युक्रेनमध्ये जवळपास वीस हजार भारतीय अडकल्याची माहिती गेल्या चार दिवसांत समोर आली. हे युद्ध पेटले नसते, तर किती भारतीय त्या देशात आहेत हे कोणाला समजलेही नसते, पण एरवी आपल्या देशाला नावे ठेवणारे, देशाकडे पाठ फिरवणारे अडचणीत आल्यानंतर मात्र त्यांना देशाची आठवण येते, हे दिसून आले आहे.
हे हजारो भारतीय कसे अडचणीत आहेत, त्यांचे तिथे कसे हाल होत आहेत यावरून वृत्तवाहिन्या अगदी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने त्यांना भारतात परत आणले पाहिजे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे, म्हणून या वाहिन्या भावनिक लाट निर्माण करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हेच लोक एरवी आपल्या देशाला किती विचारत होते? ते काही देशाच्या हितासाठी तिथे गेलेले नाहीत. स्वत:ची नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा निमित्ताने ते गेलेले आहेत. सीमेवरचा सैनिक ज्या देशप्रेमाने सीमेवर जातो तसे हे लोक गेलेले नाहीत. एरवी आपल्या भारताला नावे ठेवणारीच ही प्रजा असते.
जे विद्यार्थी शिकायला म्हणून तिकडे गेलेले आहेत त्यांना भारतात शिक्षण मिळत नव्हते का? जे भारतीय व्यवसायासाठी तिकडे गेले आहेत त्यांना भारतात व्यवसायाची संधी नव्हती का? देशासाठी त्यांचे योगदान काय? वर्षा, दोन वर्षांनी सुट्टीला म्हणून इकडे आल्यावर बाहेरच्या देशांचे गोडवे गाणारे हे लोक संकटात आल्यावर त्यांना भारताची आठवण आली का?
स्कॉलरशिप मिळवणारे, गुणवत्ता यादीत चमकणारे हे विद्यार्थी स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी म्हणून बाहेरच्या देशात जातात. ते स्वत:ला मोठे करण्याचे काम करत असतात. त्यांचे योगदान देशासाठी काहीही नसते. पण आज अडचणीत आल्यावर भारतीय यंत्रणेला नावे ठेवत आहेत. सरकारने आम्हाला सोडवले पाहिजे, सरकारने आमची सोय केली पाहिजे म्हणून बोलत आहेत. यापैकी किती जण देशहितासाठी म्हणून, सरकारने पाठवले म्हणून तिकडे गेलेले होते?
हे आजच घडते आहे असे नाही. असे युद्ध खरेतर पहिल्यांदाचा घडते आहे, पण महामंदीच्या काळात जेव्हा अमेरिकेने अनेकांना कामावरून काढून टाकले, तेव्हाही अनेकांनी असाच कांगावा केलेला होता. कोरोनाच्या काळातही अनेकांनी भारत सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावे म्हणून आग्रही होते, पण तुम्ही देशासाठी काय केले आहे? परदेशात जाऊन नोकरी धंदा करता त्याचा देशाला काय फायदा आहे? पण या अतिविद्वान मुठभर लोकांमुळे राजकारण मात्र जोरात तापवले जाते.
युद्धाची परिस्थिती जवळपास महिनाभर तयार झालेली आहे. या लोकांना भारतात परत आणायचे प्रयत्न सरकारने अगोदरच का केले नाहीत, असा सवाल अनेक जण करत आहेत. आज रशियाने हवाई सीमा बंद केल्यावर अनेक जण म्हणत आहेत की, सरकारने या भारतीयांना आणायची अगोदरच सोय करायला हवी होती. पण यात सरकारची चूक काय आहे? तिथली परिस्थिती चिघळेपर्यंत हे लोक तिथे थांबलेच का? त्यांना तिथल्या परिस्थितीची जाणिव झालेली असणारच. मग वेळीच त्यांनी सरकारला विनंती केली असती, तर दोन महिन्यांपूर्वीच सगळ्यांना आणता आले असते. पण आता अडचणीत सापडल्यावर सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक बाबतीत सरकारला दोष देण्याची लागलेली ही सवय बदलली पाहिजे. विरोधकही त्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. अर्थात ते केवळ राजकारण करण्यासाठी तसे करत आहेत. एरवी या सरकारवर टीका करायला काही कारण मिळत नाही म्हणून हे निमित्त आहे. पण जर विरोधक सत्तेत असते आणि अचानक युद्ध पेटले असते, तर त्यांनी काय केले असते? जे आपल्या हातात नाही त्यासाठी सरकारला दोष देण्याची गरज नाही.
युक्रेनमधून परत आलेल्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर अनेक पक्षांचे लोक गेले होते. त्यांचे स्वागत काय केले. त्यांना कोणी ओवाळून काय घेतले. त्यांची बडदास्त काय ठेवली. असे स्वागत आमची सेवा करणाºया सैनिकांचे आपण करतो का? पोलीस आपल्या मदतीसाठी अहोरात्र असतात. कधी त्यांचे कौतुक असे केले आहे का? पण फक्त स्वहितासाठी परदेशात गेलेले अडचणीत आल्यावर भारतात आले त्यांचे कसले कौतुक करायचे आहे?
मदत करणे ही आपली संस्कृती आहे. आपण शत्रूलाही प्रसंगी मदत करत असतो. हे तर आपलेच आहेत. पण त्यांना हा देश आपला वाटतो आहे का? याचा विचार केला पाहिजे. बाहेरच्या देशात शिकायचे, कमवायचे, पैसे कमवून मोठे व्हायचे आणि कधीतरी इकडे आल्यावर त्या देशाचे गोडवे गायचे आणि भारताला नावे ठेवायची. अशा प्रवृत्तीच्या लोकांचे स्वागत करणे चुकीचेच आहे.
यापैकी किती लोकांनी संकटकाळात देशाला मदत केलेली आहे? किती लोकांनी कोरोना काळात मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधीला हातभार लावला आहे? त्यामुळे वैयक्तिक लाभासाठी परदेशात गेलेल्यांचे जास्त स्तोम माजवू नका. जरा आमचे सैनिक वर्षातून सुट्टीला येतात, तेव्हा त्यांचे स्वागत करा छानपैकी. ते आपल्या देशासाठी तिथे प्राण हातात घेऊन जात असतात. कौतुक त्यांचे करायला पाहिजे. नको त्यांचे स्तोम माजवण्याची गरज नाही. युद्ध झाले नसते तर या लोकांना भारताची आठवणही आली नसती, याचाही विचार केला पाहिजे.
- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\
28 feb
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा