राज्यसभा निवडणुकांमध्ये क्रॉस व्होटिंग ही आता नवीन घटना राहिलेली नाही. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग सामान्यपणे दिसून येते, म्हणजेच एका विशिष्ट पक्षाचे आमदार दुसºया पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतात. पूर्वी क्रॉस व्होटिंगची प्रकरणे दुर्मीळ होती, ती सहसा आमदारांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात घडत असत, परंतु आता नवनिर्वाचित आमदारही या प्रथेमध्ये सहभागी होत आहेत.
क्रॉस व्होटिंग करण्याचा एक मार्ग म्हणजे स्वत:च्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करणे. बिहार, ओडिशा आणि हरियाणा येथील नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये क्रॉस व्होटिंग स्पष्टपणे दिसून आले. बिहारमधील विधानसभा निवडणुकांना पाच महिनेही उलटले नाहीत, तरीही येथे एका आरजेडी आमदाराला आणि तीन काँग्रेस आमदारांना महाआघाडीऐवजी एनडीएच्या उमेदवाराला मदत करणे आवश्यक वाटले. विडंबनात्मक बाब म्हणजे महाआघाडीबाहेरील बसपा आणि एआयएमआयएम या पक्षांच्या आमदारांनी त्यांच्या उमेदवाराला मतदान केले, तर त्याच पक्षाच्या सदस्यांनी विश्वासघात केला.
आपल्या एका आमदाराच्या विश्वासघाताने आरजेडीला कदाचित कमी दु:ख झाले असेल, पण जेव्हा त्यांच्या सहा आमदारांपैकी तिघांना मतदान करण्याची गरज वाटली नाही, तेव्हा काँग्रेस काय करू शकते? याचा स्पष्ट अर्थ असा की, अर्धा पक्ष अप्रत्यक्षपणे दुसºया गटात सामील झाला आहे. काँग्रेस या आमदारांना निलंबित किंवा पक्षातून काढून टाकू शकते, पण त्यांचे सदस्यत्व इतक्या सहजपणे जाणार नाही. जर ते आमदार राहिले, तर त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. मतदानापासून दूर राहून एनडीएच्या उमेदवाराला फायदा करून देणारा आरजेडीचा आमदार पूर्वी जेडीयूमध्ये होता आणि त्याच्या निवडणुकीच्या निकालालाही आव्हान देण्यात आले आहे.
कदाचित न्यायालयाच्या निर्णयामुळे सदस्यत्व गमावण्याची भीती त्यांना वाटत असेल, पण त्यांच्या अर्ध्या आमदारांनी त्यांचा विश्वासघात का केला हे काँग्रेस नेतृत्वाला समजणे कठीण जाईल. सहसा याची फक्त दोनच कारणे असतात. एकतर पैशांचा लोभ किंवा स्वत:च्या पक्षात भविष्याचा अभाव. कधीकधी दोन्ही घटक कारणीभूत असतात. ओडिशामध्ये काँग्रेसला बिहारपेक्षाही मोठा धक्का बसला. येथे त्यांच्या तीन आमदारांनी काँग्रेस आणि बीजेडीच्या संयुक्त उमेदवाराऐवजी भाजप-समर्थित उमेदवाराला मतदान केले.
या आमदारांपैकी सर्वाधिक चर्चेत होत्या सोफिया फिरदौस. सुमारे दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्या ओडिशाच्या पहिल्या मुस्लीम महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. सोफिया यांना क्रॉस व्होटिंग करणाºया रमेश जेना आणि दशरथ गोमांगो यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे सांगून काँग्रेसने त्यांना निलंबित केले, पण कदाचित त्यांचा स्वत:वर तसा विश्वास नव्हता. ओडिशामध्ये बीजेडीच्या आठ आमदारांनीही काँग्रेसला क्रॉस व्होटिंग केले. यावरून असे दिसून येते की, नवीन पटनायक सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बीजेडी अधिकाधिक असुरक्षित होत आहे.
हरियाणामध्येही क्रॉस व्होटिंग झाले, परंतु हा धक्का बसूनही काँग्रेसने आपली प्रतिष्ठा वाचवण्यात यश मिळवले. त्यांच्या पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. सुदैवाने त्यांचा उमेदवार तरीही विजयी झाला. काँग्रेसच्या चार आमदारांची मतेही अवैध ठरवण्यात आली. हे चार आमदार आपल्या मतदानाबद्दल अनभिज्ञ होते की, त्यांना त्यांच्या उमेदवाराला मत द्यायचे नव्हते, हे समजणे कठीण आहे. कारण काहीही असो, या क्रॉस व्होटिंगच्या प्रकरणानंतर हरियाणा काँग्रेसच्या कार्याध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यांच्या आमदार पत्नीनेही क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप हे राजीनाम्याचे कारण असल्याचे म्हटले जाते.
हरियाणात यापूर्वीही राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले आहे आणि योग्यरीत्या मतदान न केल्यामुळे मते अवैध ठरवण्यात आली आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हे तेच राज्य आहे, जिथे पक्षांतराला ‘आयाराम-गयाराम’ म्हटले जात असे. राज्यसभा निवडणुकीत मोठे बहुमत असूनही विरोधी पक्ष, त्यांचे समर्थक किंवा अपक्ष उमेदवार राजकीय निष्ठेची पर्वा न करता क्रॉस व्होटिंगमुळे जिंकतात. अनेकदा अशा उमेदवारांच्या विजयाचे थेट कारण पैशांचे बळ असते.
पैसे देऊन राज्यसभा निवडणुका जिंकण्याची प्रकरणे नेहमीच चर्चेत राहिली आहेत, हे काही गुपित नाही. अशा अफवांना कधीच दुजोरा मिळत नाही, पण सर्वांना माहीत आहे की, प्रत्येक निवडणुकीत अगदी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावांच्या वेळीसुद्धा पैशांच्या ताकदीची भूमिका असते. ही भूमिका दिसून येते, कारण पक्षनिष्ठा आणि राजकीय विचारधारा आता अप्रासंगिक झाल्या आहेत.
सर्वसाधारणपणे, प्रत्येक नेता विचारधारेचा आधार घेतो आणि दावा करतो की, त्यांची राजकीय लढाई ही खºया अर्थाने विचारधारेची लढाई आहे, पण आता असे दावे केवळ एक ढोंग आहेत. यामुळेच सर्व निवडणुकांमध्ये पक्षांतर होते. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका जवळ आल्या की, राजकारणी मोठ्या संख्येने पक्षांतर करण्यासाठी चढाओढ करतात. गंमत म्हणजे, असे असूनही जे पक्ष बदलतात ते विचारधारेचाच आधार घेतात. त्यांची पक्षनिष्ठा आणि विचारधारा रातोरात बदलतात. सर्वच पक्ष पक्षांतराला म्हणजेच राजकीय संधीसाधूपणाला प्रोत्साहन देत असल्यामुळे भारतीय राजकारण हळूहळू विचारधारा आणि राजकीय मूल्यांपासून वंचित होत चालले आहे.
अर्थात या क्रॉस व्होटिंगच्या प्रकारात महाराष्ट्रात मात्र झाकली मूठ सव्वालाखाची राहिली. जर शिवसेनेने अजून एक उमेदवार दिला असता तर राष्ट्रवादी (शरद पवार)ची जी अवस्था झाली असती, ती अत्यंत केविलवाणी झाली असती. त्यामुळे अदृष्य शक्तीची ताकद महाविकास आघाडीला समजली आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे क्रॉस व्होटिंगचे स्वप्न पूर्ण झाले नाही आणि शरद पवार सेफ झोनमध्ये आले.