सोमवार, १ जून, २०२६

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली अभिनेत्री नर्गिस


मोठ्या पडद्यावर आपल्या अदांनी प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा १ जून हा जन्मदिवस. १ जून १९२९ रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद असे होते. १९३५ साली वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी ‘तलाश-ए-हक’ या सिनेमातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांना ‘बेबी नर्गिस’ असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले. अभिनेत्री म्हणून १९४२ मध्ये त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या. राज कपूर आणि नर्गिस ही एक अविस्मरणीय जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत होती.


४० आणि ५०च्या दशकात त्या खूप गाजल्या. ‘बरसात’, ‘आवारा’, ‘अंदाज’, ‘श्री ४२०’, ‘दीदार’, ‘चोरी चोरी’, ‘मदर इंडिया’ यासारखे चित्रपट त्यांनी केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गिस यांचा उल्लेख होतो. बॉलीवूडची पहिली क्वीन म्हणून नर्गिस दत्त यांना ओळखले जाते. नर्गिसची पहिली ओळख ‘श्री ४२०’चे गाणे ‘प्यार हुआ इकरार हुआ’मध्ये एका छत्रीखाली उभे असलेले नर्गिस आणि राज कपूर यातून होते. तर दुसरी ओळख म्हणजे ‘मदर इंडिया’मध्ये पुढे झोकून नांगर ओढताना दिसणारी नर्गिस.

खरे तर नर्गिस यांची बालपणी डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्या १४ वर्षांच्या असताना दिग्दर्शक महबूब खान यांनी त्यांच्या ‘तकदीर’ या सिनेमात मोतीलाल यांच्या हिरोईनच्या रूपात त्यांची आॅडिशन घेतली होती. कोणतीही समज नसताना नर्गिस यांनी डायलॉग्स वाचले आणि काय आश् चर्य सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांनी मान्य केले, की नर्गिसच सिनेमाची हिरोईन होणार. तेव्हा त्यांना रडू कोसळले. त्यांना सिनेमात येण्याची इच्छा नव्हती. तेव्हाच्या काळात सिनेमात काम करणाºयांना वाईट नजरेने बघितले जात होते. नर्गिस यांना आदराचे आयुष्य हवे होते. त्यांना डॉक्टर व्हायचे होते.


पण नियतीच्या मनात असते तसेच होते. आई जद्दनबाई यांनी आपल्या ‘तलाश-ए-इश्क’ सिनेमात नर्गिसकडून काम करून घेतले. १९३५मध्ये बनलेल्या या सिनेमात नर्गिस केवळ ५ वर्षांच्या होत्या. याच सिनेमापासून त्यांचे नाव ‘बेबी नर्गिस’ पडले. नर्गिस यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात आई जद्दनबार्इंनी केली. परंतु नर्गिस यांनी आपल्या पद्धतीने काम केले आणि कायम स्मरणात राहिल्या.

नर्गिस दत्त या पहिल्या अशा अभिनेत्री होत्या ज्यांना भारत सरकारतर्फे मानाचा पद्यश्री पुरस्कार देण्यात आला. त्या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. मुंबईच्या वांद्रेमध्ये त्यांच्या नावाचा एक रस्ता आहे. दरवर्षी होणाºया राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतेवर बनलेल्या सर्वश्रेष्ठ सिनेमाला ‘द नर्गिस दत्त अवॉर्ड’ दिला जातो. १९८०मध्ये त्या राज्यसभेच्या खासदारही बनल्या होत्या. ‘मदर इंडिया’, ‘अंदाज’, ‘अनहोनी’, ‘जोगन’, ‘आवारा’ आणि ‘रात दिन’मध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले.


नर्गिस यांनी वास्तव जीवनात सुनील दत्त यांच्याशी विवाह केला. पण त्यांनी ‘मदर इंडिया’ या चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका साकारली होती. मेहबूब खान यांनी सुनील दत्त यांची ‘मदर इंडिया’ चित्रपटात नर्गिस यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी निवड केली. चित्रपटाच्या सेटवर एक घटना घडली ज्यामुळे सुनील दत्त आणि नर्गिस आयुष्यभरासाठी एकत्र आले. गुजरात येथील बिलीमोर गावात ‘मदर इंडिया’चे चित्रीकरण सुरू होते. चित्रपटाच्या एका दृश्यात शेतात आग लागते. परंतु या आगीत नर्गिस या खरेच अडकल्या होत्या आणि सुनील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले होते. खरे तर यादरम्यान सुनील देखील खूप भाजले होते. नर्गिस यांनी त्यांची रुग्णालयात खूप काळजी घेतली होती. आगीच्या घटनेनंतर नर्गिस यांचा सुनील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते.

‘मदर इंडिया’ नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा हा सिनेमा. भारतीय महिलेच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या चित्रपटाची कथा फारच दमदार होती. म्हणूनच त्याला आॅस्करसाठी नामांकित करण्यात आले. या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. २००१ साली अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच शतकातील अभिनेत्री म्हणून नर्गिस यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


नर्गिस म्हणाल्या होत्या, ‘मी सुरुवातीलाच निश्चय केला होता, की लग्न केल्यानंतर सिनेमांमध्ये काम करणे सोडून देईन. कारण फिल्मी आणि खासगी आयुष्य आपण एकत्र जगू शकत नाही.’ त्याप्रमाणे सुनील दत्त यांच्याशी विवाह केल्यावर त्यांनी चित्रपटात काम करणे सोडले. नर्गिस या सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. त्यांनी नेत्रहीन आणि विशेष मुलांसाठी काम केले. त्या भारतातील पहिल्या स्पास्टिक्स सोसायटीच्या पेट्रन बनल्या. त्यांनी अजंटा आर्ट्स कल्चरल ट्रूप बनवले. त्यामध्ये तेव्हाचे नामवंत अभिनेते आणि गायक सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवत होते. त्यांचे मनोरंजन केले जात होते. बांगलादेश बनल्यानंतर १९७१मध्ये त्यांच्या पहिल्या दलाने तिथे परफॉर्म केला होता. संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’चा प्रीमिअर ७ मे १९८१मध्ये झाला होता. त्याच्या चार दिवसांआधीच म्हणजे ३ मे रोजी नर्गिस यांचा मृत्यू झाला. प्रीमिअरवेळी त्यांच्या नावाची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.

भारतीय टपाल खात्यानेही नर्गिस यांच्या प्रतिमेचे टपाल तिकीट काढून त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता. १९८० साली त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. न्यूयॉर्क येथे काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण ३ मे १९८१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सुनील दत्त अत्यंत दुखावले होते. कॅन्सर विरोधात उपचारासाठी त्यांनी खूप चळवळ उभी केली. ‘दर्द का रिश्ता’ हा चित्रपटही त्यांनी निर्माण केला होता. त्याची प्रेरणा नर्गिस यांच्या मृत्यूतून मिळाली होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ देदीप्यमान करणारी नर्गिस कायम लक्षात राहणारी आहे.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: