अनलॉक, पुनश्च: हरिओम म्हणता म्हणता राज्यात आणि देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. देशात गेल्या 24 तासांत 96 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित आढळले. लवकरच या गतीने दररोज लाखांची नोंद होेण्याची भिती आहे. एकट्या महाराष्ट्रात शुक्रवारी एका दिवसात 24 हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात दररोज 25 हजारांपेक्षा जास्त नोंद होण्याची चीन्हे आहेत. अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाउन वाढवला जात आहे. तर कोल्हापुरात कालपासून जनता कर्फ्यू पुकारला गेला आहे. ही सगळी चिंतेची बाब आहे. नव्याने बाधित सापडण्याचा विक्रम रोज प्रस्थापित होतोय व 24 तासांत मोडलाही जातो आहे. पुणे शहरातील आकडाही दिवसभरात दोन हजारच्या पार जातो आहे. सातारसारख्या जिल्ह्यात दररोज 900 च्या आसपास रूग्ण सापडत आहेत. त्यामुळेच वाढत्या बाधितांचे प्रशासनालाही टेन्शन आले आहे. प्रशासन त्यांच्या परीने काम करत आहेच. मात्र मध्यंतरी खाली आलेला आकडा आता सेन्सेक्सने उसळी मारावी त्याप्रमाणे एकाएकी वाढू लागल्याने चिंतेची बाब निर्माण झालेली आहे.
करोनासह जगायला शिका हे गेल्या काही दिवसांपासून बिंबवले गेले आहे. करोनामुक्त होणार्यांचे प्रमाण वाढते आहे, हेही समोर आले. मृत्यूदर घटतोय हेही स्पष्ट झाले आहे. कदाचित येथेच सगळे बिघडले आहे का? औषध नाही व माणूस मरतोच ही जी भीती सुरुवातीच्या टप्प्यात होती ती पूर्णत: लोप पावली आहे. तिचा लवलेशच नाही. करोनासह जगा म्हणजे करोनाला आमंत्रण देत फिरा, असा सोयीस्कर अर्थ काढला गेला आहे. त्यामुळे अगोदर भयापोटी जी जागरूकता ठेवली जात होती, ती पूर्ण नाहीशीच झाली आहे. पिंजर्यातून बाहेर पडल्यासारखी माणसं एकाएकी फिरायला लागली अन पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला. हे अत्यंत भयावह चित्र आहे. यात बरीचशी निष्काळजी आहे. म्हणजे लक्षणे आढळल्यानंतरही रुग्णालयात जाण्यास विलंब केला जातो आहे. त्याचा तक्ताच माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. लक्षणे जाणवायला लागल्यावर पहिल्याच दिवसात रुग्णालयात दाखल होणार्यांचे प्रमाण केवळ दहा टक्के आहे. दोन-चार दिवस स्वत:लाच तज्ज्ञ समजून बिनधास्त राहणारे आणि राजरोसपणे बाहेर फिरत स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालणार्यांचे व त्यानंतर अगदी गॅसवर जायची वेळ आल्यावर रुग्णालयात दाखल होणार्यांचे प्रमाण जवळपास 31 टक्के आहे. पाच-सहा दिवस किंवा एक आठवडा ते वाट पाहतात. त्यानंतर डॉक्टरांकडे जातात. त्यांचीही संख्या अनुक्रमे 12 टक्के आणि 39 टक्के आहे. 10 टक्के लोक अगदी नाईलाज म्हणून व आता पर्याय नाही अशी डॉक्टरांवर व प्रसंगी शहरावर उपकार केल्याची भावना घेऊन आठवडाभरानंतर दाखल होतात. सर्दी-खोकला, घसा दुखणे, ताप ही लक्षणे आहेत. मात्र ते झाले म्हणजे करोनाच झाला असेही नाही. पण हे डॉक्टरांना ठरवू द्या. त्यांच्याकडे एकदा जाण्याचे कर्तव्य तरी पूर्ण कराल की नाही. अगदी आठवडाभर आजार अंगावर काढल्यावर आणि तोपर्यंत सर्रास तो गावभर मिरवल्यावर रुग्णालयात जाण्याचा मार्ग अनेकांनी स्विकारला. तिथेच गडबड झालेली दिसते. हा भीतीचा आणि बेफिकिरीचाही प्रकार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच उपचार सुरू केले तर करोनावर मात करता येऊ शकते. तुम्ही जेवढा विलंब कराल तेवढा तो तुमच्याशी घातक खेळ खेळेल.आज जगभरात करोनाने महासत्तांनाही गुडघ्यावर बसवले आहे. शिस्त, स्वच्छता आणि जबाबदारीची वर्तणूक याकडे त्या लोकांचा कटाक्ष होता. त्यामुळे करोना हद्दपार झाला नसला तरी काबूत ठेवण्यात ते यशस्वी झाले. आपण पाच महिने सगळे बंद ठेवून आहे तेथेच पुन्हा येऊन थांबलो अशी परिस्थिती आहे. तसे जर नसते, तर एव्हाना बाधितांचे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली असती. आजही बाधितांची संख्या करोनामुक्तांच्या संख्येपेक्षा जास्त आढळते आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यांत ही स्थिती आहे.
महाराष्ट्रातही मुंबई आणि पुणे या दोन अति महत्वाच्य शहरांनाच या रोगाने ग्रासले आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा यंत्रणा रस्त्यावर दिसत होती. त्यामुळे काहीसा अटकाव करण्यात यश आले होते. मात्र जूनच्या अनलॉक’पासून प्रशासनानेच गांभीर्य कमी केले. आपली यंत्रणा मागे घेतली. त्यामुळे भय संपले असा तर्क आहे. तो चुकीचा असल्याचे कोणी म्हणणार नाही. मात्र, अडीच तीन महिने मुर्खांनाही शिकवण्यासाठी पुरेसे होतात. आपण काय संकटात आहोत, याची जाणीव जर सुसंस्कृत शहरांमध्ये राहणार्यांना सगळ्याच माध्यमांतून माहितीचा मारा होत असूनही जर होत नसेल तर त्याला केवळ प्रशासनच जबाबदार आहे का? करोनामुळे व्यवहार थांबायला नकोत हेही खरे. अन्यथा महामारीच्या नावाखाली महामंदीला आमंत्रण दिल्यासारखे होईल. किंबहुना तसे अगोदरच दिले गेले आहे. जर तुम्हाला काम करायचे असेल आणि करोना नको असेल तर किमान खबरदारी घ्यावीच लागेल. पुण्यासारख्या शहरात हेल्मेटला विरोध करणारी प्रवृत्ती मास्कलाही विरोध करते आहे. पण हे आपल्या भल्यासाठी आहे हे लोकांना समजायला नको का? मास्क पोलिसांना दाखवण्यासाठी नाही, तर तुमच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आहे, हे सांगायला का लागते?
आता कोरोनाला बरोबर घेउन जगायचे असेल आणि इतरांनाही जगू द्यायचे असेल तर दक्षता घेतली जावी हीच काळाची गरज आहे. आपल्या निष्काळजीपणाने प्रादुर्भाव वाढत गेला तर त्याला प्रशासनाला दोष देण्यात अर्थ नाही. अनावश्यक फिरायला जाणारे, बँकांमध्ये गर्दी करणारे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक पाहिले की चीड येते. सगळे व्यवहार ऑनलाईन होत असताना उगाच लोक बँकांमध्ये गर्दी करायला कशाला जातात? अशा अनेक कारणांनी गर्दी करणारे हे लोक धोकादायक ठरत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा