सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व सुगमसंगीत गायिका अशी माणिक वर्मा यांची ओळख आहे. आज १६ मे हा त्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म पुणे येथे हिराबाई व बळवंत दादरकर या दाम्पत्यापोटी झाला. त्यांच्या मातोश्री हिराबाई या संगीताच्या उत्तम जाणकार व कलावंत होत्या. त्यांना दत्तूबुवा बागलकोटकर, बापूराव केतकर, बशीर खाँ यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. आपल्या मुलीने सुविद्य गायिका व्हावे, असा त्यांचा पहिल्यापासूनचा आग्रह होता.
माणिकतार्इंचे शालेय शिक्षण पुण्याच्या सेवासदनमध्ये झाले. पुढे सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील कलाशाखेतून त्यांनी तर्कशास्त्र हा विषय घेऊन त्या काळात म्हणजे १९४६ला बी. ए. ची पदवी संपादन केली. माणिकतार्इंना संगीताचे बाळकडू त्यांच्या आईकडून मिळाले. त्यांच्या आईव्यतिरिक्त आप्पासाहेब भोपे, बापूराव केतकर, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेशबाबू माने, उ. इनायत खाँ, अजमत हुसेन खाँ व नंतर आग्रा घराण्याचे गुणिदास पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून त्यांनी गाण्याची तालीम घेतली. अलाहाबादचे पं. भोलानाथ भट्ट यांच्याकडूनही त्या सुंदर बंदिशी शिकल्या. सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. माणिकतार्इंनी प्रथम किराणा घराण्याची मूळ पीठिका उचलली असली तरी, आवाजाचा लगाव, आलापांचा शिस्तशीरपणा व तानक्रियेची निर्मळता या तीन बाबतीत त्यांनी किराणा घराण्याच्या परंपरेबाहेर यशस्वीपणे पदार्पण केले आणि स्वत:ची एक स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. माणिकतार्इंच्या गायनाची पहिली ध्वनीमुद्रिका बहरली जणू लतिका कलिका ही दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली एच. एम. व्ही. (हिज मास्टर्स व्हॉइस) या कंपनीतर्फे निघाली. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी गणपती उत्सवात पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला होता.
१९४७ मध्ये कोलकत्त्याच्या (कलकत्त्याच्या) प्रसिद्ध तानसेन संगीत संमेलनात गायची संधी त्यांना मिळाली होती. १९५०-५५ या कालावधीत पुणे आकाशवाणी केंद्रावरून गोविंदराव टेंबे यांनी सादर केलेल्या महाश्वेता या संगीतिकेत गायिका म्हणून माणिकतार्इंचा समावेश होता. १९५५-५६ साली आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या गीत रामायण या सुप्रसिद्ध संगीत मालिकेमध्ये सात गाणी त्यांनी गायली. भावगीत गायिका म्हणून त्यांचे नाव खूप लवकर झाले. त्यांच्या भावगीत गायनात सहजता, सुरेलता, संयम हे गुण दिसून येतात. सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, पुरुषोत्तम सोळांकूरकर, दशरथ पुजारी, गोविंद पोवळे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, प्रभाकर जोग, बाळ माटे, विठ्ठल शिंदे, गजानन वाटवे, वसंत पवार इत्यादी मान्यवर संगीत दिग्दर्शकांकडे माणिकतार्इंना गाण्याची संधी मिळाली. शास्त्रीय संगीताबरोबरच अनेक भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते अशी वेगवेगळ्या प्रकारची गीते माणिकतार्इंनी गायली. त्यांपैकी काही प्रसिद्ध गीतांचा उल्लेख करायचा तर सावळाच रंग तुझा, घननीळा लडिवाळा, हसले मनी चांदणे, त्या चित्तचोरट्याला या भावगीतांचा विचार करावाच लागतो. तसेच कौसल्येचा राम बाई, सगुण निर्गुण, अमृताहूनी गोड इत्यादी भक्तिगीते ही अजरामर झाली आहेत. याशिवाय नाथ हा माझा, स्वकुल तारकसुता, नरवर कृष्णासमान इत्यादी नाट्यगीते प्रचंड गाजली. देव पावला, गुळाचा गणपती, शेवग्याच्या शेंगा, बोलविता धनी इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गीतेही खूप गाजली. बनारसी बाजाची ठुमरी त्या भारदस्तपणे आणि संयमित अंदाजाने सादर करीत असत. देशविदेशातील अनेक स्वरमंचासह आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमांतून त्यांचे गाणे रसिकप्रिय झाले होते.
माणिकतार्इंच्या आवाजात गोडवा होता. तालावरील प्रभुत्व, शब्दांची योग्य जाणीव, योग्य तालीम, बहुश्रुतता, स्वत:चा मोठा व्यासंग आणि अखंड चिंतन-मनन यांमुळे त्यांनी आपले गायन रंजक बनविले. स्वरांमुळे वाहून न जाता आणि तानेबरोबर न भरकटता त्या एक संयत आविष्कार उभा करीत असत. कोणत्याही प्रदर्शनवृत्तीस बळी न पडता त्याचे सादरीकरण करीत असत. त्यांच्या गायकीचा असर दिसला नाही तरी वृत्तीचा दिसतो. त्यांच्या पद्धतीने गाताना मूलभूत मूल्यांबाबत तडजोड करावी लागत नाही याचा प्रत्यय येतो. यातच माणिकतार्इंचे माणिकपण सामावलेले आहे, असे म्हणता येईल. त्यांचा वागण्यातला साधेपणा हा किती सुंदर होता याची जाणिव सध्या यूट्युबवर गाजत असलेल्या माणिक वर्मा यांच्या कन्या भारती आचरेकर यांच्या मुलाखतीतून दिसून येतो.
माणिकतार्इंचा विवाह गीतकार अमर वर्मा यांच्याशी झाला (१९४८). राणी वर्मा, भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश या त्यांच्या चार कन्या. राणी आणि भारती यांच्याकडे त्यांच्या संगीताचा वारसा आलेला आहे. वंदना गुप्ते या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. गायिका सुनीता खाडिलकर या त्यांच्या कनिष्ठ भगिनी. आशा खाडिलकर, आरती अंकलीकर-टिकेकर, अर्चना कान्हेरे, शैला दातार या त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गायनशैलीचा वारसा जपला आहे. त्यातून त्यांनी एक फार मोठी संगीत परंपरा निर्माण केली.
किती रंगला खेळ हे त्यांचे आत्मचरित्र १९९२ साली प्रकाशित झाले. माणिक वर्मा यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९७४), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८६), महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), लता मंगेशकर पुरस्कार (१९९२) (या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी), गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार (१९९५) इत्यादी अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले. क्लीव्हलँड, ओहायओ येथे १६ मे हा त्यांचा जन्मदिवस माणिक वर्मा दिन म्हणून घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात आले ही फार मोठी बाब आहे. आपल्या चिरंतन भावगीतांनी त्यांनी संगीत सृष्टी समृद्ध केली आणि मोलाचे योगदान दिले आहे.
-प्रफुल्ल फडके/संस्कृती