गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे सारे जग थांबले. हवा प्रदूषित करणारी सर्व वाहनांचे सायलेन्सर, कारखान्यांची धुराडी बंद झाली. पण निसर्ग आपले काम करत होताच. त्याने हवा आणि पाणी शुध्द करण्याचे काम नेहमीप्रमाणे केलेच. पण आता सर्व व्यवहार पुन्हा सुरु होताहेत. जागतिक अर्थव्यवस्था पूर्ववत होताना कर्ब उत्सर्जनाचा दर हा अधिक असणार आहे. पायाभूत विकासाचे प्रकल्प राबवताना सर्व हरित उपाययोजना या पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यासाठी लाभकारक ठरणार आहेत. हरित धोरण आणि पर्यावरणपूरक उद्योग यांना प्रोत्साहन देणे यापुढे महत्वाचे ठरणार आहे. कारण देशातील नवीन पिढी ही पर्यावरणसाक्षर आणि निसर्गप्रेमी आहे. अगदी विविध मालिका आणि चित्रपटातूनही नवी पिढी याची जनजागृती करत आहे. पेपरलेस होताना दिसत आहे. पण यातून एकच लक्षात येते की सरकार कोणाचेही असो पण यापुढे शाश्वत विकासाच्या धोरणाला पर्याय असणार नाही. त्यामुळे कर्ब उत्सर्जन कमी असणारे तंत्रज्ञान यापुढे सिध्द होणार आहे. शिवाय शाश्वत शेती, नैसर्गिक अधिवास पुरुज्जीवन प्रकल्प, निसर्ग संशोधन, पर्यावरण शिक्षण, आणि जनजगृती यांनाही महत्व लाभेल, यात शंका नाही. कोरोना पश्चात अर्थचक्र गतिमान करून नवी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणे ही काळाची गरज झालेली आहे.
यापूर्वी देशाने प्रधानमंत्री ग्रामसडक, सुवर्ण चतुष्कोण योजना राबवल्या आहेत आणि आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हाती घेण्याचे काम चालू आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्दयाप रखडलेले आहेत. असे प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याने अथवा न केल्याने झालेल्या फायदा तोट्याला आपणच जबाबदार आहोत. पण मंदावलेले अर्थचक्र गतिमान करण्यासाठी आता सार्वत्रिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.या मंदावलेल्या अर्थचक्रानंतर खरंतर देशाने नदी जोड योजनारूपाने त्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. आता राज्यपातळीवर याचा विचार करावा लागेल. गेल्या वर्षीचा कोल्हापूर सांगलीचा पूर, यंदाचा विदर्भाचा पूर आणि सोबत राज्याच्या काही भागात दुष्काळ याचा एकत्रित विचार करावा लागेल. म्हणजे गेली दोन वर्ष संकटांची मालिकाच येताना दिसत आहे. याने संपूर्ण अर्थचक्र थांबले आहे. रोजगार गेला आहे. व्यापार ठप्प झाला आहे. पुरामुळे आणि दुष्काळामुळे देशाला मोठे नुकसान सहन करावे लागते. याला कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर पूर नियंत्रण, नदीपात्रातील आणि धरणातील गाळ काढणे हे एक महत्वाचे काम हाती घेता येऊ शकते. यामुळे नदी पुनरुज्जीवन, दुष्काळी भागाला पाणी पुरवठा, पडीक जमीन विकास, गाळमुक्त प्रवाह आणि गाळयुक्त शिवार हे साध्य होऊ शकते.
नदया सांडपाणी, मैलापाणी, औद्योगिक क्षेत्रातील टाकाऊ रसायनमिश्रित पाणी यामुळे प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे शुन्य टाकाऊ पाणी ही संकल्पना राबवून उगम ते संगम असे नदी स्वच्छतेच्या कामाशिवाय पर्याय नाही. पर्यावरण हा विषय येत्या दशकात कळीचा मुद्दा होणार आहे. त्यामुळे त्याला पुरेसे गांभीर्याने घेणे अगत्याचे आहे. कोरोना आणि लॉकडाऊन जर नदी स्वच्छ करण्यास हातभार लावू शकतो तर मग आपणही नदी स्वच्छ राखण्यासाठी कायम सतर्क राहायला हवे. नदीचे पुनरुज्जीवन आणि प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता यात लाखो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी आहेत. नदया, परिसंस्था, पर्यावरण, जैव श्रुंखला, जैव विविधता यांचे संरक्षण आणि संवर्धन हाच यापुढे शाश्वत विकास आणि नैसर्गिक जीवनशैलीचा पाया असणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
गेल्या सहा सात महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व समाजजीवन हवालदिल झाले होते. पण आयुर्वेद आणि निसर्गोपचार अंगिकारलेल्या लोकांना याचा त्रास झाला नाही. मग ते गोरगरीब असो वा मध्यमवर्गीय. निसर्गपूरक जीवनशैली ही जगवणारी, तारणारी, पोसणारी आहे. पोट भरण्यासाठी अथवा दोन पैसे कमावण्यासाठी हवे असलेले सर्व निसर्गातून मिळू शकते. आदिवासी, कातकरी, वनवासी बांधव आणि शेतकरी यांनी हेच तत्व जोपासलेले आहे. कोरोनामुळे लोकांना सोपी नैसार्गिक जीवनशैली महत्वाची आहे,हे उमगले आहे. यापुढे पर्यावरण आणि निसर्गाचे महत्व वाढणार आहे ते यामुळे. म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची गरज आहे. त्यासाठी निसर्ग पर्यावरण यांचे संरक्षण करणे आणि त्यातून विकास साधणे महत्वाचे आहे. निसर्ग जोपासनेबाबत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याची गरज आहे.
कोरोनापश्चात अर्थचक्र संथगतीने सुरु आहे. त्याचे मंदत्व नष्ट झाले आहे. अनलॉकने लोकांना उदयोग, धंदे आणि रोजगार यासाठी पुन्हा रुजू केले आहे. हाताला काम आणि पोटाला अन्न ही प्रत्येकाची मुलभूत गरज आहे. आता पुरेशी काळजी घेऊन लोक पोटापाण्याच्या कामाला लागले आहेत. कारखाने आणि कंपनी सुरु होत आहेत. राज्यात विजेची मागणी वाढत आहे. जीवन जगण्यासाठीच्या आवश्यक वस्तु, निकडीचे सामान, गरजेच्या गोष्टी या सर्वांना आता वाढत्या मागणीचे वेध लागले आहेत. कारण दसरा, दिवाळी, नाताळ हे सण तोंडावर आहेत. येत्या काळात मागणी वाढून अर्थचक्राला गति मिळेल. पण त्याचवेळी निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेत प्रदुषण रोखण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोरोना आणि केंद्र शासनाच्या नावाने आपण किती काळ आदळआपट करणार ? आपले जीवनचक्र आणि समाजव्यवस्था ही एकमेकावर अवलंबून आहे. कोणत्याही कारणाने ही व्यवस्था खंडीत होत नाही. या व्यवस्थेतून अर्थचक्राला बळ लाभते. छोटा मोठा व्यवसाय, लघु उद्योग, कुटीरोद्योग, कारखानदारी, असंघटीत क्षेत्रातील कामकाज, शेतीवाडी, दळणवळण, कॉर्पोरेट आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामकाज यांना आता गति लाभत आहे. कोटयावधी देशवासी शक्य होईल त्या पद्धतीने सुरक्षा बाळगून कोरोनाचा सामना करत आता जीवनाच्या संघर्षात उतरत आहेत. त्यामुळे कोणी आपल्याला मदतीला धावून येईल असा विचार न करता आपणच आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करण्यासाठी सिद्ध होण्याची गरज आहे. रखडलेली कामे, पर्यावरण संतुलन यातून नवरोजगार निर्मिती होउ शकते.त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा