बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे

  आजपासून अनलॉक पाच सुरू होत असले तरी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशातील एकुण मृतांचा आकडा हा लाखाच्या दिशेने चालला आहे तर महाराष्ट्रात काल 35 हजार 500 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. सात महिने उलटून गेले तरी देशभरात कोरोनाने आपला विस्तार वाढताच ठेवला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशभरातील कोरोना बाधितांची संख्या 61 लाखाच्या पार गेली आहे. राज्यात शहरी तसेच ग्रामीणभागात कोरोनाने आपला विळखा घट्ट केला आहे. अपयशी सरकारी यंत्रणा आणि हतबल जनता अशी अवस्था सध्या अनुभवायला मिळते आहे.

सध्या राज्यात एका दिवसात सरासरी 20 हजारच्या घरात रुग्ण आढळत आहेत. परिणामी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 13 लाखांच्यापुढे गेली आहे. सरकार दावा करते आहे की रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.62 टक्के झाले असून मृत्यूदर 2.77 टक्के आहे. राज्यातील 515 मृत्यूंपैकी 302 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत. मुंबईत रोज सरासरी  2 हजार रूग्ण आढळत आहेत.
एकुणच संपूर्ण देशभरासह राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अद्यापही वाढत आहे. तरीही राज्याचा रिकव्हरी रेट 70.16 टक्के आहे. सद्यस्थितीस राज्यात 19 लाख लोक जण होम क्वारंटाईन आहेत, तर 37 हजार 198 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील दोन मंत्री, दोन खासदार यांच्यासह 14 आमदारांना कोरोनाने दणका दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे दोन मंत्री या आठवड्यात कोरोना बाधीत झाले. मंगळवारी मंत्री उदय सामंत यांना लागण झाल्याचे सांगण्यात आले. कोरोनाने अवघा महाराष्ट्र व्यापला असताना, गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे काही रुग्णालये रुग्ण दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. रुग्णाच्या जीवाशी खेळ होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे या रुग्णालयांचे म्हणणे आहे, तर खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेडस्ही सरकारने कोविड रुग्णांसाठी ताब्यात घेतले असूनही रुग्णांना योग्य उपचार मिळेनासे झाले आहेत. पुणे, मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजावाजा आणि कोट्यवधींचा निधी खर्ची टाकत जम्बो कोविड सेंटर घाईघाईने सुरु केली. महानगरांव्यतिरीक्त शहरांची परिस्थिती आणखी वाईट आहे. आता हिच सेंटर अनेकांच्या मृत्युस कारणीभूत ठरु लागली आहेत. राज्यातील कोविड सेंटरमध्ये आरोग्य सुविधांसोबत अनंत समस्या समोर असतानाच या सेंटरमधील महिलांची असुरक्षाही वारंवार स्पष्ट झाली आहे. कोरोना सेंटरमधील कर्मचारी, सफाई कामगार, अ‍ॅब्युलन्स वाहक आदींकडून असहाय्य कोरोना रुग्ण महिलांवर अत्याचार करण्यात आले आहेत. मागच्या आठवड्यात मुंबई महा पालिकेच्या मानखुर्द पीएमजीपी कोविड सेंटरमध्ये सॅनिटायझर करणा-या एका नराधमाने कोविड रूग्ण असणा-या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पुण्यात तर डॉक्टरांनीच सहकारी महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेने कोविड सेंटरमधील महिला सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजवर राज्यातील कानाकोप-यात अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
एरवी महिला अत्याचाराबाबत विविध आघाड्यांवर लढणार्‍या महिला या घटनांकडे किती तटस्थपणे पहात आहेत, त्या नेत्या अचानक बोलेनाशा का झाल्या हे न कळणारे आहे. म्हणजे एकीकडे महिला रुग्णांबाबत असुरक्षितेचे वातावरण असतानाच बहूतांश कोव्हिड रुग्णांकडून मोठ्या रकमेची बिले आकारणे, वेळेत उपचार न देणे, निधनानंतर भलत्याच व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देणे, पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना महिलेचा मृतदेह ताब्यात देणे, रुग्णांना वेळेत दाखल करुन न घेणे अशा न संपणार्‍या संकटाची मालिका राज्यभरात दिसते आहे. राज्यात सद्यघडीला 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते. तर सध्या राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गरज 1500 मेट्रिक टन इतकी वाढली आहे. ऑक्सिजनचा 500 मेट्रिक टन इतका अपुरा पुरवठा असतानाही, ऑक्सिजनचा नेमका किती उपयोग केला जात आहे, त्याचे दररोज ऑडिट केले जात नाही.
  ही गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. आता मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. 15 ऑक्टोबरपयर्र्ंत या योजनेला यश आले तर बरे होईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी  राज्यातील सर्वच यंत्रणांना कामास लावले आहे. राज्यात आवश्यकतेइतके ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कबुल केले आहे. आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे आवाहन करताना राज्य सरकारने मोठी जबाबदारी घेतली आहे. त्याचा चांगला परिणाम होईल आणि घराघरात तपासणी करण्याने नेमकी परिस्थिती आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे. राज्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अजूनही ग्रामीण भागातील जनता या आजाराबाबत आणि त्याच्या परिणामाबाबत गंभीर नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलीस नियमांचा आधार घेत आपले खिसे भरून घेण्याचे काम करीत आहेत, तर खासगी लॅब, हॉस्पिटल यांनी आपला धंदा तेजीत ठेवला आहे. महाराष्ट्राने आजवर अनेक साथीच्या आजारात रोल मॉडेल तयार केले आहेत. हे करताना समाजातील नेमकी स्थिती, उपाययोजना, तज्ज्ञमंडळी, सत्ताधारी, विरोधक यांची वज्रमूठ बांधली होती. त्याची पुनरावृत्ती होण्याची गरज आहे. त्यातून आता लवकर बाहेर पडले पाहिजे. महाराष्ट्र जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत देश सुरु झाला असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्र, मुंबई ही देशाची पोशिंदा आहे. म्हणून लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न असायला पाहिजेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य दोघांचे सख्य आता होण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: