1960 चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते. याचे कारण बहुतेक चित्रपट हे राज कपूर, दिलीपकुमार, राजेंद्रकुमार, देवानंद, शम्मी कपूर या नायकांनी गाजवले होते. यातील काही अपवाद वगळता बहुतेक चित्रपट हे गाण्यासाठी गाजलेले चित्रपट आहेत. म्हणजे कधीकधी प्रश्न पडतो की शंकर जयकिशन, नौशाद, सलील चौधरी अशा दिग्गजांचे संगीत, तलत मेहमूद, मुकेश, मोहंमद रफीचा आवाज नसता तर कोणी राजेंद्रकुमारचे चित्रपट पाहिले असते का? लोक गाण्यासाठी चित्रपट पहात होते. त्यामुळे चांगली गाणी ही या सुवर्णकाळात महत्वाची असत. अशी चांगली गाणी लिहणारांमध्ये साहीर लुधीयानवयी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, असे दिग्गज असताना अन्य कोणाचा शिरकाव तिथे होणे अवघडच होते. त्यामुळेच चित्रपटांचा ढाचा जसा बदलू लागला तसा एक गीतकार लोकांच्या मनात घर करू लागला. तो गीतकार म्हणजे अंजान. 1970 चे दशक त्यांनी आपल्या गीतांनी गाजवले. त्या गीतकार अंजान यांची आज पुण्यतिथी.
1970 चे दशक हे अमिताभ बच्चनला सुपरस्टार बनवणारे दशक होते. हेच दशक अंजानच्या वाट्याला आले आणि अमिताभच्या लोकप्रिय गीतांमध्ये अंजानचा वाटा हा अनमोल आहे. म्हणजे अंजानच्या शब्दांनी संगीतप्रधान नसलेल्या चित्रपटातही अमिताभला नाचवले आहे.अंजानचे खरे नाव लालजी पांडे. संगीतकार समीर हा त्यांचा मुलगा. मुळचे उत्तरप्रदेशातील असलेल्या अंजान यांनी या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी मुंबईत प्रचंड संघर्ष केला. कारण सुवर्णयुगात आपला जम बसवणे शक्यच नव्हते. 1960 च्या दशकातही त्यांनी चित्रपट गीते लिहीली पण त्यांना फारशी ओळख मिळाली नव्हती. पण तरीही ते वाट पहात राहिले. कारण त्यांच्यासाठी ओळख देणारे दशक होते ते 1970 चे दशक.
उमेदीच्या काळात रहायला जागा नसल्याने मुंबईतील लोकलमध्ये प्रवास करणे किंवा एखाद्या बिल्डींगच्या जिन्याखाली झोपण्याची वेळ त्यांच्यावर आलेली होती. पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही.
शिकत असतानाच अंजानला कविता करण्याचा, गाणी लिहीण्याचा खूप छंद होता. या छंदामुळे त्यांचे मित्रमंडळ मोठे होते. त्यांच्या कविता ऐकण्यात मित्र खूष होत होते. या मैत्रितूनच त्यांना अंजान हे गीतकार म्हणून नाव मिळाले होते.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गायक मुकेशची त्यांची ओळख झाली आणि मुकेशने मुंबईत येण्याची ऑफर दिल्यामुळे 1953 ला अंजान मुंबईत आले. तेंव्हापासून त्यांनी जी मुंबई पाहिली, जो संघर्ष केला तो त्यांनी आपल्या एका गीतात अतिशय सुंदरपणे मांडला. मुंबईचे मस्त वर्णन केलेले हे गीत गेली चाळीस वर्ष आपण तितक्याच आनंदाने ऐकतो. ते गाणे म्हणजे डॉन चित्रपटातील, इहै बंबई नगरीया को देख बबआ....सोने चांदी की गगरी को देख बबआ.... या गाण्यात त्यांच्या वाट्याला आलेले मुंबईचे चित्र त्यांनी रंगवले. कोई बंदर नहीं है फिर भी नाम बांदरा, चर्च का गेट है, चर्च है लापता असले शब्द जुळवून धमाकेदार गाणे अंजान, किशोरकुमार आणि अमिताभ बच्चन यांनी गाजवले. याच चित्रपटातील खैके पान बनारसवाला या गाण्यात त्यांनी आपली जान ओतली आहे आणि अंजान काय आहे हे दाखवले.
1970 च्या दकशातील ही वर्षच त्यांच्यासाठी महत्वाची होती. कारण मुकद्दर का सिकंदरमधील इकापेक्षा एक चांगली गाणी ही त्यांची होती. रोते हुऐ आते है सब, हसता हुआ जो जायेगा वो मुकद्दर का सिकंदर, हे गीत अंजानचे खास गीत म्हणून ओळखले जाते. मुकद्दर का सिंकंदरमधील दिल तो है दिल, दिल का इंतजार आणि ओ साथीरे तेरे बिना भी क्या जीना ही दर्दभरी गाणीही त्यांचीच. कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि बप्पी लाहीरी यांच्याबरोबर अंजानचे चांगले सूत जमले आणि यांनी अनेक गाजलेली गीते निर्माण केली.
1970 च्या दशकातीलच देवानंदसाठी लिहिलेली जॉनी मेरा नाम मधील गाणीही प्रचंड गाजली होती. यातील बाबुल प्यारे हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.
परंतु 1960 चे दशक त्यांचे अत्यंत संघर्षमय होते. या काळात अनेक संगीतकार, निर्माते, दिग्दर्शकांचे उंबरठे ते झिजवत होते. पण त्यांना काम मिळत नव्हते. मुंबईत रहायला जागा नाही, सुरवातीला एरोमा गेस्टहाउसवर रहायचे. नंतर लोकल, इमारतीच्या जिन्यांखाली राहण्याचा प्रकार सहन केला. पण त्यामुळेच त्यांच्या शब्दात आयुष्याच्या संघर्षाची धार आली होती. अनुभवातून आलेले शब्द हे मोलाचे असतात. सडकछाप असलेल्या हिरोला मोठा होताना नेमके शब्द येणे आवश्यक असतात. ते जगणे अनुभवल्याने त्यांची गाणी लोकप्रिय होत गेली.
1962 मध्ये अंजानची ओळख प्रेमनाथशी झाली. त्यावेळी ते गोवळकोडा का कैदी नावाचा चित्रपट बनवत होते. या चित्रपटातील गीतासाठी प्रेमनाथने अंजानला संधी दिली. त्या चित्रपटातील पहिले गीत अंजाननी लिहीले ते म्हणजे, प्यार की राह दिखा दुनिया को.. या कामासाठी त्यांना त्यावेळी 500 रूपये मानधन मिळाले होते. त्यानंतर त्यांना छोटी मोठी कामे मिळत गेली. या दरम्यान जी पी सिप्पींशी त्यांची ओळख झाली. आणि त्याना कामे मिळायला लागली. पण खरी ओळख मिळाली ती हिंदी चित्रपटसृष्टीत सुरू झालेल्या अमिताभ युगात. मुकद्दर का सिकंदर, डॉन, हेरा फेरी, खून पसिना, लावारीस अशा सुपरहिट चित्रपटांची गीते त्यांना मिळायला लागली. त्यामुळे प्रकाश मेहरा, कल्याणजी आनंदजी, अंजान आणि अमिताभ ही चौकडी जमली. साहेब, बदलते रिश्ते, अंच लोग, ईश्वर, संजोग अशा चित्रपटातील सुपरहिट गाणीही अंजानने लिहीली होती. हिंदी चित्रपटांसाठी 1500 पेक्षा जास्त गीते त्यांनी लिहीली. त्यातील 200 पेक्षा जास्त गाणी ही अजरामर अशीच आहेत. अशा या 70 च्या दशकात ओळख मिळालेल्या अंजान यांचा मृत्यू 13 सप्टेंबर 1997 ला झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा