बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

शिक्षणाच्या आयचा घो

  मराठी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी काही  वर्षांपूर्वी शिक्षणाच्या आयचा घो नावाचा चित्रपट काढला होता. त्यापासून कोणी काय बोध गेला हा संशोधनाचा आणि वेगळा विषय असला तरी आमच्या शिक्षण खात्याने अत्यंत विनोदी असा तुघलकी कारभार करून या चित्रपटाचा सिक्वल काढला आहे. कोरोनाच्या आणि लॉकडाउनच्या निमित्ताने मात्र आता शिक्षणाच्या आयचा घोव झालेला आहे हे नक्की.

  फक्त या सिक्वलमध्ये प्रत्येक पात्र हे तुमच्या आमच्या घरातील प्रत्येकाचे मूल असणार आहे. याची देही याची डोळा ज्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे झाल्याचे पाहायचे आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट घडतो आहे. खुद्द सरकारच याचे निर्माते आहेत असे वाटते. याचे कारण कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असले तरी त्याचा कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर तयार नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे. 2020 मध्ये कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेलेले आहे हे गृहीत धरायचे आहे. आई वडिलांच्या दृष्टीने आणि शिक्षकांचा पगार चालू राहण्याच्या दृष्टीने हे वर्ष चालवले आहे. पण यातून मुले काय शिकणार आहेत हा एक प्रश्नच आहे.
   मुलांना कसलेही प्रश्न पडले तर ते शिक्षक सोडवू शकत नाहीत. खाजगी क्लासेस बंद आहेत. ऑनलाईनच्या नावाखाली शिक्षक कसलीतरी लिंक टाकतात आणि पंधरा वीस मिनीटे बरळत बसतात. ना त्यांचा आवाज मुलांपर्यंत पोहोचतो ना त्यांना काय म्हणायचे आहे ते मुलांना कळते. फक्त कागदोपत्री शिक्षण आहे. पण ज्ञानात काहीही भर पडत नाही. मुले स्मार्ट फोन चालवायला शिकली, व्हीडीओ कॉन्फरसींग करायला शिकली पण अभ्यासातले त्यांना काही कळाले आहे असे वाटत नाही. मराठी, इतिहास, भूगोल हे विषय वाचून समजतील एकवेळ. पण गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे काय? संस्कृतचे काय? एकुणच अभ्यासाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. एक वर्ष पुढे ढकलून वरच्या वर्गात गेल्यासारखी मुले दिसतील पण त्यांचा एक वर्षांचा मजला रिकामा राहणार आहे हे नक्की.
 याचे कारण ऑनलाईन शिक्षण देण्याची वेळ आल्यावर त्याबाबत काय तयारी असली पाहिजे, शिक्षकांनी ते कसे शिकवायचे आहे? याबाबत कसल्याही सूचना शाळांना दिल्या गेल्या नाहीत. शिक्षकांना मतलब आपला मीटर चालू आहे याचा, आपला पगार सलामत तो अभ्यासक्रमाचे काही का होईना असा पवित्रा दिसतो आहे. त्यामुळे एकुणच या शिक्षणाचे बारा वाजलेले दिसत आहेत. त्यामुळे पालकांवर शिक्षणाच्या आयचा घोव असे म्हणायची वेळ आलेली आहे.
    पहिली दुसरी आणि बालवयातील मुलांमध्ये चंचलता असते. एकाग्रता नसते. अशी मुले ऑनलाईन कसे काय अभ्यास करू शकतील? एकुणच सगळा बट्टयाबोळ झालेला आहे. सरकारने शिक्षण खात्याने याबाबत काहीही ठोस निर्णय घेतला नाही. शिक्षण खात्याने आपले राजकीय हीत डोळ्यापुढे ठेवून शिक्षकांचा पगार, पोरशन कमी करणे याकडे लक्ष दिले. पण जो उर्वरीत पोरशन आहे, जो अभ्यासक्रम आहे तो कशाप्रकारे शिकवायचा आहे याच्या काही सूचना दिलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वाधिक नुकसान होत आहे.
प्रत्येक शिक्षक पाट्या टाकल्याप्रमाणे दिवसातून एकदा काहीतरी पोस्ट करताना दिसत आहेत. व्हॉटसअपवर पोस्ट करावे तसे काहीही पोस्ट करताना दिसत आहेत. काही शिक्षक तर हाताने लिहितात, त्याचा फोटो काढतात आणि गृपवर टाकतात. व्हॉटसअपगृपवर सर्व विद्यार्थ्यांना असे पोस्ट केले की झाले शिकवणे. यातून विद्याथ्यार्र्ंना काय समजणार आहे? ते समजून घेण्याची जबाबदारी पालकांची आहे असे शिक्षकांना वाटते.
      शिक्षणाबाबतच आमच्याकडे असे प्रयोग वारंवार का केले जातात? काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार शिक्षण खात्याने केला होता.  काय तर म्हणे शाळेचे अभ्यासाचे दिवस कमी करून पाच दिवसांचा आठवडा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांना यापुढे शनिवार व रविवारी सुट्टी दिली जाणार आहे. आता पाच दिवस काय? रोजच सुट्टी या वर्षाने दिलेली आहे. पण राग या गोष्टीचा येतो की शिक्षक काही शिकवत नाहीत, घरातून टेरेसवर नाहीतर कुठेतरी बसून काहीतरी पोस्ट करतात. पण शाळेची फी मात्र नेहमीसारखी भरमसाठ घेतली जात आहे. पोरशन 30 टक्के कमी केला आहे, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कही या वर्षी पन्नास टक्के का केले नाही? खरं तर सर्व पालकांची आज आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. घरात मुलांना महागडे स्मार्ट फोन, लॅपटॉप घेउन द्या. त्यासाठी रिचार्ज मारा, नेट पॅक घ्या, कुठे राउटर घ्या असे अनेक खर्च त्यांना मागे लागले आहेत. एका घरात शिकणारी दोन मुले असतील तर त्या पालकांची अवस्था दुप्पट केविललाणी होत आहे. मग अशा आर्थिक संकटांना पालक तोंड देत असताना त्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची गरज आहे. सरकारने विद्याथ्यार्र्ना जसा पोषण आहार दिला आहे तसा जर फी मध्ये कपात करून नेटपॅकचा, फ्री इंटरनेटची सोय केली, कमी व्याजदराने मोबाईल, लॅपटॉपसाठी कर्ज दिले, आर्थिक मदत केली तर बरे होईल. आज शिक्षकांना काहीही तसे काम राहिलेले नाही. एकदा कॅसेट रेकॉर्ड करायची आणि ती व्हायरल करायची. मुलांना समजो अथवा नमजो, ते पास होवोत वा नापास काही फरक पडत नाही अशी स्थिती आहे.
  आजकाल लोक बाहेर पडत नाहीत, कोरोनाच्या भितीने गर्दी करू शकत नाहीत, त्यामुळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे शिक्षणाची वाट लावून शिक्षणाच्या आयचा घोव करून टाकला आहे.  या विरोधात फार मोठे आंदोलन उभे राहण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिक्षणाचे वाटोळे करण्याचे काम सरकारने चालवले आहे. सरकार बदलले पण वाटोळे करण्याचे काम जैसे थे थाहे. यामुळे भावी पिढी काय अनपढ, अडाणी आणि बेअक्कल करायचे व्रत शिक्षण विभागाने घेतले आहे? आठवीपर्यंत मुलांना नापास करायचे नाही. त्यांची परिक्षा घ्यायची नाही. शिक्षकांनी नीट शिकवायचे नाही. पालकांना वेठीस धरायचे. मुले शहाणी होणार कशी? आज अनुदानित आणि शासकीय शाळांची अत्यंत दुरावस्था आहे. पाचवी ते सातवीतल्या विद्यार्थ्यांना धड वाचताही येत नाही. ती मुले ऑनलाईन शिक्षण काय घेणार? त्यामुळे तशी यंत्रणा उभी करण्याचे काम सरकारने केले पाहिजे.
 आपल्या राज्यात विधानपरिषदेत शिक्षक मतदारसंघ आहे. यामुळे मुलांचे शिक्षणाचे नुकसान होणार आहे. याची एकाही शिक्षक आमदाराला जाणिव नाही? कशासाठी तुम्हाला तिथे प्रतिनिधीत्व दिले आहे? आमदार म्हणून मिरवण्यासाठी तुम्हाला शिक्षक मतदारसंघातून पाठवले आहे? बिनकामाची भरती सगळी आहे. शिक्षकांच्या हक्काबद्दल हे शिक्षक आमदार भांडत असतात. पण शिक्षकांच्या कर्तव्याबद्दल कधीही बोलत नाहीत. ऑनलाईन शिक्षणाबाबत कोणता शिक्षक मतदारसंघातील आमदार पुढाकार घेउन बोलला हे जाहीर करायची वेळ आलेली आहे.
 शाळा जेंव्हा नियमीत असतात तेंव्हा त्यांना किती सुट्टी मिळते त्यावर नजर टाकली तर लक्षात येईल की तब्बल सहा महिने शिक्षक फुकट पगार घेतात. मे महिन्याची किंवा उन्हाळी सुट्टी ही 58 दिवस असते. दिवाळी सुट्टी ही 17 दिवस असते. इतर वार्षिक सणांच्या सुट्ट्यांची संख्या आहे 13. याशिवाय रविवारी आलेले सण वगळता येणार्या रविवारच्या 45 सुट्ट्या होतात. असे 133 दिवस शाळांना सुट्टी राहते. या दिवशी विद्यार्थी शाळेत येत नाहीत. याशिवाय घटक चाचण्या (यूनीट टेस्ट) एकूण 4 आणि दोन सत्र परिक्षा यामध्ये 61 दिवस जातात. कारण परिक्षांच्या काळात शिकवले जात नाही. त्यामुळे वर्षांच्या 365 दिवसातील 194 दिवस हे अभ्यास न शिकवता जातात. उरतात फक्त 171 दिवस. म्हणजे प्रत्येक सत्रात 85 दिवस हातात येतात. यामध्ये संपूर्ण अभ्यास कसा शिकवला जाणार? ही आजची परिस्थिती आहे. यात जर ऑनलाईन शिक्षणाचा वेळ वाया गेला तर मुले काय होतील?
कशी असेल ही भावी पिढी?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: