्रभाव आहे, हे उघड झाले. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनेक अभिनेत्यांच्या दिशेने बोटे रोखली गेली. त्यापैकी कोणीही साधी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही किंवा आरोप खोडून काढला नाही. कंगनाने तर अनेक खानांची नावे घेतली होती. कदाचित आपण एखादी भूमिका घेतली तर आपण एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने बोलत आहोत, असा समज निर्माण होण्याच्या भीतीने हे दिग्गज कलाकार बोलत नसावेत; पण पडद्यावर स्टार, सुपरस्टार आणि सुपर हिरोसारख्या भूमिका बजावणारे कलाकार वास्तव जीवनात किती भितरे आहेत, व्यक्त होण्यास घाबरतात हे यातून स्पष्ट झालेले आहे. नेहमी चर्चेत राहण्यासाठी सरकारवर, अभिव्यक्तीसाठी धडपडणारी शबाना, जावेद अख्तर यांची चुप्पी बरेच काही सांगून जाते. त्यामुळे साहजीकच हे फार मोठे रॅकेट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. समोर घडत आहे हे या लोकांना माहिती आहे. असे असताना अन्य बाबींवर बोलण्याचा यांना कोणता अधिकार पोहोचतो? आपल्या पायाखाली काही जळत असताना दुसरीकडे आग लागली म्हणून ओरडणारे हे किती खोटे बुरखाधारी आहेत हेच यातून दिसून येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा