मंगळवार, २९ मार्च, २०२२

शेवटी सोनियाच


सीडब्ल्यूसी अर्थात काँग्रेस वर्किंग कमिटीची रविवारी बैठक झाली. पाच तासांच्या प्रदीर्घ चिंतनानंतर सध्या सोनिया गांधींकडेच अध्यक्षपद ठेवावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा गांधी कुटुंबीयांशिवाय काँग्रेसला वाली नाही हे बिंबवण्यात काँग्रेस यशस्वी झाली. रविवारच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी पुढे येऊन पक्षाचे नेतृत्व सक्षमपणे करावे, तसेच काही आवश्यक आणि व्यापक बदल करावेत, अशी विनंती त्यांच्याकडे काँग्रेसच्या कार्यसमितीने केली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर सगळ्यांना विश्वास आहे, अशी कबुली समितीने दिली. त्यामुळे आमच्यापैकी किंवा अन्य कोणीही सक्षम कार्यकर्ता जो काँग्रेस सांभाळू शकेल, असा नाही अशीच कबुली अप्रत्यक्षरित्या दिली. म्हणजे ख‍ºया अर्थाने आता काँग्रेस आजारली आहे, म्हातारी झाली आहे, थकली आहे हे दिसून येते. त्यामुळे आता घराणेशाहीला आळा घातला नाही, नवे नेतृत्व देता आले नाही, तर काँग्रेसला मतदार सतत नाकारत राहतील. या वर्षाच्या अखेरीस अजून काही राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यात गुजरात या महत्त्वाच्या राज्याचा समावेश आहे. मागच्या खेपेला गुजरातमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे राहुल गांधी तयार झाले असे काँग्रेसला वाटत होते. पण नंतर हे यश कुठेच टिकवता आले नाही. अशा परिस्थितीत सोनिया गांधी आजारी आणि वय या दोन्ही अडचणींनी कशा वेळ देणार आहेत?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसमधील मोठे नेते उपस्थित होते. तब्बल पाच तासांनंतर ही बैठक संपली.


या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले, पाच राज्यांमधील निवडणुकीचा पराभव पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. जोवर काँग्रेसची संस्थात्मक निवडणूक होत नाही तोवर सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे यावर पक्षातल्या नेत्यांचे एकमत आहे, असेही सुरजेवालांनी सांगितले. आता दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे बैठक घेऊन जून २०२१ मध्ये या निवडणुका होतील म्हणून जाहीर केले होते. त्या झाल्या नाहीत, अध्यक्षपदाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षाविना पोरकी आणि पोरकट झाली. कोणता निर्णयच नाही. अशा निर्णयहीन, नेतृत्वहीन काँग्रेसला कोण जवळ करणार? ज्यांना पक्षाचा अंतर्गत निर्णय घेता येत नाही, तीन वर्षे झाली तरी अध्यक्ष निवडता येत नाही ते देशाचे निर्णय कसे काय घेणार? त्यामुळे पुन्हा सोनिया गांधींकडे नेतृत्व असल्याचे जाहीर केले असले, तरी बदल काय झाला? आताही हंगामी का होईना नेतृत्व त्यांच्याकडेच आहे. मग वेगळे काय घडले? त्यामुळे या चिंतन बैठकीतून कसलाही तोडगा निघाला नाही, काहीही निष्पन्न झाले नाही हेच यातून दिसते. काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे सदस्य बैठकीत स्पष्ट बोलू शकत नाहीत, हे यातून दिसून येते. त्यामुळे काँग्रेस पार्टी ही गांधी, नेहरू आणि कंपनी लिमिटेड अशी कंपनी आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

सारवासारव करताना, काँग्रेस पक्ष एक व्यापक चिंतन शिबीर बोलावेल. जिथे भविष्यातील वाटचालीविषयी सविस्तर चर्चा केली जाईल, असेही सुरजेवाला यांनी पुढे सांगितले. पण ते काही खरे नाही. एकीकडे सुरजेवाला यांनी अशी भूमिका घेतली असताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. गांधी कुटुंब काँग्रेसच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद सांभाळायला हवे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हायला हवे. गांधी कुटुंब काँग्रेसच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला पराभूत व्हावे लागले, असेही गहलोत म्हणाले. पण कलहाचे नेमके कारण काय हे कोणी बोलत नाही. गांधी कुटुंबाचे नेतृत्व हेच कलहाचे कारण आहे. म्हणून तर जी २३ हा गट तयार झाला. त्यांनी आपल्या पत्रातून भावना पोहोचवल्या. हे सगळे निष्ठावंत असतानाही त्यांना पक्षाने, गांधी कुटुंबीयांनी अपमानीत केले. अशा परिस्थितीत कोण बोलणार? कसलाही निर्णय न झाल्याने एकमेकांवर राग काढणे, उणीदुणी काढणे, गप्प बसणे असले प्रकार झाले. याचा विचार कोणी करत नाही आणि पुन्हा सोनिया गांधींशिवाय कोणी वाली नाही यावर शिक्कामोर्तब केले जाते. जरा प्रयत्न करायला काय हरकत आहे. गांधी कुटुंबाला अपयश येत आहे. असेही अपयश येत असेल, तर सामान्य कुटुंबातील नेतृत्वाला संधी देण्यास काय हरकत आहे? शेवटी तो अध्यक्षही प्यादंच असणार असतो. आतून गांधी कुटुंबच काँग्रेसचे निर्णय घेणार आहेत. मग कुंकवाचा धनी म्हणून एखादे नवे नाव देण्यास काय हरकत होती? पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधींना नाकारल्यानंतर २००४ ला मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. लोकांनी त्यांना स्वीकारले. भले मनमोहन सिंगांच्या नावाने सोनिया गांधीच सरकार चालवत होत्या. त्यांना कसलेही निर्णय घेता येत नव्हते तरी ते पंतप्रधान होते. एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, तर त्यात घुसून राहुल गांधींनी कागद फाडले होते. त्यामुळे पंतप्रधान जरी मनमोहन सिंग होते तरी मनमानी गांधी कुटुंबाचीच चालली होती. मग त्याचप्रमाणे कोणी तरी अध्यक्ष म्हणून नवा चेहरा निवडायला काय हरकत आहे? पण सोनिया गांधींच्याच नावावर शिक्कामोर्तब करून काँग्रेसने आपल्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत असेच म्हणावे लागेल.


14 /3/2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: