बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

बबड्या सांगा कोणाचा?

    घरकुल चित्रपटात पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे, हे गाणे फार पूर्वी खूप गाजले होते. गरीब, सामान्य कुटुंबातही हसत खेळत कसे रहायचे याचा संदेश देणारे हे गाणे तसे संस्कारक्षम होते. पण आज काळ बदलला आहे. आज ना पप्पा, ना मम्मीला महत्व उरले आहे. आज दिवस बबड्याचे येत आहेत. झी मराठीवर सध्या हा बबड्या इतके हिडीस वर्तन करतो आहे की त्याचे समर्थन करणे हेही पापच म्हणावे लागेल. तरीही त्या बबड्याचे समर्थन आदेश बांदेकर आणि झी मराठी सारख्या संवेदनशील कलाकारांनी चालवले आहे, ही अत्यंत खेदाची बाब म्हणावी लागेल.

  अग्गबाई, सासुबाई या मालिकेच्या मंगळवारच्या भागात बबड्या जो धुमाकूळ घालतो तो अत्यंत गलिच्छ असा आहे. बायकांबद्दल, महिलांबद्दल, त्यांच्या क्षमतेबद्दल गलिच्छ बोलण्याची ही प्रवृत्ती कोणत्या बबड्याने आणली आहे? म्हणूनच प्रश्न पडतो की बबड्या सांगा कोणाचा असा प्रश्न विचारावासा वाटतो.
   कौटुंबिक मालिकेत असा बबड्या दाखवून कुटुंबव्यवस्था उद्धवस्त करायला निघालेला बबड्या दाखवला आहे. घरातील आई, बायको कोणाचीही कदर न करणारा एक घाणेरडा माणूस कसा काय दाखवला जाउ शकतो? अशा बबड्याचे प्रमोशन आदेश बांदेकर यांच्यासारखा संवेदनशील कलाकार करत असेल तर त्याचे खूप वाईट वाटते. जे आदेश बांदेकर दुसर्‍याचे दु:ख बघून डोळ्यात टचकन ज्यांच्या पाणी येते. अतिशय भावनाप्रधान आहेत, इमोशनल आहेत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देश गाजवून सोडला आहे आणि लाडके भाओजी झाले. वहिनीच्या डोळ्यातील अश्रू ज्यांचे हृदय हेलावून टाकतात तेच आदेश बांदेकर बबड्याचे प्रमोशत करतात. या मालिकेच्या प्रमोशनसाठी पैठणी देण्यासाठी घराघरात बबड्या शोधत फिरत आहेत. असला बबड्या कोणाला घरात असावासा वाटेल?
   कथानक इतके विकृत आहे या मालिकेचे की त्या निर्माता, दिग्दर्शकांनी आणि झी मराठीने ताळतंत्र सोडले आहेच, पण केवळ प्रसिद्धी आणि पैशासाठी आदेश बांदेकर यांच्यासारख्या संवेदनशील कलाकाराने, होय कलाकाराने कारण त्यांच्यातील कलाकाराला, सूत्रसंचालकाचा आम्ही आदर करतो, ते कोणत्या राजकीय पक्षाचे ब्रॅड अँबेसेडर किंवा कार्यकर्ते आहेत याच्याशी काही संबंध नाही. पण एकीकडे सिद्धीविनायकाच्या मंदीराचे विश्वस्त असलेल्या, संवेदनशील कलाकार असलेल्या आदेश बांदेकरांनी बबड्याचे प्रमोशन करावे हे न पटणारे आहे. पैठणीसाठी अनेक गोष्टी करता येतील. पंधरा वीस वर्ष महाराष्ट्रात पैठणीचा खेळ चालू आहे. त्यात अनेक कुटुंबे त्यांनी सावरली आहेत, जवळ आणली आहेत. अशा आदेश बांदेकरांनी कुटुंब व्यवस्था धुळीस मिळवणार्‍या कथानकातील बबड्याचे प्रमोशन करणे चुकीचे आहे.
   महिलांच्या कार्यक्षमतेवर अर्वाच्च भाषेत प्रश्न उपस्थित करणार्‍या बबड्याने मंगळवारच्या भागात एक सीन दिला. यात तो म्हणतो, पुरूष जे करू शकतात ते बायका करू शकतील काय? आपल्या आई आणि बायकोला तो प्रश्न विचारतो आणि एका हाताने खुर्ची उचलून आणतो. त्या खुर्चीवर पाय देउन उभा राहतो आणि अंगातील शर्ट काढतो. असे महिला करू शकतील का असे विचारतो.
हा भाग अत्यंत संतापजनक असा आहे. कुठलाही मुलगा कितीही दुष्ट झाला तरी आपल्या आई बायकोला असे कपडे काढून, शर्ट काढून दाखवाल का असे आव्हान देणार नाही. पण यातून झी मराठी आणि या मालिकेचे लेखक, दिग्दर्शक काय साध्य करू पाहतात? ही चक्क महिलांची अवहेलना आहे. असल्या बबड्याचे कौतुक करण्यासाठी या मालिकेच्या प्रमोशनसाठी आदेश बांदेकर घराघरात बबड्या आहे का म्हणून शोधत असतील तर ती मराठी संस्कृतीची अवहेलना आहे. महाराष्ट्राचा अभिमान आदेश बांदेकर बाळगत असतात. तेच या संस्कृतीची नकळत अवहेलना करत आहेत असेच वाटते.
   कोणताही पुरूष आजकालच्या जमान्यात नोकरी करणार्‍या महिलांवर इतके अत्याचार करेल असे कोणाला स्वप्नातही वाटणार नाही. पण त्या शुभ्रावर नाही नाही ते आरोप तो बबड्या करतो, तिला वाटेल तसे बोलतो हे एखाद्या विकृत मनोवृत्तीच्या लेखकालाच शक्य आहे. एक काळ असा होता की झी मराठी म्हणजे स्त्रियांचा सन्मान करणारी वाहिनी. स्त्रियांचा अनादर होईल असे कोणतेही वक्तव्य कोणत्याही मालिकेतून नसायचे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे होणार सून मी या घरची ही मालिका. या मालिकेत सातत्याने स्त्रियांचा आदरच करायचा असतो हे बोलून दाखवले गेले आहे. यातील कोणतेही पात्र आपली मर्यादा सोडत नव्हते. वाईटसाईट शब्द बोलत नव्हते. दुष्ट असलेल्या बाईशीही, जान्हवीच्या आईशीही कोणी वाईट बोलत नाही, असे दाखवले होते. महिलांचा आत्मसन्मान दाखवला जात होता. मग ती राधा ही बावरी मालिका असेल, जुळून येती रेशीमगाठी असेल, अगदी झी मराठी पूर्वी अल्फा वाहिनी होती तेंव्हाही आभाळमाया, वादळवाट अशा चांगल्या मालिका होत्या. यात कधीही महिलांचा अनादर केला गेला नव्हता. आदेश बांदेकर महिलांचे कौतुक करतात, त्यांच्याशी आदराने वागतात म्हणून तर महाराष्ट्राने नव्हे जगाने त्यांना डोक्यावर घेतले. पण तेच आदेश बांदेकर जर बबड्याचे प्रमोशन करत असतील तर ते महाराष्ट्राला आवडणार नाही. घराघरात कोणालाही बबड्या असावा असे वाटत नाही. त्यामुळे पैठणी वाटण्यासाठी त्यांनी बबड्या शोधणे थांबवले पाहिजे. त्याचप्रमाणे कसलाही दम नसलेली ही  बबड्याची मालिका संपवली पाहिजे.
लग्न झाल्यावर घरात आलेली सून आपल्या सासूचे लग्न लावते आणि त्यामुळे पिसाळलेला तिचा नवरा आपल्या नव्या बापाला स्विकारत नाही, बायकोलाही मानत नाही, हे कसले आले कथानक? राधिका 8 वर्षांचा अथर्व असताना, आपल्या जुना मित्र असलेल्या सौमित्रशी लग्न करण्यापूर्वी जग काय म्हणेल म्हणून किती विचार करताना दाखवली आहे. तीच आसावरी एवढा मोठा मुलगा, सून असताना लग्नाला कशी काय तयार होते? हे एकुणच न पटणारे काहीतरी दाखवून प्रेक्षकांचा चालवलेला छळ थांबवावा. यानिमित्ताने वाहिन्यांनाही सेन्सॉरबोर्डाच्या कक्षेत आणावे हे सुचवावेसे वाटते.  लॉकडाउनमुळे घरात बसवून काहीही बघायला भाग पाडणे म्हणजे प्रेक्षकांवरच अत्याचार आहेत. त्यामुळे ह बबड्या सांगा कोणाचा आहे, त्याचा जाहीर सत्कार करून त्याला आता नारळ देण्याची वेळ आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: