सध्या ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होमची चर्चा जोरात आहे. अनेकांना ते अडचणीचे वाटत आहे. पण कोरोना हे केवळ निमित्त आहे. कोरोना आला नसता तरीही या बदलाला आपल्याला आज ना उद्या स्विकारावेच लागले असते. कोरोनामुळे ते अचानक स्वीकारले इतकेच.
पालक म्हणून आपली मुले शाळेत जात नाहीत, ती घरात आहेत म्हणून अनेकांना त्यांच्या भवितव्याची चिंता लागलेली आहे. कारण घरच्यांसाठी पुस्तके, वही आणि लिहीत राहाणे म्हणजे अभ्यास असा त्यांचा दृष्टिकोन झाला होता. पालकांसाठी अभ्यासाची दृष्टी वेगळी बनली आहे. मुलांसाठी अभ्यास म्हणजे वेगळी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या व्याख्या भिन्न आहेत. मात्र कोणतेही मुल जे काही करू पाहाते ती प्रत्येक गोष्ट ही अभ्यास असते. त्या प्रत्येक कृतीतून शिक्षण होत असते. ते शिक्षण सुरू राहावे या करीता प्रेरणा देण्याची गरज आहे. हाताने काम करणे, डोळ्याने पाहाणे, डोक्याने विचार करणे आणि हृदयाने प्रेम करणे हे शिक्षण आहे. त्या शिक्षणाचा प्रवास मुलांचे आणि राष्ट्राचे भविष्य बदलेल. सध्या देशभरात कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे शाळा बंद आणि अभ्यास सुरू अशी स्थिती आहे. फक्त मुले जे काही करतात त्यांना अभ्यास म्हणायचे, की नाही हा फक्त प्रश्न आहे. घर आणि शाळेच्या वातावरणात अभ्यासाच्या संकल्पना फारच मर्यादित झाल्या आहेत. त्यानुसार पुस्तकांच्या अवतीभोवती जे काही करणे सुरू असते ते वहीवर लिहिणे, कविता, पाढे पाठ करत म्हणणे, पुस्तक घेऊन सुरू असणारे वाचन म्हणजे अभ्यास असतो. पुस्तक आणि शाळेकडून देण्यात येणार्या अभ्यासापलिकडे शिक्षणाचा विचार पुढे जात नाही. त्यामुळे मुले त्याच त्याच माहितीला वैतागतात. हाताने करून पाहाण्याची संधी देणारे शिक्षण वाटत नाही. खरेतर अभ्यासाची विविध तंत्रे आहेत. त्या तंत्राचा विचार सध्याच्या शिक्षण विषयक दृष्टीकोनात असूनही त्याबाबत अधिक जागृती घडवून आणण्याची नितांत गरज होती. ती यानिमित्ताने मिळत आहेत. अनेक मुले यूट्यूब आणि अन्य इंटरनेट सुविधांच्या माध्यमातून सर्फींग करत आहेत, स्वयंअध्ययन करत आहेत. ही खरंच चांगली बाब आहे. आमच्यावेळी हे नव्हतं, म्हणून त्यांना अडवणे आता चुकीचे आहे. कारण नव्या प्रवाहात त्यांना पुढे जाण्याची ही संधी आहे. कारण ते सर्व स्वयंअध्ययनातून होणारे प्रकटीकरण असणार आहे. आणि सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की हे कोरोनाने केलेले नाही तर काळाच्या गरजेने घडत आहे. कोरोना आला नसता, लॉकडाउन झाले नसते तरी आपल्याला केव्हा ना केव्हा हे स्वीकारावेच लागले असते.आज मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या भोवती अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायांचा उपयोग शिक्षणाच्या प्रक्रियेत करण्याचा विचार केला गेला तरी मुलांचे व्यापक अंगाने शिक्षण सुरू होऊ शकते. अनेकदा आपल्या परिसराला शिक्षणाचे माध्यम म्हणून विचार केला तर आपणाला खूप काही साध्य करता येण्यासारखे आहे. अनेकवेळा मुलांची प्रत्येक कृती ही अनावश्यक असते असे समजले जाते. म्हणजे, वर्तमानपत्र, नियतकालिके, गोष्टीची पुस्तके वाचणे म्हणजे वेळ वाया घालविणे असते. सामान्यज्ञानाचे पुस्तक वाचने म्हणजे अभ्यास आणि नियतकालीकातील माहिती वाचणे म्हणजे वेळ घालविणे अशा आमच्या संकल्पना झाल्या आहेत. या संकल्पना सोडून देण्याची नितांत गरज आहे. वर्तमानपत्र, नियतकालिक वाचणे हाही अभ्यास असतो. ते करणे म्हणजे जगात सध्या काय सुरू आहे त्याची सविस्तर माहिती मिळविणे असते. अग्रलेख वाचणे, निरनिराळ्या सदरांचे वाचन हा देखील अभ्यास असतो. रेडीमेड जनरल नॉलेजच्या पुस्तकांपेपा वर्तमानपत्र वाचून सामान्यज्ञान मिळवणे अधिक आनंददायी आणि अधिक काळ स्मरणात राहाणारे आहे. यामुळे आकलन क्षमतेचा विकास होण्यास मदतच होत असते. वर्तमान पत्रांच्या रविवार, तसेच इतर साप्ताहिक पुरवण्यादेखील विद्यार्थ्यांना समृध्द करणार्या ठरतात; पण वर्तमान पत्रात रमणारे विद्यार्थी म्हणजे अभ्यासापासून परावृत्त झालेले अशीच साधारण धारणा असते. पुढे भविष्यात मग स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीता प्रयत्न सुरू झाले, की वर्तमान पत्राचे वाचन अनिवार्य बनते. वर्तमान पत्राचे वाचन शालेय जीवनात देखील महत्वाचे असते. त्यामुळे वाचन गती वाढते,त्याच बरोबर अवांतर वाचनाची सवय वाढते. विद्यार्थ्याचे अभ्यासाचे विश्व अधिक व्यापक होते. विद्यार्थ्यांच्या विविध स्तरावर त्यांना कृती करण्यास जे काही सांगितले आहे त्या प्रमाणे ते शिकत जातात. आपल्याकडे वर्गाच्या, पाठ्यपुस्तकाच्या पलिकडे जे काही होते आहे त्याला शिक्षण म्हणायचे नाही असे जणू ठरले आहे. त्यामुळे विद्यार्थी या गोष्टी करण्यास धजत नाही आणि पालक त्यात मुलांना रमू देत नाही. सध्या कामाच्या शोधात असलेल्या पिढीचे वाचन कमी आहे. पण ही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणारी पिढी त्यांच्यापुढे जाईल. कारण स्वत: वाचून अभ्यास करण्यची, शोधून काढण्याची सवय त्यांना लागेल. म्हणूनच काळाच्या प्रवाहात आपण वहात जात नाही तर नव्या प्रवाहात आपण काहीतरी चांगले करणार आहोत हा विश्वास प्रत्येकाने ेआपल्या पाल्यावर टाकण्याची गरज आहे. शिक्षणाच्या परीक्षेत किती गुण मिळतात यापेक्षा तो जीवनातील प्रश्नाला कसा सामोरे जातो हे महत्वाचे आहे. त्यासाठी शिक्षणासंबंधीचे उपक्रम अधिक उपयोगी पडतात हे लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच आता गुणांकडे न पाहता, मुले जर काही घरात बसून वेगळे करत असतील तर ते करूद्या. नव्या शिक्षणाचा त्यांना मनापासून आनंद घेउद्या. यात कोणाला काही अडचणी आल्या तर त्याचे खापर कोरोना किवा लॉकडाउनवर फोडू नका, कारण कोरोना आला नसता तरी ही शिक्षणपद्धती आज ना उद्या आलीच असती. दहा पंधरा वर्षांपूर्वी शाळेत जेंव्हा डिजीटल स्क्रीन बोर्ड आले तेंव्हाच हे समजायला हवे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा