एक काळ असा होता की त्यावेळी देवानंद, फिरोजखान यांचे चित्रपटातून अमली पदार्थांची तस्करी, त्याचा प्रसार करणारे रॅकेट, गुन्हेगारी जगत दाखवले जायचे. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांनी हा विषय घेउन चरस, अफू, गांजा, हेरॉईन अशा नशिल्या पदार्थांची तस्करी आणि त्याचा प्रसार कसा केला जातो यावर चित्रपट बनवले. हेरॉईन, अफिम, चरस ही नावेही सामान्यांना चित्रपटामुळे समजली. पण त्यात तत्थ्य होते, आहे आणि बॉलीवूडमधीलच अभिनेते त्याच्या अधिन आहेत हे गेल्या काही दिवसातील सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासानंतरच्या चर्चेतून दिसून येत आहे. त्यामुळे पडद्यावरचे हेच नायक वास्तवातील खलनायक आहेत का असा प्रश्न पडतो.
खरं तर ही एक फार मोठी कीड या देशाला या अभिनेत्यांनी लावली असेल तर या सर्वच अभिनेते आणि बॉलीवूडवर बहिष्कार टाकावा लागेल. कारण गुन्हेगारी जगताइतकेच भयानक वास्तव या बॉलीवूडकडून येताना दिसत आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील काळ्या दुनियेचे वास्तव अनेक अंगाने उजेडात येते आहे. बॉलिवूडची ही नशिली बाजू, अंडरवर्ल्डसोबतचे संबध, राजकीय मैत्री, पोलिसांकडून सातत्याने मिळणारे सुरक्षा कवच या गोष्टी मुंबईकरांनाच नाही तर संपूर्ण राज्याला नव्या नाहीत. त्या सतत चर्चेत असायच्या. 1990 च्या दशकात दाउदच्या पार्टीला अनेक अभिनेते दुबईला गेल्याचे प्रकरण गाजले होते. तिथे जाउन भारताचे राष्ट्रगीतापासून अनेक गोष्टींची टर मिमिक्री कलाकारांनी उडवली होती. त्यावरूनही वादंग माजले होते. गुन्हेगारी जगत आणि नशिली पदार्थांची तस्करी म्हटले की सर्वात प्रथम नाव येते ते सध्या दाउदचे. म्हणजे सुशांतसिंगची तपासाची चक्रे फिरत असताना, ड्रग माफियांचा उल्लेख होत असतानाच दाउदचा धमकीचा फोन येतो. हे सगळे एकमेकांशी जोडले असल्याशिवाय कसे काय शक्य आहे? त्यामुळेच आजचे पडद्यावरचे नायक खलनायक ठरताना दिसत आहेत.
ड्रग माफिया आणि सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण, यावरून सध्या मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण तापू लागले आहे. या प्रकरणात आरोपी असणारे सर्वचजण अमलीपदार्थाचे सेवन आणि वहन, खरेदी विक्रीमध्ये गुंतल्याचे समोर येत आहे. आणि नेमके इथेच मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाकडे संशयाची सुई फिरते. येत्या काही दिवसांत हे प्रकरण तडीस जाईल आणि यातील अनेक दिग्गज रथी महारथी समोर येतील. या संपूर्ण प्रकरणावर नजर टाकली तर हेच लक्षात येते की, मुंबईमध्ये अमली पदार्थाची विक्री, खरेदी आणि सेवन यास बंदी असूनही राजरोसपणे याचा गोरख धंदा सुरु आहे. कोरोना लॉकडाउनमुळे बंदी असल्यामुळे याला थोडा आळा बसला असावा पण जर मुंबईतील नाईटलाईफ सुरू झाले असते तर याचा प्रसार झपाट्याने वाढला असता हेही सत्य यानिमित्ताने समोर येताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सुरळीत झाल्यानंतर नाईटलाईफबाबतही पुन्हा विचार करावा लागेल.
बॉलीवूडच्या कलाकारांचा वापर करून अमली पदार्थांचा प्रसार केला जातो. रिया, कंगना आणि अनेक जणांनी अनेक अभिनेत्यांची नावे यात गोवली होती. अगदी शाहरुखखान, सलमानखानपासून अनेकांची नावे यात चर्चीली गेली.1980 च्या दशकात बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला संजय दत्त हा तर चरसी होता म्हणून त्याला उपचारासाठी परदेशातही पाठवल्याचे सर्वश्रृत आहे. दारूपार्टी, हुक्कापार्टी करता करता बॉलीवूडने मुंबईत अमली पदार्थांचे विष पेरले. त्यात गुन्हेगारीजगताशी असलेल्या संबंधांमुळेच हे शक्य झालेले आहे. म्हणूनच ही सगळी कीड रोखण्यासाठी या सर्वांवर बॉलीवूडवर बहिष्कार टाकूनच हे साध्य करता येईल.
बॉलीवूडच्या अनुकरणाने अमली पदार्थांचा विळखा फक्त महाविद्यालयीन तरुणांभोवतीच नाही, तर तो संपूर्ण समाजाला पोखरतो आहे. दिवसेंदिवस यातील आरोपींची कार्यपद्धती बदलत चालली असल्याने यांची पाळेमुळे शोधून त्यांचा नायनाट करणे, हे आव्हान पोलीस यंत्रणेसह समाजापुढे उभे ठाकले आहे. अमली पदार्थांपासून आपण खरेच तरुण पिढी आणि समाजाला वाचवू शकणार का, असा प्रश्न उद्विग्न करतो आहे. नशिल्या पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यसनींच्या कुटुंबाची वाताहत कशी रोखता येईल, हाच मोठा प्रश्न आहे.
आज मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अमली पदार्थ सेवनाचे प्रकार वाढले असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी अमली पदार्थ विकणार्यांना कठोर शिक्षेची तरतूद असली पाहिजे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थाची कुरिअर आणि पोस्टामार्फत विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. होम डिलिव्हरी फूड पार्सलमधून विक्री करणे आणि घरपोच सेवा देणे हा नवा फंडा गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत वापरला जातो आहे. हा सर्व बाजार देशाच्या विविध शहरातून हाताळला जात आहे. अनेकदा यातील आरोपींना शोधणे कसरतीचे ठरते आहे. मुंबईतील कुर्ला, कळवा, मुंब्रा या भागात रेल्वेच्या पुलांवरही अनेक लोक गर्दुल्ले म्हणून ओळखले जातात. त्यांची दहशतही फार मोठी आहे. वेगवेगळ्या कारणांनी अशा अमली पदार्थांच्या वापरापर्यंत पोहोचणा-या मुलांना आणि त्यांच्या पालकांना योग्य माहिती योग्य वेळी मिळाली, तर त्यांच्या आयुष्याची वाताहात थांबवता येईल. अमली पदार्थाच्या सेवनाचे वाढते प्रस्थ ही फार मोठी डोकेदुखी आहे. त्यात बॉलीवूडचे असलेेले योगदान हे अत्यंत घातक असल्याने यातून कोणीही सुटता कामा नये. राज्यकत्यार्र्नी आणि राजकारण्यांनीही देशहितासाठी कोणाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करू नये हीच अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा