माओवादाचे संकट मुळापासून उखडून टाकल्यानंतर, मोदी सरकार आता प्रभावित भागांमध्ये सुरक्षा आणि विकास सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच, बस्तरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेथील विकासाच्या अभावाचे कारण म्हणून माओवादाचा उल्लेख केला आणि म्हटले की, बिगरभाजप सरकारांनी माओवादमुक्त मोहिमेला पाठिंबा दिला, परंतु काँग्रेस सरकारने दिला नाही.
१९६०च्या दशकात बंगालमधील नक्षलबाडीतून निर्माण झालेले वादळ १४ राज्यांतील जवळपास १५० जिल्ह्यांमध्ये कसे पसरले, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. माओवाद्यांनी तिरुपती ते पशुपतिनाथपर्यंत ‘रेड कॉरिडॉर’ तयार करण्यासाठी कसे काम केले? कोणत्या सरकारांनी हजारो निष्पाप लोकांची हत्या करणाºया माओवाद्यांना फोफावण्याची परवानगी दिली आणि त्यांना बिघडलेली मुले म्हणून प्रोत्साहन दिले?
पंतप्रधान मोदी काँग्रेसला माओवादाचा समर्थक म्हणतात, ते विनाकारण नाही. काँग्रेसचा माओवादाला पाठिंबा देण्याचा इतिहास आहे. त्यांनी सातत्याने माओवादाला एक सामाजिक-आर्थिक समस्या म्हणून चित्रित केले आहे. यामुळेच १९७० आणि १९८०च्या दशकात माओवादाचा प्रसार होत राहिला. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला, जेव्हा माओवाद्यांनी छत्तीसगडमधील बस्तरचे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांशी विलीनीकरण करून दंडकारण्य नावाचे आदिवासी राज्य निर्माण करण्यासाठी आपल्या हिंसक कारवाया तीव्र केल्या, तेव्हा काँग्रेस सरकारे निष्क्रिय राहिली.
या काळात शेकडो सैनिक शहीद झाले आणि निष्पाप नागरिक मारले गेले. आंध्र प्रदेशातील वायएसआर रेड्डी सरकारने २००४ मध्ये पीपल्स वॉर ग्रुपसोबत युद्धविरामासाठी वाटाघाटीसुद्धा केल्या. तथापि, टीडीपीने याला विरोध कायम ठेवला. २००३ मध्ये, माओवाद्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावरही हल्ला केला होता.
एके काळी, माओवाद्यांनी दक्षिणेत एक केंद्र स्थापन केले होते, ज्याला ते ‘केकेटी झोनल कमिटी’ म्हणत असत. केकेटी म्हणजे केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू. दक्षिणेकडील माओवाद्यांच्या प्रभावाची व्याप्ती यावरून लक्षात येते की, त्यांनी आयईडी स्फोटांचे तंत्र एलटीटीईकडून शिकले होते. माओवाद्यांनी काँग्रेस पक्षालाही हादरे दिले होते. २०१३ मध्ये, त्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील झीरम खोºयात हल्ला करून राज्य काँग्रेसचे जवळजवळ संपूर्ण नेतृत्व संपवले. यानंतर काँग्रेस पक्षाच्या भूमिकेत थोडा बदल झाला, पण २०१८ ते २०२३पर्यंत छत्तीसगडमधील बघेल सरकारने माओवाद्यांविरुद्ध आवश्यक मोहीम सुरू केली नाही.
जेव्हा माओवाद संपवण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती, तेव्हा तेलंगणातील काँग्रेस सरकारने राज्यात कोणत्याही माओवाद्याला चकमकीत मारले जाणार नाही असे सांगितले. यामुळेच, देशाच्या इतर भागांमध्ये माओवादी चकमकी होत असताना, तेलंगणातून कोणत्याही मोठ्या चकमकीचे वृत्त आले नाही. छत्तीसगडमधील कारवाईदरम्यान, माओवादी पळून तेलंगणाच्या जंगलात आश्रय घेत होते, त्यामुळे तेथून फक्त माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाचे वृत्त आले.
देशाच्या विविध भागांमध्ये माओवाद्यांविरुद्ध कारवाया सुरू होत्या, परंतु संघर्षाचे मुख्य क्षेत्र बस्तरची जंगले, म्हणजेच दंडकारण्य आणि अबुझमाद हे होते. हा दंडकारण्य प्रदेश तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर आहे. येथे माओवाद्यांचे मोठे वर्चस्व होते. गडचिरोली-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अबुझमादला, ‘आॅपरेशन अंतिम प्रहार’नंतर गेल्या आठवड्यात अधिकृतपणे माओवादीमुक्त घोषित करण्यात आले.
माओवाद्यांबाबत नरम भूमिका घेणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष नव्हता. असे अनेक गट होते जे त्यांच्याशी सहानुभूती बाळगत होते. २००३ मध्ये, जेव्हा छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांचे भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हा पोलीस आणि निमलष्करी दलांना गनिमी युद्धतंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी नागालँड सशस्त्र दलाच्या एका बटालियनला बस्तरमध्ये बोलावण्यात आले. या बटालियनने, विजापूरच्या साल्वा जुडूमसोबत मिळून, माओवाद्यांवर प्रचंड दबाव आणला. साल्वा जुडूम हा माओवाद्यांविरुद्ध उठाव करणाºया गावकºयांचा एक गट होता. २००५ ते २००७ दरम्यान, नागा बटालियनने माओवाद्यांची मुळे हादरवून टाकली.
माओवादी समर्थकांना हे सहन झाले नाही. नागा बटालियनला छत्तीसगडला पाठवल्याबद्दल डाव्यांनी मोठा गदारोळ केला. अखेरीस, २००७ मध्ये ती बटालियन मागे घेण्यात आली, ज्यामुळे माओवाद्यांना अधिकच बळ मिळाले. २००७ मध्ये, त्यांनी विजापूरच्या राणी बोडली गावातील पोलीस छावणीवर हल्ला करून आग लावली आणि ५५ सैनिकांना जिवंत जाळले. २०१० मध्ये, माओवाद्यांनी सुकमा येथील तारामेटलावर हल्ला करून ७६ सीआरपीएफ जवानांना ठार केले.
२०१० हे वर्ष सर्वाधिक हिंसाचाराचे ठरले. माओवादी समर्थकांनी साल्वा जुडूमला काम करण्यापासून रोखले. त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. २०११ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी साल्वा जुडूमला बेकायदा घोषित केले. गेल्या वर्षी काँग्रेसने याच सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती. कदाचित म्हणूनच गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ज्यांनी अनेक दशके आदिवासींची दिशाभूल केली आणि रक्तरंजित खेळ खेळला, त्यांनी आता आपला पराभव मान्य केला आहे, पण ते स्वस्थ बसणार नाहीत. ते वेष बदलून परत येऊ शकतात. स्पष्टपणे, माओवादी पुन्हा डोके वर काढणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. आतासुद्धा ही झुरळे सोशल मीडियावर गाजत आहेत. अमेरिकेत राहून इथे दहशतवाद, माओवाद, शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचे हे धंदे आहेत का, याचा तपास करावा लागेल.