अलीकडेच केरळचे नाव बदलून केरळम् ठेवल्यानंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचे नाव बदलून इंद्रप्रस्थ ठेवण्याच्या मागणीने नवीन जोर पकडला आहे. ही कल्पना पूर्वी प्रामुख्याने राष्ट्रीय चर्चेपुरती मर्यादित होती. २०१६ मध्ये जुन्या पांडव किल्ल्यावर आयोजित पहिल्या इंद्रप्रस्थ महोत्सवादरम्यान हा विषय व्यापक जनमानसात चर्चेत आला. हा कार्यक्रम द्रौपदी ड्रीम ट्रस्टने आयोजित केला होता आणि त्याला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पाठिंबा दिला होता. तेव्हापासून हा विषय सार्वजनिक आणि राजकीय चर्चेचा भाग बनला आहे. राजधानीचे प्राचीन नाव, इंद्रप्रस्थ हे सनातन परंपरेत खोलवर रुजलेले आहे आणि दिल्लीचा संबंध राजा ढेलूच्या एका लहान वस्तीशी जोडला जातो.
संस्कृतमध्ये ‘प्रस्थ’ या शब्दाचा अर्थ सपाट भूभाग (पठार) असाही होतो. अशाप्रकारे इंद्रप्रस्थला केवळ एक प्रशासकीय केंद्र म्हणूनच नव्हे, तर एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रदेश म्हणूनही ओळख मिळाली. हे नाव अशा काळाचे प्रतीक आहे, जेव्हा सत्ता आणि न्याय धर्मावर आधारित होते. या प्रदेशाचे प्राचीन पावित्र्य लक्षात घेऊन, भगवान श्रीकृष्णाने पांडव साम्राज्याची स्थापना करण्यासाठी या प्रदेशाची निवड केली. महाभारतानुसार, युधिष्ठिराने यमुना नदीत स्नान करून राजसूय यज्ञ केला आणि तो इंद्रप्रस्थचा सम्राट झाला. स्वामी दयानंदांचे संशोधन आणि राजस्थानमधील नाथद्वारा मंदिरातील शिलालेखांनुसार, सम्राट युधिष्ठिरापासून ते सम्राट यशपालापर्यंत सुमारे १२४ आर्य शासकांनी येथे सलग ४ हजार १५७ वर्षे राज्य केले, ज्यांचा सरासरी कार्यकाळ सुमारे ३९ वर्षांचा होता.
इतिहासकार हेन्री हार्डी कोल आणि अलेक्झांडर कनिंगहॅम हेदेखील याला भारतातील सर्वात जुन्या शहरी वसाहतींपैकी एक मानतात. महाभारताच्या सभा पर्वात इंद्रप्रस्थचे वर्णन एक सुनियोजित शहर म्हणून केले आहे, जिथे समाजातील सर्व स्तरांच्या गरजांची काळजी घेतली जात होती. हे शहर काशीसारख्या इतर धार्मिक केंद्रांशी सुव्यवस्थित रस्त्यांनी जोडलेले होते. बौद्ध परंपरांमध्ये असा उल्लेख आहे की, बुद्धांची वस्तरा आणि सुईदेखील इंद्रपट्टा (इंद्रप्रस्थ) येथे स्थापित करण्यात आली होती, जे त्याचा व्यापक प्रभाव दर्शवते. याउलट लोककथा दिल्ली नावाचा उगम राजा ढेलूशी जोडतात. असे म्हटले जाते की, त्याने मेहरौली येथील पवित्र विष्णुगिरी लोहस्तंभाची (राज्याच्या स्थिरतेचे प्रतीक) स्थिती तपासण्याचा प्रयत्न केला.
या प्रक्रियेत वास्तुकलेचे प्रतीक असलेल्या सर्पदेवतेला इजा झाली आणि स्तंभाचा खिळा सैल झाला. या सैल खिळ्यापासून ‘दिल्लिका’ आणि नंतर ‘दिल्ली’ हा शब्द तयार झाला. यातील विरोधाभास म्हणजे, स्थिरतेच्या प्रतीकाशी संबंधित असलेल्या या घटनेने एका अशा नावाला जन्म दिला, जे इतिहासात अस्थिरता आणि अशांततेची गाथा बनले.
एकेकाळी आध्यात्मिक आणि पूजनीय असलेली ही भूमी हळूहळू केवळ संपत्तीची भूमी म्हणून पाहिली जाऊ लागली, ज्यामुळे परदेशी आक्रमकांची लालसा निर्माण झाली. मुहम्मद घोरीपासून ते नादिर शाह आणि ब्रिटिशांपर्यंत, दिल्लीवर वारंवार होणारी आक्रमणे, लूटमार आणि विध्वंसाचे केंद्र बनली. या आक्रमणांचा मुख्य उद्देश संपत्तीचे शोषण करणे आणि भारताची वैदिक ज्ञान परंपरा मोडीत काढणे हा होता. ही परिस्थिती त्या सुवर्णकाळाच्या अगदी विरुद्ध होती, जेव्हा परदेशी प्रवासी केवळ ज्ञान मिळवण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी येथे येत असत. ब्रिटिश काळात जेव्हा राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली, तेव्हा ल्युटियन्सच्या दिल्लीच्या बांधकामात प्राचीन इंद्रप्रस्थच्या शहर आराखड्याचा अभ्यास करण्यात आला, परंतु या प्रक्रियेत अनेक प्राचीन वास्तू ढिगाºयाखाली गाडल्या गेल्या. १९१३च्या अधिसूचनेने इंद्रप्रस्थच्या ऐतिहासिक सीमा केवळ पुराण किल्ल्यापुरत्याच मर्यादित केल्या. १९२५-२६च्या पुरातत्त्व अहवालांमध्ये राजा भोज आणि राजा सोहनलाल यांच्या मंदिरांतील शिलालेखांच्या शोधाने या प्रदेशावर भारतीय शासकांचे दीर्घकाळचे नियंत्रण असल्याचे सिद्ध होते. आज, पुराण किल्ल्यातील कुंती मंदिर, निगंबोध घाट परिसर (जिथे युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ केला होता), नीली छत्री मंदिर आणि मेहरौलीतील योगमाया मंदिर हे या प्राचीन वैभवाचे शेवटचे शिल्लक राहिलेले पुरावे आहेत.
सनातन संस्कृतीत, नामकरण ही केवळ एक ओळख नसून एक विधी आहे. नावे वैश्विक ऊर्जा, ध्वन्यात्मक स्पंदने आणि मूल्ये प्रतिबिंबित करतात. पाश्चात्य दृष्टिकोन ‘नावात काय आहे’ असे मानत असला तरी, भारतीय ज्ञानानुसार नावे ओळख आणि नियती घडवतात. इंद्रप्रस्थसारखे नाव संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे, जे न्यायपूर्ण शासनाची आठवण करून देते. याउलट किल्ली-दिल्ली किंवा दिल्लीसारखे नाव, त्याच्या मूळ अर्थीच शिथिलतेचे द्योतक आहे.
आर्यावर्ताच्या या पवित्र भूमीचे इंद्रप्रस्थवरून दिल्लीत झालेले रूपांतर हे एका गहन सांस्कृतिक ºहासाचे द्योतक आहे, जो हिंसाचार आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरही स्पष्टपणे दिसतो. केवळ इतिहासातून शिकूनच तो प्राचीन समतोल पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. इंद्रप्रस्थसारखी पवित्र तीर्थक्षेत्रे लोकांच्या स्मरणात पुनरुज्जीवित केली पाहिजेत. इंद्रप्रस्थचे पुनरुज्जीवन करणे हा केवळ नावातील बदल नसून, भारताला जागतिक नेतृत्वस्थानी नेण्याच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल असेल. केवळ इंद्रप्रस्थच्या छायेखालीच राष्ट्र आपली खरी समृद्धी आणि शांती पुन्हा मिळवू शकेल.