मंगळवार, १५ मार्च, २०२२

अलौकिक कर्तृत्व


आज जागतिक महिला दिन; पण महिला दिनाचे औचित्य साधून आपण लक्षात घेतले पाहिजे की, हा फक्त एक दिवसाचा प्रश्न नाही, तर महिलांच्या समानता आणि सन्मानाची जबाबदारी ३६५ दिवस असली पाहिजे. महिलांना देण्यात येणारी समानता किंवा सन्मान ही विशेष वागणूक न राहता ती नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाची असली पाहिजे. या जबाबदारीतून त्यांना कोणी दुबळ्या समजून विशेष वागणूक देता कामा नये. महिला आणि पुरुष यांच्या सहकार्यानेच सर्व काही होऊ शकते, हे लक्षात घेऊन त्यांना कायमची बरोबरीने संधी देणे हे महत्त्वाचे आहे.

आज असे एकही क्षेत्र नाही की, जे महिला करू शकत नाहीत. किंबहुना जी कामे केवळ पुरुषांचीच होती असे म्हटले जायचे, ती कामेही आजकाल महिला करू शकतात. त्यामुळे स्त्रीशक्तीचा सन्मान हा नेहमी आदराने केला जाणे गरजेचे आहे आणि तो केवळ एक दिवस नाही, तर कायम केला पाहिजे.


१९८२ साली सुनील दत्त यांनी कॅन्सर पीडितांवर आधारित एक चित्रपट काढला होता. त्यात आपल्या मुलीला झोपवताना त्यांच्या तोंडी एक अंगाईगीत आहे. त्याचे शब्द होते, ‘बाप की जगह माँ ले सकती हैं, माँ की जगह बाप ले नहीं सकता, लोरी गा नहीं सकता, सोजा सोजा.’ एका गाण्यात आनंद बक्षींनी पुरुषांच्या मर्यादा आणि स्त्रियांच्या क्षमतेवर कटाक्ष टाकला होता. स्त्रीला शक्तीचे रूप का म्हणतात हे याचसाठी.

पुरुषांची प्रत्येक कामे स्त्रिया करू शकतात; पण स्त्रियांची कामे पुरुषांना जमतीलच असे नाही. याचे कारण स्त्रियांच्या अंगात असणारी प्रचंड कार्यक्षमता, सहनशक्ती हे फार महत्त्वाचे आहे. अनेक वेळा बातम्यांमधून पाहिले असेल की, पौरोहित्यासारखी परंपरेने चालत आलेली, मंत्रपठणाची कामेही आजकाल महिला उत्तमप्रकारे करताना दिसतात. शहरातील अनेक पार्लरमधून केशकर्तन आणि पुरुषांच्या शारीरिक सौंदर्यासाठी आवश्यक असणारी सलूनची कामेही करणाºया महिला आहेत. त्यामुळे पुरुषांची सगळीच मक्तेदारी मोडून काढण्याचे काम महिला सहज करू शकतात; पण जी कामे केवळ स्त्रियांसाठी म्हणून परंपरेने ठेवलेली आहेत, ती कामे अजूनही पुरुषांना जमलेली नाहीत. यामध्ये टेलिफोन आॅपरेटर आणि नर्सिंग या क्षेत्राचा उल्लेख आवर्जून करावा लागेल, कारण प्रचंड सहनशक्ती आणि चिकाटी असणारी ही क्षेत्रे आहेत. पलीकडून बोलणारा काय वाटेल ते बोलू शकतो, यासाठी संयम असणे गरजेचे असते. हा संयम आणि सहनशक्ती असल्यामुळेच टेलिफोन आॅपरेटर या मुली असतात. आधुनिक कॉर्पोरेट जगात जी कामे कॉलसेंटरच्या माध्यमातून चालवली जातात तिथेही मुलीच असतात आणि त्यांच्या टीम लिडरही मुलीच असतात. हे त्यांच्यातील सहनशक्ती, क्षमता आणि संयमाच्या असलेल्या नैसर्गिक देणगीमुळे घडते. कोणत्याही रुग्णालयात गेल्यावर आपल्याला ज्या परिचारिका किंवा नर्स दिसतात, त्या ज्या सेवाभावाने काम करत असतात, तो गुण वाखाणण्यासारखा असतो. अत्यंत भेदभावरहीत त्यांचे वर्तन असते. कसलीही पसंती इथे नसते. समोर येईल तो रुग्ण केवळ तपासणे, त्याची सुश्रुषा करणे हे काम प्रामाणिकपणे फक्त महिलाच करू शकतात. आज वैद्यक शास्त्राप्रमाणे एक तज्ज्ञ डॉक्टरबरोबर पाच प्रशिक्षित नर्स असणे अपेक्षित असते; पण आपल्याकडे वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. पाच ते सहा डॉक्टर असलेल्या रुग्णालयात जेमतेम दोन ते तीन नर्स असतात. याचे कारण या क्षेत्रात असलेल्या मनुष्यबळाचा फार मोठा तुटवडा आपल्या देशात आहे. हे मनुष्यबळ निर्माण करण्याची ताकद फक्त महिलांमध्येच आहे. नर्सिंगचा कोर्स पुरुषही करू शकतात; पण ते त्यात यशस्वी होत नाहीत. नर्सिंग काऊन्सिलरच्या मान्यतेप्रमाणे या अभ्यासक्रमासाठी २० जागांना मान्यता असेल, तर त्यापैकी १८ मुलींसाठी असतात आणि २ पुरुषांसाठी असतात. तरीही २ पुरुषांच्या जागा बºयाच वेळा रिकाम्या राहतात. याचे कारण अखंड काम करण्याची महिलांची ताकद पुरुषांमध्ये नसते. तरीही त्यांना समानतेसाठी झगडावे लागते. प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या वरचढ असणाºया महिलांना दुय्यम वागणूक काही क्षेत्रात दिली जाते. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे मजुरी करणाºया स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो; पण त्याबाबत कोणीही आजवर आवाज उठवलेला नाही. बांधकाम क्षेत्रात काम करणाºया आणि गवंड्याच्या हाताखाली काम करणाºया, शेतात काम करणाºया शेतमजूर महिला यांचा प्रश्न आज फार महत्त्वाचा आहे. पुरुषांना दिल्या जाणाºया मजुरीपेक्षा स्त्रियांना दिली जाणारी मजुरी ही बांधकाम आणि शेतमजुरीच्या क्षेत्रात कमी असते. म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने काम करूनही स्त्रियांना दिली जाणारी मजुरी कमी असणे हे समानतेच्या विरोधात आहे. त्याबाबत कायदा होणे गरजेचे आहे. फक्त एक दिवस नाही, तर आपल्या संस्कारात ती कायमच समानता निर्माण करण्याची परंपरा इथूनच सुरू होणे गरजेचे आहे. ठरावीक मोठ्या झालेल्या आणि यशस्वी झालेल्या स्त्रियांचाच गौरव करण्यापेक्षा आम्ही या देशातील सर्वच स्त्रियांचा सन्मान करू इच्छितो. कारण संधी मिळाली, तर प्रत्येक स्त्री यशस्वी होऊन दाखवेल; पण तरीही सामान्य गृहिणीचे कार्यही तेवढेच महत्त्वाचे असते. एक गृहिणी जे करू शकते ते गृहस्थाला नाही जमू शकत. अचानक आलेला पाहुणा उपाशी जाऊ न देता त्याचे आतिथ्य फक्त महिलाच करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये असणारा नैसर्गिक व्यवस्थापनाचा गुण महत्त्वाचा असतो. कमी पैशांत आणि अनियमित पगार होणाºया पुरुषांचे संसारही या महिला नेटाने करतात आणि सगळ्या जबाबदाºया पार पाडतात, तेव्हा ती स्त्री सामान्य असूच शकत नाही. सर्वांना समाधान करण्याची ताकद असणारी स्त्री ही खºया अर्थाने शक्ती स्वरूप असते, कारण ती कधी आई बनून, पत्नी बनून, कधी बहीण बनून, तर कधी मैत्रीण बनून, कधी मुलगी होऊन जी आपल्या वेगवेगळ्या नात्यांतून जबाबदारी सांभाळते ती सन्माननीय असते. अशा या समस्त महिलांच्या अलौकिक कर्तृत्वाला आमचा सलाम आणि मन:पूर्वक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: