गुरुवार, ३१ मार्च, २०२२

उद्वीग्नता चिंताजनक


आपल्यावर अन्याय होतो आहे, असे वाटून अनेकवेळा मोठमोठ्या व्यक्तींनाही कधीकधी उद्वीग्नता येते. आपल्या मनाविरोधात घडत आहे, आपल्या इच्छेविरोधात घडत आहे, आपण हा बदल नाकारू शकत नाही, यातून अनेकांना त्रास होतो. त्या उद्वीग्नतेतून काही वक्तव्ये होतात, ती अतिशय चिंताजनक असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी (२२ मार्च) दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींनी प्रतिक्रिया दिल्या. त्यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे मत किंवा प्रतिक्रिया मन सुन्न करणारी अशीच आहे.


आव्हाड म्हणाले, श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंधू असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे मोठे विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. वीस वर्षांपूर्वी अशीच उद्वीग्नता भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर आणि आशा भोसले या भगिनींनी व्यक्त केली होती. मुंबईत पेडर रोडवर होणाºया उड्डाण पुलाला त्यांचा विरोध होता. हा पूल बांधला, तर आपण भारत सोडून जाऊ, अशी भाषा त्यांनी केली होती. त्यावेळी या भगिनी खूप श्रेष्ठ असल्या, तरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात विलासराव देशमुख यांचे सरकार होते. मुंबई, महाराष्ट्र सोडून जाण्याची भाषा लता मंगेशकर, आशा भोसले यांनी केल्यामुळे त्यांच्यावर टीका करणाºयांमध्ये आज महाराष्ट्र सोडण्याची भाषा करणाºया पक्षाचे लोकही होते. पण आज तीच उद्वीग्नता जितेंद्र आव्हाड यांना आलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

खरंतर संपूर्ण देशात आमचा महाराष्ट्र सुरक्षित आणि सुखी हे आम्ही अभिमानाने सांगतो; पण याच महाराष्ट्रात आपलेच सरकार असताना आपल्याच कुटुंबीयांना, मुलाबाळांना ठेवणे जितेंद्र आव्हाड यांना असुरक्षित वाटते, हे अतिशय चिंताजनक म्हणावे लागेल; पण प्रश्न असा आहे की, महाराष्ट्रात नाही म्हणजे महाराष्ट्राबाहेर कुठे ठेवणार आपण?, कर्नाटक? तिथे भाजप सरकार. गुजरात? तिथे भाजप सरकार. गोवा? तिथेही भाजप सरकार. मध्य प्रदेश? तिथेही भाजप सरकार? महाराष्ट्राच्या सर्व बाजूंनी भाजपच्या सरकारांनी घेरलेले आहे. बाजूला उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली? नेमके कुठे जाणार? आपल्या मताने कारभार चालेल, असे आपले कुठेही सरकार महाराष्ट्राबाहेर नसताना तिथे सुरक्षित वाटते, पण महाराष्ट्रात आपलेच सरकार असताना, आपण मंत्री असताना इथे असुरक्षित वाटत असेल, तर सामान्य माणसांची काय अवस्था असेल याचे उत्तर शोधावे लागेल.


जितेंद्र आव्हाड अभ्यासू, उत्तम उत्स्फूर्त बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असे ते आहेत. कशालाही न घाबरता बोलणारे नेते आहेत ते. प्रसंगी आपल्याच सरकारच्या भूमिकेविरोधातही ठामपणे विरोध करण्याची ताकद त्यांच्यात आहे. असे असताना एवढ्या निर्भीड नेत्याला राज्यात सरकारमध्ये असताना राहायला भीती वाटते हे अतिशय गंभीर आहे. ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. राज्य सरकारने काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणाला तुरुंगात डांबलेले नाही. चौकशी सुरू असणे आणि घरात धाडी टाकणे यात फरक आहे. विरोधकांनी सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करायला हरकत नाही; पण ते अशा माध्यमातून करावे हे चुकीचे आहे. तपास यंत्रणेचा गैरवापर करून जर राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील, तर ते महाराष्ट्रातील जनता बघतेय. तुम्ही आम्हाला कितीही डिवचलंत, तरी आम्ही कोसळणार नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले. ही सगळी मते बरोबर आहेत, पण आता मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही या एका वक्तव्याने या बाकीच्या मतांवर बोळा फिरवला गेला. ही आलेली उद्वीग्नता अत्यंत चिंताजनक म्हणावी लागेल. शेवटी आपल्या मनाविरोधात काही गोष्टी घडल्या, तरी त्या स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो हे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याकडूनच समजले. त्यावेळी देश सोडण्याची भाषा केली, तरी त्यांनी तसे काही केले नाही. त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय जितेंद्र आव्हाडांच्याही हातात काही असणार नाही. मग या उद्वीग्नतेला काय अर्थ आहे?

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: