गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता सर्व काही सुरू होते आहे, भारत निर्बंधमुक्त होत आहे हे पण चांगले आहे. पण आता नंतरचे जे कवित्व पुढे येताना दिसत आहे ते आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे. भारतात कोरोना मृत्यूंचा आकडा बनावट असल्याचा अहवाल एका संस्थेने केल्यामुळे खळबळ माजवायचा प्रयत्न सुरू आहे हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल.
गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या संसर्गाने कहर केला होता. कोरोनामुळे जगभरातल्या लाखो नागरिकांचा बळी गेला. आता कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. भारतातल्या आणि जगभरातल्या कोरोना बळींबाबतची माहिती देणारा एक रिपोर्ट द लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. कोरोना बळींची संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा खूपच जास्त असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हे दावे कशासाठी केले जातात? संपूर्ण जगात आमची लोकसंख्या जास्त असतानाही आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे, आमच्याकडे वैद्यकीय सुविधा नसतानाही प्रगत देशांच्या अगोदर आम्ही लसीकरणाचा प्रभावी प्रयोग केला, संशोधन केले आणि मात केलेली आहे, त्याचे कौतुक का केले जात नाही? विविध पक्षांची सरकारे विविध राज्यात असतानाही या युद्धात सर्वजण एकदिलाने लढले. पक्षभेद विसरून सर्वांनी हालचाली केल्या हे महत्त्वाचे नाही का? पण आकडेवारी खरी का खोटी यावरून वादळ माजवण्याचा प्रकार हा चुकीचा आहे.
भारतीय आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात कोरोनामुळे ४,८९,००० जणांचा मृत्यू झाला, असे भारत सरकारची अधिकृत आकडेवारी सांगते; पण प्रत्यक्षात या आकडेवारीपेक्षा आठ पट अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा ‘द लॅन्सेट’मध्ये करण्यात आला आहे. हा दावा खरा मानला तर भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ४० लाखांपेक्षा जास्त बळी गेले आहेत असे म्हणता येईल. पण या अहवालावर विश्वास का ठेवावा? कशासाठी ठेवावा? कोणत्याही कारणाने ४० लाख लोकांचा मृत्यू झाला असला, तरी तो कोरोनामुळेच झाला असे सांगायचे आहे का? मुळात इतके मृत्यू झाले आहेत का याची चौकशी व्हायला पाहिजे. असे अहवाल कशाच्या आधारावर सादर केले जातात हे तपासले पाहिजे. वैद्यकीय नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे त्यात घोटाळा असणे साहजिक आहे. कारण एकूणच कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात मेडिकल कंपन्या, औषध कंपन्या, डॉक्टर मंडळी यांनी इतके घाबरवून सोडले होते, औषधेइतकी महाग केली आणि सामान्यांची लूट केली की, त्यांनी असा खोटा अहवाल देणे अपेक्षितच म्हणावे लागेल.
भारतात कोविड-१९मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमी नोंदवण्यात आल्याचा दावा द लॅन्सेटच्या एका नव्या रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे. हा रिसर्च पेपर ११ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कोविड-१९मुळे संपूर्ण जगभरात ५९ लाख जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. प्रत्यक्षात १.८२ कोटी जणांचे बळी गेल्याची शक्यता लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच ही संख्या अधिकृत नोंदीपेक्षा तीन पट अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. थोडक्यात या अहवालात त्यांना म्हणायचे आहे की, जगभरात कोरोना मृत्यूंची संख्या लपवली गेली, खोटी सांगितली गेली. फक्त भारतानेच नाही तर इतर देशांनीही आकडेवारी लपवली. पण अशी आकडेवारी लपवायची आणि खोटी आकडेवारी दाखवायची गरजच काय? जगभरातील अनेक देशांना त्यापासून काय लाभ होणार होता यावर या अहवालात भाष्य केले असते तर बरे झाले असते. म्हणजे आकडेवारी कमी दाखवल्याने अमूक एक फायदा होत आहे असे काही त्यात मत प्रदर्शित होणे अपेक्षित आहे. विनाकारण खळबळ माजवण्यासाठी काहीतरी सांगायचे हे चुकीचे आहे.
१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात कोविड-१९ मुळे जगभरात ५९ लाख जणांचा मृत्यू झाला अशी अधिकृत नोंद आहे; पण कोरोना महामारीमुळे जगभरात जवळपास १.८२ कोटी बळी गेल्याचा आमचा अंदाज आहे, असे द लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. देशनिहाय विचार केला, तर भारतात ४०.७ लाख, अमेरिकेत ११.३ लाख आणि रशियात १०.७ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे द लॅन्सेटचे म्हणणे आहे. म्हणजेच प्रत्येक देशाने कोरोना बळींची खरी आकडेवारी लपवली असल्याचे द लॅन्सेटचे म्हणणे आहे. भारतात नोंदविण्यात आलेली अधिकृत आकडेवारी प्रत्यक्षातल्या मृत्यू संख्येपेक्षा खूपच कमी असल्याचा दावा द लॅन्सेटच्या या नव्या रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे. २०२१च्या अखेरीपर्यंत जगभरात कोरोनाचे सगळ्यांत जास्त बळी भारतातच गेल्याचे द लॅन्सेटचे म्हणणे आहे. भारतातल्या मृत्यूची खरी आकडेवारी ४०.७ लाख असल्याचा द लॅन्सेटचा दावा आहे. द लॅन्सेटला बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने अंशत: आर्थिक मदत दिली जाते. या फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळणाºया निधीच्या मदतीतून संशोधनाची अनेक कामे केली जातात. अशी आकडेवारी जाहीर केल्याने त्यांचा काही आर्थिक फायदा होणार असेल यासाठी असा अहवाल दिला आहे का असाही प्रश्न यामुळे निर्माण होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा