गुरुवार, ३१ मार्च, २०२२

संदेश फार महत्त्वाचा


राज्यातील महाविकास आघाडीतील विविध मंत्री आणि नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर या ईडीची पोहोच थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत गेल्याने राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले आहे, पण या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाची भूमिका दाखवली हे फारच छान उदाहरण आहे. बाकीच्यांनी काहीही वक्तव्ये केली, तरी आपला तोल ढळू न देता, संयम राखत त्यांनी कसलेही मत यावर व्यक्त केले नाही हे उत्तम नेत्याचे गुण म्हणावे लागतील. हाच सूज्ञपणा त्यांना भविष्यात उपयोगी पडेल यात शंका नाही. काही वेळा व्यक्त न होणे, मौन राखणे हे योग्य धोरण असते हे त्यांनी दाखवून दिले हे फार चांगले झाले.


बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार व नेत्यांना वर्षा बंगल्यावर बोलावून स्नेहभोजन दिले, मात्र स्नेहभोजन एक निमित्त होते, ईडीच्या कारवायांबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यायची याबाबत चर्चा करण्यासाठीच हे आयोजन असावे, असा राजकीय जाणकारांचा सूर होता. लॉकडाऊन लागल्यापासून ई-तंत्राने बैठकांना उपस्थिती लावणाºया ठाकरे यांची राज्यातील घडामोडींबाबत ही ई-डिनर डिप्लोमसी असल्याचेही मानले जात आहे. या वेळी ईडीवर चर्चाच झाली नसल्याचा दावा अनेक आमदार-मंत्र्यांनी केला, हे विशेष होते.

या प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री आणि आमदारांशी संवाद साधताना आपापल्या मतदारसंघांतील विकासकामांचा शेवटपर्यंत पाठपुरावा करा, अशा सूचना दिल्या. केवळ आपल्याच नव्हे, तर शेजारील मतदारसंघांवरही लक्ष असू द्या, अशी सूचना त्यांनी केली. हे फार महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य जनतेची मते मिळवण्यासाठी आरोप, प्रत्यारोप, चिखलफेक उपयोगाला पडणार नाही, तर जनतेला फक्त विकासकामे हवी आहेत. कोणी किती माया जमवली याच्याशी काही कोणाला पडलेले नाही. तळे राखी तो पाणी चाखी हे सर्वांनी मान्य केले आहे. त्यामुळे जनतेसाठी काय करता आहात हे महत्त्वाचे आहे. नेमकी ही नस उद्धव ठाकरे यांनी पकडली हे फार महत्त्वाचे आहे.


अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नेमके हेच केले होते. टीकाकारांना विशेषत: काँग्रेसला कितीही टीका करू देत, कसलीही चौकशी करू देत आपण विकासकामांनी मतदारांना जवळ केले पाहिजे आणि जनतेच्या न्यायालयात न्याय मिळवला पाहिजे हा फॉर्म्युला त्यांनी यशस्वी केला. त्याच पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री चालले आहेत हे अत्यंत स्वागतार्ह आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्नेहभोजनाच्या वेळी शिवसेना आमदार आणि अन्य नेत्यांशी चर्चा केली, परंतु यात ईडीचा कुठेही उल्लेख नव्हता, असे स्नेहभोजनाला उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी सांगितले. आपापल्या मतदारसंघांतील विकासकामे, तेथील समस्या आणि त्यावरील उपाय-योजना याबाबत चर्चा करण्यासाठी या स्नेहभोजनाचे नियोजन होते. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना मार्गदर्शन केले. सध्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून परस्परांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप याबाबतही या वेळी चर्चा होणे स्वाभाविक आहे. या स्नेहभोजनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. पण यावेळी प्रत्येकाने आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करावे आणि विकासकामांना महत्त्व दिले पाहिजे. काही वेळा मौन राखणेही योग्य असते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले हे महत्त्वाचे आहे.


खरंतर हे काही आज होते आहे, असे नाही. इन्कम टॅक्सच्या धाडी या दशकानुदशके चालत आहेत. १९७०च्या दशकातील दिवाळी अंक काढले तर त्यातील अनेक व्यंगचित्रे ही इन्कम टॅक्सच्या धाडींवर असायची. दादा कोंडके यांच्या राम राम गंगाराम यातही यावरून टोला मारण्यासाठी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्याचे दाखवले आहे. त्यावेळी बाथरूमच्या सिलिंगमधून नोटा कशा लपवलेल्या होत्या हे दाखवले आहे. त्यामुळे ते काही आज घडते आहे असे नाही. मोदी सरकार आल्यावर हे प्रकार घडू लागले म्हणणे म्हणजे इन्कम टॅक्सचे अधिकारी इतके वर्ष निकम्मे होते, असे म्हटल्यासारखे ठरेल. तो त्यांच्या कामाचा भाग आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे काम करू देणे हेच योग्य. शेवटी देश चालवायचा तर महसूली उत्पन्न वाढले पाहिजे. विकासकामांना निधी कोणत्या माध्यमातून येणार आहे? त्यामुळे प्रत्येकाचे उत्पन्न किती आहे, त्याप्रमाणात नियमाप्रमाणे कर भरला आहे की नाही, बेहिशेबी काही आहे का हे तपासण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो त्या खात्याचा कामाचा एक भाग आहे. त्यासाठी राजकारण करण्याची गरज नाही. सीबीआय, ईडी यांचेही तसेच आहे. त्यामुळे त्यांनी कोणाची चौकशी केली, कोणाला ताब्यात घेतले तर त्यावर लगेच व्यक्त होण्याची गरज नाही. निर्दोष असेल, सगळे नियमानुसार असेल, तर घाबरण्याचे कारणच नाही. पण लगेच त्यावर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे, असा कांगावा करणे हे चुकीचे आहे. अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने व्यक्त न होता मौन बाळगणे मुख्यमंत्र्यांनी पसंत केले हे खरेच चांगले झाले. ही खाती आपापली कामे करत आहेत, आपणही आपली कामे केली पाहिजेत, आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत हा दिलेला संदेश फार महत्त्वाचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: