मराठी रंगभूमीवरचे जे अविष्कार आहेत की, ज्याच्यामध्ये नाट्य दडलेले आहे, यातील एक प्राचिन प्रकार म्हणजे भारूड. याचा अध्यात्माशी संबंध असला, प्रबोधनाचा संबंध याच्याशी असला, तरीही ती एक प्रकारची नाट्य चळवळ आहे. त्यामध्ये अभिनय आणि नाटकाला वाव आहे. म्हणूनच मराठी रंगभूमीच्या इतिहासात भारूडाचा समावेशही नाटकात करावा लागेल. खरेतर भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. अनेक संतांनी समाज प्रबोधनपर भारूडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारूडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यात नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत, परंतु एकनाथांचे नाव हे भारूडाशी अतूट जोडले गेले आहे. आपल्याकडे लोककलांचा वापर नाटकासाठी नेहमीच केला गेलेला आहे. नाटकासाठी विविध फॉर्म लागतात तसा भारूड हा एक नाटकास पोषक असा फॉर्म आहे.
महाभारतात शकुंतला आख्यान, भारूड सांग हा गीतप्रकार होता. त्यावरून भारूड हा शब्द किमान २००० वर्षे इतका प्राचीन असण्याची शक्यता आहे. वेदकाळी व वेदोत्तरकाळी येते प्रसंगी प्राकृत लोकांचे जानपदाचे, करमणुकीचे प्रकार होत. त्यातून वैदिक देव व त्यांच्या शौर्य प्रसंगांची स्तुती गायली जायची. याज्ञिक लोकांनंतर यज्ञांची जागा देवपूजेने तर संस्कृत भाषेची जागा प्राकृत भाषेने घेतली, तेव्हा कालमानानुसार पालटते रूप घेऊन जानपद वाङमय भारूड स्वरूपात आले असावे. भारूडाचे उगमस्थान म्हणजे हरिकीर्तन आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे नामदेव महाराज. नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळित म्हणतात आणि लळितातून रूपकाचा जन्म झाला. अध्यात्म सांगायचे ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून. भारूडाचा प्रधान हेतू हाच होता. तर ‘बहुरूढ’ या शब्दाचा अपभ्रंश ‘भारूड’ झाला असेही काहींचे मत आहे.
एकनाथांच्या भारूडांतून त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत मांडला गेला आहे. सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर होता. त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्त्वज्ञान त्यांच्या भारूडांत आढळते. नाथांच्या भारूडांत विषयांची विविधता खूप आहे. साºया जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारूडांमधून व्यक्त झाले आहे. भारूडांच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष-दुर्गुणांचे भजन तसेच गूढगुंजन आहे. भारूड लिहिण्याच्या प्रयोजनांवरून व रचना संकेतांवरून एकनाथांची भारूडे ही आध्यात्मिक प्रबोधन व लोकरंजन साधण्यासाठी केलेली रूपकात्मक स्फुट रचना होय. म्हणूनच संस्कृत वाङमयात जे स्थान पुराणांचे आहे तेच संत वाङमयात भारूडांचे आहे. भारूड रचनांमध्ये नाट्यतत्त्वे ठासून भरलेली असतात. त्यामुळे त्यांचे नाट्यरूपांतर सहजतेने होते.
भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बºयाच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे. संस्कृत किंवा प्राकृत भाषेत भारूड हा शब्द भारूड या गीत प्रकाराला उद्देशून जरी असला, तरी या भाषांमध्ये भारूड रचना उपलब्ध नाही. त्यामुळे भारूड या काव्यरचनेचा उगम हा मराठी भाषेतच झाला. संत ज्ञानेश्वर हेच भारूडाचे आद्यरचनाकार असावेत, असा एक प्रवाह मानतो. मात्र त्या आधीही भारूडे प्रचलित होती. संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले.
भारूडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे असतात. व्यवसाय, नाती-गोती, सामाजिक वृत्तीदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत-पिशाच्च, पशु-पक्षी, सण आदी बाबी असे विविध विषय एकनाथांच्या भारूडांत दिसून येतात. भारूडाचे साधारणपणे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो, जसे ‘चिंचेच्या पानी एक देवालय उभारीले, आधी कळस मग पाया रे किंवा मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...सारख्या कूट रचना यात असतात. पण सोंगी भारूड हा प्रकार अधिक लोकप्रिय झाला. कारण त्यात नाट्यबिजे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक जत्रांमध्ये तमाशांप्रमाणे भारूडाचा कार्यक्रम जोरात केला जातो.
एकनाथ महाराजांनी ४५० वर्षांपूर्वी एडका या भारूडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रूपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारूडांचा उपयोग केला जातो. किंबहुना आपल्याकडे जी पथनाट्ये सादर केली जातात, त्यातही कुठेतरी भारूडाचे स्वरूप आढळते.
खरे म्हणजे लोकशिक्षणासाठी संतांनी भारूडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादनही करावे लागते. भारूडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यामाबरोबरच नटही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच भारूडांनी जनमनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य केले आहे. हीच भारूडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारूडात आहे असे म्हटले जाते. मराठी संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारूडांची व्यवस्था केली. हा एक वारकरी कला आविष्कार आहे. तो रंगभूमीशी अत्यंत जवळचा आहे. अनेक नाटककारांनी एकांकिकेसाठी भारूडाचा वापर केल्याचे दिसून येते. पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारूडकर्त्या भारूडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप हे भारूड सादरकर्ते आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे व सीताबाई आरोटे यांनी महाराष्ट्रभर वारकरी भारूडे सादर केली. पुरुषवेश धारण करून या दोघी बहिणींनी मुंबईसह महाराष्ट्र गाजविला. मुंबईमध्ये त्यांच्या भारूडासाठी अलोट गर्दी व्हायची. वामन केंद्रे यांनी दरवाडी येथे २०११ मध्ये भारूड महोत्सव आयोजित केला होता. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी भारूडाची कला जिवंत ठेवली आहे, त्यांनी १४ मे २०१६ पर्यंत बहुरूपी भारूडचे २१०० प्रयोग केले आहेत.
- प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा