आजपासून अधिक महिन्याला प्रारंभ होत आहे. आपल्याकडे म्हणतात की दुष्काळात तेरावा महिना, तसे कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्तीत आलेला हा अधिक महिना आहे. अधिकस्य अधिक फलम म्हणतात, पण आता कोरोनाचा अधिक उद्रेक होउ नये म्हणून प्रार्थना आणि प्रयत्न करण्याचा हा कालावधी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या अधिक महिन्यात अन्य काही व्रतवैकल्य करण्यापेक्षा आपण हा रोग अधिक फैलावू नये म्हणून प्रार्थन करावी आणि काळजी घ्यावी इतकेच.
अधिक महिना म्हणजे त्याचे खगोलशास्त्रीयही महत्व खूप आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यासाठी त्याल 365 दिवस, 5 तास 48 मिनिटे आणि साडे 47 सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले 12 हिंदू चांद्र मास(महिने) मात्र 354 दिवसातच म्हणजे 11 दिवस आधीच पूर्ण होतात.महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास म्हणून ओळखला जातो. म्हणूनच सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा 33 दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
सूर्याधरित पंचांग पाळणार्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणार्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.
चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसर्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की 19 वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो.
ज्यावर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणार्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो.
काहीवेळा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशावेळी क्षयमास येतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाहीत, क्षयमास येतात. क्षयमासाच्या आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हातरी थोड्या अंतराने दोन अधिकमास येतात.
खगोलशास्त्रानुसार ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.
हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्यांतल्या 24 एकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणार्या दोनही एकादश्यांना ’कमला एकादशी’ हेच नाव असते.
ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. त्याला पंचामृत योग असे म्हणतात. हा योग यावर्षी आलेला दिसून येतो.
दोन अधिक मासांत जास्तीत जास्त 35 महिन्यांचे आणि कमीतकमी 27 महिन्यांचे अंतर असते. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीही अधिक महिने असत नाहीत. अधिक मास हा मार्च ते ऑक्टोबर या महिन्यांपैकी एखाद्या महिन्यात येतो.
या अधिक महिन्यात आपल्याकडे काही व्रत वैकल्ये केली जातात. अनेक ठिकाणी जावयाला दान देण्याचा कार्यक्रम केला जातो. दानधर्म हे पुण्य कमावण्यासाठी केले जाते. मात्र यावर्षीचा अधिक हा कोरोनाचे संकट घेउन आलेला आहे. त्यामुळे तो अधिक फेलावू नये यासाठीच आपल्याला काही करावे लागेल.
काही करायचे असेल तर कोरोनाशी लढण्याचे बळ मिळेल आणि हा रोग लवकरात लवकर जाईल यासाठी प्रयत्न करावेत. अधिकमासात अनेकजण नदीवर स्ना करतात. महिनाभर अधिंकस्नात करतात. परंतु यावर्षी नदीवर स्नान करून नदी दुषीत करण्याचे टाळावे. काही दान द्यायचेच असेल तर मुख्यमंत्री निधीसाठी दान द्यावे. पंतप्रधान निधीसाठी द्यावे. कसली व्रतवैकल्ये, पूजापाठ करण्याऐवजी त्याचा खर्च कोव्हीड योध्द्यांना द्यावा. किंवा मास्क, सॅनिटायझर, थर्मामिटर, ऑक्सीमीटरचे वाटप करून स्वच्छतेचा संदेश जितका देता येईल तेवढा द्यावा. यातूनही अधिक महिन्याचे पुण्यकर्मच होईल. माणसात, प्राणीमात्रात देव आहे असे मानणार्या आपल्या संस्कृतीत कालानुरूप बदल करून काळाची गरज म्हणून या अधिकात कोरोनाचा अधिक फैलाव होउ नये म्हणून प्रयत्न करण्याचे व्रत प्रत्येकाने आचरणात आणावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा