सोमवार, १ जून, २०२६

द ग्रेट शोमन राज कपूर


बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट जोडी म्हणजे राज कपूर आणि नर्गिस. काल १ जून हा नर्गिसचा जन्मदिवस, तर आज २ जून हा राज कपूर यांचा स्मृतिदिन. पाठोपाठ दोन दिवस दोघांवर लिहायला मिळण्याचा हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल. गेल्या काही वर्षांत सिनेमासृष्टीत वेगाने परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले आहेत. पण तांत्रिक आणि यांत्रिक प्रगती फारशी नसतानाही फार वेगळे आणि तर्कशुद्ध चित्रपट देण्याचे काम राज कपूर यांनी केले होते. कारण चित्रपटच त्यांचे पहिले प्रेम आणि विचारांचे केंद्र होते.


राज कपूर यांनी आठ वर्षांचे असताना चित्रपटाच्या जाहिराती आणि चित्र चिकटवून एक स्क्रॅप बुक तयार केले होते. ते आजही कृष्णा राज कपूर यांनी जपून ठेवले आहे. तारुण्यात त्यांना एका किशोरवयीन मुलीशी प्रेम झाले होते, दोघांच्या कुटुंबाचा परिचय होता. त्यामुळे लग्न शक्य होते. मुलीच्या वडिलांनी राज कपूर यांना एकुलत्या एका मुलीशी लग्नानंतर घरजावई करून त्यांची शेकडो एकर जमीन आणि व्यवसाय सांभाळण्यास सांगितले. राज कपूर त्या मुलीवर मनापासून प्रेम करत होते; पण चित्रपट निर्माता होण्याचे स्वप्न बाळगल्यामुळे त्यांना घरजावई होणे मंजूर नव्हते. त्यामुळे त्यांचे हे लग्न होऊ शकले नाही. परतताना राज कपूर यांनी मुलीची भेट घेतली त्या वेळी ती मुलगी अंगठा दाखवत त्यांना म्हणाली, ‘फिर ना आना इन गलियों चौबारों मे.’ या घटनेच्या अनेक दशकांनंतर ‘प्रेमरोग’मध्ये सावकाराची लाडकी मुलगी, अंगठा दाखवत ‘ये गलियां ये चौबारा, यहां आना ना दोबारा; की तेरा यहां कोई नहीं.’ हे गीत म्हणते. या गाण्यात लावण्यात आलेला सेटदेखील त्या सावकाराच्या हवेलीसारखाच होता. ऋषी कपूर पद्मिनी कोल्हापुरेमध्ये राज कपूर स्वत:चे स्वप्न पाहात होते. याला म्हणतात ग्रेट शोमन. आयुष्यात आलेले अनुभव कलेसाठी वापरणे आणि कलेतील जिवंतपणा दाखवणे फार कौशल्याचे असते ते राज कपूर यांच्याकडे होते.

सिनेमामय राज कपूर यांनी आपल्या आयुष्याच्या घटनेवरच अनेक पटकथा लिहिल्या आणि चित्रपटासारखे लार्जर दॅन लाइफ आयुष्यदेखील जगले. ते प्रत्येक वेळेस फक्त दृश्य किंवा कॅमेºयाचा विचार करत होते. त्यांचे आयुष्य संपादित नसलेल्या रीलप्रमाणे आहे, हे वाक्य त्यांनी स्वत: लिहिले होते. अधिकांच्या लांबीमुळे दृश्यावर प्रभाव पडतो, तर तेवढ्याच कमीमुळे दृश्याला नुकसानदेखील होते, असे त्यांचे मत होते.


वडील पृथ्वीराज कपूर यांच्या नाटकातून राज कपूर थोड्याच भूमिकेतून खूप काही शिकले. नाटकानंतर सर्वच कलावंत आणि तंत्रज्ञ प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करत होते. कोणत्या दृश्यात प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि तो कधी कंटाळला, या माहितीच्या आधारे पुढच्या भागाची पटकथा आणि संवाद लिहिले जात होते. राज कपूर यांना प्रेक्षक प्रतिक्रियेचे महत्त्व याच संस्थेतून कळले. त्यामुळे राज कपूर यांनी कधीच वॉटरटाइट पटकथेवर चित्रपट लिहिला नाही. ते थेट चित्रीकरणाच्या वेळी बदल करत. उटकमंडमध्ये ‘संगम’च्या चित्रीकरणाचे रश प्रिंट पाहून परदेशात चित्रीकरण केल्याचे वाटत होते. हे लक्षात येताच त्यांनी पटकथेत परिवर्तन करून युरोपमध्ये शूटिंग केले. अनेक देशात चित्रीकरण झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. ‘तुम्हे देख के तेरे दिल में हजारों फूल खिलते हैं’ हा संवाद ‘प्रेमरोग’मध्ये होता. यावरून त्यांना कल्पना आली की अँमस्टरडॅममध्ये लाखोंच्या संख्येने ट्युलिप फुले लावली जातात. त्यांनी तिथे जाऊन चित्रीकरण केले.

कथा, पटकथा, संगीत, गायन या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने अभ्यास करून ते चित्रीकरण करत. त्यामुळे त्यांचे चित्रपट पाहताना कुठेतरी आपल्या जवळपासचा प्रसंग प्रत्येकाला जाणवतो. राज कपूर यांची कळत नकळत कुठेतरी डावी विचारसरणी होती. त्यामुळे समाजाचे, सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी सुरुवातीच्या काळात मांडले. देशात स्थिरता आल्यानंतर त्यांनी रंजक प्रेमकथांकडे आपला मोर्चा वळवला. प्रेम आणि स्वप्नवत चित्रपट त्यांनी रंगीत चित्रपटांनी केले. तर समाजाची दुरवस्था, समस्या ही काळी बाजू त्यांनी कृष्णधवल चित्रपटांतून मांडली. ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘चोरी चोरी’, ‘जिस देश में गंगा बहिती है’ यातून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या बाजू मांडल्या.


राज कपूर यांच्यावर चित्रित झालेले एक गीत म्हणजे, ‘श्री ४२०’मधील ‘मेरा जूता है जपानी’. मुकेश यांनी गायलेले शैलेंद्र यांचे हे केवळ गीत नाही तर तत्कालीन देशासाठी असलेला एक संदेश होता. स्वातंत्र्यानंतर देशाची परिस्थिती कशी सुधारेल याचे हे गीत म्हणजे एक रुपक होते. ‘मेरा जूता है जापानी, ये पतलून इंगलिश्तानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिन्दुस्तानी’ यात दुसºया महायुद्धानंतर जपानची हानी होऊनही त्यांनी प्रगती केली होती. तशी चाल आपण चाललो तर विकास आहे हे सांगण्यासाठी जूता जपानी हवा. इंग्लिश पतलून म्हणजे शिस्तीचे प्रतीक होते. कायदे मोडून आपण स्वातंत्र्य मिळवले असले तरी आता शिस्तीची गरज आहे हे सांगण्यासाठी इंग्लिश पतलून हवी असे ते सांगतात. डोक्यावर असलेली लाल रशियन टोपी हे साम्यवादाचे, समाजवादाचे, सर्वांना सारखा, समान न्याय देण्याचा संदेश देणारे प्रतीक होते. पण दिल मात्र भारतीय असेल आणि ही सगळी तत्त्व स्वीकारली तर आपण विकसित होऊ शकतो हे सांगणारे हे गीत आहे. म्हणून राज कपूर हे ग्रेट शोमन ठरतात.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: