शनिवार, २१ मार्च, २०२६

ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला ढासळणार का?


प. बंगालमधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने फार मोठे आव्हान उभे केले आहे असे प्रथमदर्शनी तर दिसत आहे. त्यामुळेच भाजप या खेपेला ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला भेदणार का इकडे लक्ष लागले आहे. भाजपने उमेदवारांची जाहीर केलेली पहिली यादी पाहिल्यास, ती देखील मोठ्या नावांनी भरलेली आहे. नंदिग्राम तसेच भवानीपूरमधून विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी देऊन पक्षाने ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिले आहे. दिलीप घोष, स्वप्न दासगुप्ता, अग्निमित्र पाल, रुद्रनील घोष आणि बंकिमचंद्र घोष यांसारखे चेहरे या निवडणुकीला हाय-व्होल्टेज बनवत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी पक्षाने केवळ प्रमुख व्यक्तींवरच नव्हे, तर तळागाळातील कार्यकर्त्यांवरही विश्वास ठेवला आहे. आसग्राममधून कलिता माजी यांच्यासारख्या सामान्य पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्याला तिकीट देणे, हा याच रणनीतीचा एक भाग आहे.


या निवडणुकीतील आणखी एक प्रमुख आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे माजी पोलीस आयुक्त डॉ. राजेश कुमार यांचा राजकारणातील प्रवेश. हे केवळ एका उमेदवाराचे नाव नसून भाजपची एक रणनीतिक खेळी आहे. डॉ. राजेश कुमार यांचा प्रशासकीय अनुभव, वित्त आणि व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवरील त्यांची मजबूत पकड, त्यांना एका वेगळ्याच दर्जाचे नेते बनवते. कोलकाता पोलीस आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ, गुन्हे अन्वेषण विभाग आणि वाहतूक सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या पदांवरील त्यांची भूमिका, त्यांना सामान्य नेत्यांपेक्षा वेगळे ठरवते.

त्यांची प्रतिमा एका कडक पण न्यायप्रिय अधिकाºयाची राहिली आहे. मानवी तस्करीविरोधातील त्यांची मोहीम आणि दुर्बळ गटांच्या संरक्षणासाठी केलेले त्यांचे कार्य, यातून त्यांना जनतेमध्ये एक विश्वासार्ह व्यक्ती बनवते. हे पाऊल भाजपसाठी देखील फायदेशीर आहे, कारण बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा एक मोठा मुद्दा आहे. अशा परिस्थितीत, एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकाºयाचा निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश हा एक स्पष्ट संदेश देतो की, पक्ष व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत गंभीर आहे.


याशिवाय हे एक महत्त्वपूर्ण राजकीय पाऊलदेखील आहे. डॉ. राजेश कुमार यांची प्रशासकीय आणि बौद्धिक प्रतिष्ठा, आतापर्यंत तटस्थ राहिलेल्या लोकांमध्येही भाजपला मजबूत करेल. त्यांच्या कायदेशीर लढ्यांनी हे देखील सिद्ध केले आहे की, ते दबावाखाली अविचल राहतात. ही प्रतिमा निवडणुकीत भाजपसाठी एक महत्त्वपूर्ण जमेची बाजू ठरू शकते.

आर. जी. कर मेडिकल कॉलेज प्रकरणामुळे ही निवडणूक आणखी भावनिक आणि स्फोटक बनली आहे. त्या दु:खद घटनेने संपूर्ण बंगाल हादरून गेला. आता पीडितेच्या आईचा राजकारणातील प्रवेश हे दर्शवतो की, जनतेचा संताप अजूनही शमला नाही. रस्त्यावर उतरून रात्रभर आंदोलन करून आणि न्यायाची मागणी करून महिलांनी तृणमूल सरकारविरोधात एक प्रखर जनमत तयार केले आहे. असे मानले जाते की, पीडितेच्या आईने पाणीहाटीसाठी भाजपकडे तिकिटाची मागणी केली आहे. जनतेच्या संतापाला राजकीय ऊर्जेत रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भाजप त्यांना उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. पाणीहाटी हा त्या ३८ जागांपैकी एक आहे, जिथे भाजपने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.


भाजपने सामाजिक घडामोडींवरही विशेष लक्ष दिले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या मतदारसंघांमध्ये मजबूत उमेदवार उभे करून पक्षाने आपला पाया विस्तारण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर बंगालपासून दक्षिण बंगालपर्यंत प्रत्येक प्रदेशात संतुलन साधण्याची रणनीती स्पष्टपणे दिसून येत आहे. याशिवाय, भाजपने बूथ स्तरावर आपली संघटना मजबूत करणे, स्थानिक नेत्यांना प्रोत्साहन देणे आणि ममता बॅनर्जी सरकारविरोधातील जनतेचा असंतोष मतांमध्ये रूपांतरित करण्याची रणनीती खूप पूर्वीच आखली आहे आणि याच आधारावर निवडणूक प्रचार केला जाईल.

शिवाय, यावेळी भाजपची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा बदललेला दृष्टिकोन. मागच्या वेळी पक्षावर बाहेरच्यांवर जास्त अवलंबून राहण्याचा आरोप झाला होता, तर यावेळी त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि वैचारिक पार्श्वभूमी असलेल्यांना प्राधान्य दिले आहे. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले असून, संघटना अधिक मजबूत दिसत आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेस सरकारला कायदा आणि सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. यामुळेच भाजप पूर्ण ताकदीने सांगत आहे की, यावेळी बंगालमध्ये सत्तांतर अटळ आहे.


मात्र, उमेदवारांची यादी, माजी पोलीस आयुक्तांसारख्या दिग्गज नेत्यांचा भाजपमधील प्रवेश, तळागाळातील कार्यकर्त्यांवरील विश्वास आणि जनतेच्या रोषाला योग्य दिशा देण्याची रणनीती यांमुळे भाजपला ही निवडणूक जिंकण्यास मदत होणार आहे. यामुळे भाजप एक बलाढ्य प्रतिस्पर्धी आणि सत्तेसाठी एक प्रबळ दावेदार बनला आहे. या रणनीतीचे मतदानाच्या दिवशी मतांमध्ये रूपांतर होते की नाही हे पाहणे बाकी आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे की यावेळी बंगालमधील लढाई पूर्वीपेक्षा अधिक तीव्र, धारदार आणि निर्णायक असेल.

- प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: