गुरुवार, ३१ मार्च, २०२२

तत्त्वज्ञानी लेखक व. पु. काळे


मध्यमवर्गीयांकडून प्रचंड पसंती मिळालेले लोकप्रिय कथाकथनकार, लेखक म्हणून व. पु. काळे यांची ओळख आहे, पण ते मनोरंजनातून साधे सोपे तत्त्वज्ञान जे देत होते ते अत्यंत अंतर्मुख करणारे असे होते. त्यामुळेच त्यांचे लेखन वाचकांना पसंत पडत होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. अशा वपुंचा आज जन्मदिवस.


वपु हे प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनांचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. १९८०चे दशक हे वपुंच्या कॅसेटनी गाजले होते. अलुरकर म्युझिक हाऊसने त्यांच्या बहुतेक कथा कॅसेट स्वरुपात आणून विक्रम केला होता. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहिले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.

विशेष म्हणजे वपु हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. व. पु. काळे मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार, अशी ख्याती असलेले व. पु. काळे बहुढंगी विचार करणारे मध्यमवर्गीय, नोकरदारांचे लेखक होते. आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणस, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार, असे पत्रसंग्रह, ललीत प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत, तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यांसारख्या कादंबरी खूपच गाजल्या. वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, पु. भा. भावे पुरस्कार, फाय फाऊंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले होते.


व. पु. काळे यांचे विचार हे अत्यंत स्पष्ट होते. आचार्य ओशो रजनीश यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता. ते त्यांचे अनुयायीच होते. त्यामुळेच वपुंच्या लिखाणातून व्यक्त होणारे विचार हे अत्यंत साधे पण तत्त्वज्ञान देणारे आहेत. आजही त्यांचे विचार यूट्यूबसह अनेक समाजमाध्यमांवर मेसेज म्हणून जात असतात. वपुंनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत!’ किती सहजपणे सांगितले आहे हे. ‘संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की, त्या गप्पा होतात.!’ ‘कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असते कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो.!’ अशी वाक्यं म्हणजे वपुंच्या लिखाणाचे सौदर्य आणि सामर्थ्य होते. ‘जाळायला काही नसले, तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते!’ ‘खर्च झाल्याच दु:ख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो!’ हे सहज प्रकट होणारे भाव त्यांच्या कथांमधून येत असत. तेव्हा समोरचे प्रेक्षकही त्या वाक्यांना रसिकतेने दाद देत असत. त्यांच्या कार्यक्रमांतील तीच निरागसता पाहणे हे एक अवर्णनिय होते.

वपु म्हणतात, ‘प्रॉब्लेम्स नसतात कुणाला? ते शेवटपर्यंत असतात!, पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतेच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो!’ हे तत्त्वज्ञान प्रत्येक अडचणीतील माणसाच्या पाठीवर थाप मारणारे आहे. त्याला धीर देणारे आहे.


‘आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की, एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसेच आहे.’ किती साधी सोपी उपमा दिली आहे इथे? सहज पटेल असे. ‘शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो!’ हे आपल्याला नित्याने दिसणारे दृष्य आहे. पण त्यासाठी नेमके शब्द वपुंकडे होते. आजच्या राजकारण्यांना लागू पडेल असे आणि सर्वसामान्यांनाही पचेल असे त्यांचे वाक्य म्हणजे, ‘माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचे खापर फोडायला काहीच मिळाले नाही तर? याची त्याला भीती वाटते!’

सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय, नोकरदार, कर्मचारी या लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे त्यांचे लेखन हे फार मोठे तत्त्वज्ञान आणि आनंद देणारे आहे.


- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: