राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मत नेहमीच स्पष्ट आणि खरे असते. ते कोणाचीही भीडभाड न ठेवता आपले मत स्पष्ट मांडतात, म्हणूनच त्यांना जनाधार चांगला असतो. त्यांच्या मताला किंमत असते. बाकीच्यांची मते नुसतीच करमणुकीसाठी असतात, परंतु चाणाक्ष राजकारण कसे करायचे आणि तोंडाची वाफ विनाकारण न दवडता मुंगी होऊन साखर खाण्याचे काम त्यांनी अत्यंत सहजपणे चालवले आहे.
रविवारीही त्यांनी व्यक्त केलेले मत अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणजे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या आरोपांसंदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये न बोलावता त्यांच्या घरी जाऊन बीकेसी पोलीस तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वच राजकीय नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या आहेत. आपल्या प्रतिक्रियेमध्ये सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आंदोलन करणार असल्याबाबत विचारणा करताच अजित पवारांनी भूमिका मांडली आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नोटीस कशामुळे दिली?, माझे एवढेच म्हणणे आहे की, सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावे. देशात, राज्यात आपल्याकडे अशी परिस्थिती कधीच नव्हती. नोटिसा देणे, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणे वगैरे. मी पंतप्रधानांसमोर देखील त्याबाबत वक्तव्य केलंय. प्रत्येकाने आपापलं काम करावं. जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत. यातून एकप्रकारे फडणवीसांना आलेल्या नोटिशीवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.
अजित पवार हे आपले काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठे करायला चाललेले आहेत. बाकीचे पक्ष विशेषत: भाजप आणि शिवसेना हे एकमेकांवर टीका करण्यात मग्न असताना, अजितदादा मात्र एकाच दिवसात ३० विकासकामांचे उद्घाटन करून आपले काम जनतेपुढे दाखवत आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपले काम करावे, असे सांगून त्यांनी राजकीय पक्षांना सल्ला दिला आहे की, तुम्ही चिखलफेक करण्यात वेळ घालवू नका, जनता दारात उभी करणार नाही. तुम्ही काम करत राहा. रविवारी एकाच दिवशी पुण्यातील ३० विकासकामांचे उद्घाटन अजित पवारांनी केले. पुण्याचे ते पालक मंत्री आहेतच; पण या कार्यक्रमांना दहा ठिकाणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनाही बोलावले आहे. मागच्या आठवड्यात पुण्यात भाजपने विविध विकास कामांचे उद्घाटन करून आपले काम दाखवले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच विकासाच्या मार्गाने जात आहेत, हे बिंबवण्यात हे दोन पक्ष आघाडीवर आहेत; पण शिवसेना आणि काँग्रेस मात्र याबाबतीत मागे पडताना दिसत आहेत. नेमके हेच अधोरेखित करण्याचे काम भाजप आणि महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी करताना दिसत आहे. आज शिवसेनेच्या कृपेने आपल्याला सत्ता मिळाली असली, तरी त्याचा जास्तीत जास्त लाभ कसा उठवता येईल हे पाहण्याचे काम अजित पवारांसारखा चाणाक्ष नेता पाहिल्याशिवाय कसे राहतील?, विविध नेत्यांवर टीका टिप्पणी होत असताना, चिखलफेकीचे राजकारण चालू असताना अजित पवार मात्र नामानिराळे होते. त्यांनी फक्त विकासकामे आणि नियोजन यावर लक्ष केंद्रीत केल्याचे आता दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना बाजूला सारण्यासाठी आणि आपला पक्ष मोठा करण्यासाठी चिखलफेक नाही, तर जनतेला दिसतील अशी कामे दाखवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी आपली शक्ती खर्ची केल्याचे दिसते. पुण्यात असे काही केले की, त्याचा गवगवा राज्यभर होतो आणि फायदा पक्षाला मिळेल हे राजकारण त्यांनी राबवले आहे. त्याचा फायदा नक्कीच त्यांना होणार हे निश्चित.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमची नोटीस आल्यावर त्यांनी कसलीही का-कू न करता चौकशीला जाण्याचे जाहीर केले. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे जाहीर केले. त्यामुळे गृह मंत्रालयालाच विचार करावा लागला. तुम्ही पोलीस ठाण्यात येऊ नका आम्हीच तुमच्याकडे येतो, असे सांगून पोलीस घरी पाठवले. २०१९च्या निवडणुकी अगोदर शरद पवारांची ईडी चौकशी होणार, अशी बातमी आल्यावर शरद पवार म्हणाले, मी नोटिशीची वाट पाहत नाही, मीच जातो ईडीच्या कार्यालयात. हे सांगताच ईडी पण हादरून गेली. तुम्ही येऊ नका आम्हाला वाटले तर आम्ही येऊ, बोलावू असे कळवले. कर नाही त्याला डर कशाला हे त्यांनी यातून दाखवून दिले. शनिवारी फडणवीसांनीही तेच दाखवून दिले. पण जे नेते चौकशीला सामोरे जाण्याचे टाळतात, न्यायालयात जाण्याचा प्रयत्न करतात, पळापळ करतात ते मात्र अडकतात. अनिल देशमुख यांनी जवळपास सहा महिने पळापळ केली, अखेर त्यांना अटक करावे लागले. नवाब मलिकांचे तेच झाले. अनेक नेते चौकशीला सामोरे जाण्याचे टाळतात, तेव्हा कुठे तरी पाणी मुरलेले आहे, हे यातून दिसून आले आहे; पण पवार आणि फडणवीसांची कृती ही दोघांच्या समान कार्यपद्धतीची साक्ष आहे. भविष्यात यातूनच समान कार्यक्रम तयार झाला, तर आश्चर्य वाटायला नको, हेच यातून दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा