जगातील अनेक देशांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केलेली आहे. आपल्या देशातही त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही निर्बंध शिथिल होण्याचे आणि शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचे संकेत नुकतेच दिले होते, तरीही अनेक देशांमध्ये याबाबत साशंकता अजूनही व्यक्त होत आहे. अर्थात ज्या देशांची सरकारने त्याला राजी नाहीत, त्यांनाही तेथील जनतेने उग्र निदर्शने करून नमविल्याचीही उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात गेली दोन वर्षे आपण आपल्या तोंडावर ज्या मुखपट्ट्या घालून फिरतो आहोत, त्यापासून मुक्ती मिळवण्याच्या टप्प्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. अर्थात जरी मास्कमुक्त होण्याचे जाहीर केले, तर आता इथून पुढे आपण कायमच मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करणे हितावह ठरणार आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. मोठमोठी क्षेपणास्त्रे या युद्धात वापरली जात आहेत. त्याप्रमाणे एखादे जैविक अस्त्रही वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याप्रमाणे चीनने कोरोनाचे अस्त्र सोडले तसे एखादे आले, तर आधीच काळजी म्हणून मास्क न उतरवण्याची सवय लावून घ्यावी लागेल. निर्बंधमुक्त याचा अर्थ मास्कमुक्त असा नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
आता अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना ही काही महामारी राहिलेली नाही, तर पँडेमिक ऐवजी तो एंडेमिक बनलेला आहे, अशी भूमिका तेथील सरकारांनी घेतली आणि निर्बंध हटवायला सुरुवात केली आहे. डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे अशा युरोपीय देशांनी जानेवारी अखेरीस एकीकडे ओमिक्रॉनची लाट उसळलेली असतानाच आपल्या देशातील सर्व निर्बंध उठविले होते. ब्रिटननेही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मागे घेतली आहे. इटली आणि स्पेननेही ब्रिटनच्या पावलावर पाऊल टाकत मास्कसक्ती मागे घेतली आहे. केवळ बंदिस्त जागेमध्येच मास्क वापरले जावेत. बाहेर खुल्या जागेमध्ये मास्क वापरण्याची आता आवश्यकता नाही अशी भूमिका त्या देशांच्या सरकारांनी घेतली आहे.
अर्थात हे आपल्याला शक्य नाही. कारण आपल्यासारखी सार्वजनिक ठिकाणची अतोनात गर्दी युरोपीय देशांमध्ये सहसा पाहायला दिसत नाही. त्यामुळे तेथे मास्कविना सामाजिक अंतर आपोआप राखले जाऊ शकते, तसे आपल्याकडे होणे शक्य नाही. तरीही आपल्या देशातही आसाम, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांनी केवळ तोंडावरचा मास्क सोडल्यास सर्व प्रकारचे निर्बंध हटविलेले आहेत. आता महाराष्ट्र सरकारही त्याबाबत विचार करीत आहे. शाळा तर आॅफलाइन पद्धतीने सर्वत्र सुरू झालेल्या आहेत. एकेक करून कोरोनाचे निर्बंध कमी होत चालले आहेत, परंतु सर्वच्या सर्व निर्बंध हटविणे सध्याच्या परिस्थितीत योग्य व हितकारक ठरेल का, याबाबत तज्ज्ञांनी अभ्यास करून आपली भूमिका मांडावी लागेल.
केवळ जनतेच्या दबावांखातर किंवा आर्थिक दबावांखातर हे निर्बंध हटविणे धोक्याचे ठरू शकते. त्याशिवाय निवडणुका जवळ आल्यामुळे, निवडणुकीच्या वातावरणात या निर्बंधांचा फटका आपल्याला बसेल असा विचार कोणत्याही सरकारने करू नये. वैद्यकीय तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे, खरोखरच कोरोना महामारीपासून, सध्याच्या तिच्या तिसºया लाटेपासून आपण मुक्त झालो आहोत का याचा विचार करून सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे.
ज्या देशामध्ये कोरोनाची सुरुवात झाली. त्या चीनमध्ये तर अजूनही सर्व कडक निर्बंध कायम आहेत. मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या, संसर्गशोध, आत आणि बाहेर मास्क वापरणे हे सगळे निर्बंध चीनने कायम ठेवलेले आहेत.
भारतात मास्क वापरण्याची अजूनही सक्ती आहे, परंतु तिचे पालन मात्र आता पूर्वी इतक्या गांभीर्याने होताना दिसत नाही. जर सक्ती असेल, तर तिची कार्यवाही व्हायला हवी आणि जर नसेल तर निर्बंध अधिकृतरित्या हटविले जायला हवेत. धड सक्तीही नाही आणि धड मुक्तीही नाही अशा धेडगुजरी वातावरणात कोणीही सुखाने श्वास घेऊ शकणार नाही, कारण आपण मास्क वापरला, तरी समोरचा वापरेल याची शाश्वती नसते. परंतु एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण मास्क वापरणे आपल्या हिताचे आहे. काळानुरूप अशा सवयी अंगवळणी पडणे आवश्यक आहे. सरकारने मास्कमुक्ती केली याचा अर्थ आता मास्क वापरूच नये असे नाही. म्हणूनच आपल्याला आता निर्बंध मुक्त झालो असलो, तरी मास्कमुक्त होण्याची गरज नाही. ती एक व्यावहारिक सवय मान्य करणे गरजेचे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोरोनाबाबत सावधगिरीचीच भूमिका घेतलेली दिसते. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग कायमचे राहणार नाही. कधीतरी ते संपुष्टात येणारच आहे, परंतु ती वेळ अद्याप आलेली आहे की नाही याबाबत तज्ज्ञांमध्येच मतभेद आणि त्यामुळे संदिग्धता आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येकाजवळ हातरूमाल असतो, उन्हाळ्यात डोक्याला टोपी, गॉगल असतो. तशाचप्रकारे आता कायमस्वरूपी मास्कची सवय लावून घेतली तरी हरकत नाही. ओमिक्रॉन हा काही कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नव्हे, असेही जागतिक आरोग्य संघटना सांगत असल्याने आणि जगात कुठे कुठे त्याहून वेगळ्या व्हेरिएंटची काही तुरळक उदाहरणे आढळून आल्यामुळे या संभ्रमात भरच पडली आहे. ही महामारी संपुष्टात येण्याची प्रतीक्षा संपूर्ण जग करते आहे. आजवरच्या महामाºयांप्रमाणेच कोरोनाची महामारीही संपुष्टात येणारच आहे, परंतु थोडा संयम गरजेचा आहे. पण निर्बंध मुक्त झालो तरी मास्कमुक्त व्हावे असे नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा