पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नवी आझाद यांनी कोणी तरी आपल्या कामाची दखल घेतली अशा भावना मनापासून व्यक्त केल्या. काँग्रेसचे गुलाम म्हणून ओळख असलेल्या, अत्यंत निष्ठावंत असलेल्या, इंदिरा गांधींपासून कार्यरत असणारा हा नेता गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून उपेक्षित आणि दुर्लक्षित असाच होता. पण नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्कारात गुलाम नवी आझाद यांना पद्मभूषण जाहीर झाला होता. त्यामुळे त्यांना अक्षरश: गहिवरून आले. इतके वर्ष गुलाम म्हणून राहिलो, पण कोणी दखल घेतली नाही. पण ज्यांचा कायम तिरस्कार करत आलो, त्यांनी मात्र दखल घेतली. त्यामुळे त्यांची अवस्था अक्षरश: गुलाम नवी आझाद नाही, तर गुलाम नाही आता आझाद अशी झालेली दिसते.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे ही चर्चा काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात देखील सुरू झाली असून, बंडखोर जी-२३ गटाने पुन्हा एकदा पक्षनेतृत्व आणि पक्षातील बदलांविषयी उघड नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गटाचे सदस्य गुलाम नबी आझाद यांची भेट घेऊन गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचे सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
पद्मभूषण मिळाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपल्या कामाची कुणी तरी दखल घेतेय, हे पाहून आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे, पण यातून आझाद यांचा रोख थेट काँग्रेसवर असल्याचे बोलले जात आहे. कुणी तरी माझ्या कामाची दखल घेतली हे पाहून आनंद झाला. जेव्हा देश किंवा सरकार एखाद्याच्या कामाची दखल घेते, तेव्हा चांगले वाटते, असे आझाद म्हणाले आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या कार्याची आजपर्यंत दखल घेतलेली नव्हती हे स्पष्ट आहे. पण याचा अर्थ एक आहे की, सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते गुणवत्तेपेक्षा कोण आपला, कोण परका हा विचार करून हे पुरस्कार वाटत सुटते. त्यामुळे यातून स्पष्ट झालेले आहे की, २०१४ पर्यंत जे काँग्रेसचे कौतुक करत होते, त्यांना असे पुरस्कार दिले गेले आणि आता गेल्या आठ वर्षांत हे भाजप धार्जिण्यांना वाटले जात असावेत.
अशा परिस्थितीत गुलाम नवी आझाद यांना काँग्रेसच्याच काळात हा पुरस्कार मिळाला नाही याची खंत आहे. त्यामुळे त्यांनी सध्याच्या सरकारला थोडे कौतुकाबाबत झुकते माप दिले आहे. आझाद म्हणतात की, माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण या काळातदेखील मी कायमच लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. मग ते सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा मग अगदी जम्मू-काश्मीरचा माजी मुख्यमंत्री म्हणून असो, असे देखील आझाद म्हणाले. पण हे सगळे पाहाता केंद्र सरकारकडून आणि देशाच्या जनतेकडून मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे, असे त्यांनी नमूद केले. आझाद यांच्या भावना काँग्रेसपर्यंत पोहोचल्या असतीलच. पण त्याहीपेक्षा आझाद यांच्या गुणवत्तेपेक्षा काँग्रेसला डिवचण्यासाठी या सरकारने हा पुरस्कार त्यांना दिला आहे का?
यंदाच्या वर्षी एकूण ५ पद्मभूषण, १७ पद्मविभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कर प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये गुलाम नबी आझाद आणि माकपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य या दोन विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश होता, पण आझाद यांच्या प्रतिक्रियेनंतर राहुल गांधींच्या मर्जीतले काँग्रेस नेते यांनी संधी साधली आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यावरून देखील राजकारण रंगले असून, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आझाद यांना त्यावरून टोला लगावला आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांना आझाद व्हायचे होते, गुलाम नाही, असा टोला रमेश यांनी लगावला आहे. याचा अर्थ आता ते काँग्रेसमधून आझाद होणार का असा प्रश्न आहे.
पण याचा अर्थ दरवर्षी असे शंभर-सव्वाशे लोकांना पुरस्कार जाहीर होत असतील, तर त्यातील जेमतेम वीस-पंचवीस पुरस्कार खºया कार्यकर्त्यांना द्यायचे आणि उरलेले शंभर पुरस्कार कोण आपला, कोण परका हा भेद करत द्यायचे. त्या पुरस्कारांचा वापर पक्षसंघटना मजूबत करण्यासाठी करायचा, असे दिसते. अशा प्रकारे राजकीय नेत्यांना पद्म पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यापेक्षा त्यांच्या मरणोत्तर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे यापेक्षा त्याला फारसे महत्त्व राहणार नाही. पक्ष वाढीसाठी, मतांचा गठ्ठा वाढवण्यासाठी किंवा विरोधकांना कमकुवत करण्यासाठी या पुरस्करांचा होणारा वापर हा चिंताजनक आहे. किंबहुना तसे होत असेल, तर त्या पुरस्कारांचे महत्त्व कमी होत आहे, असे म्हणावे लागेल. म्हणजे सरकारला बरे वाटावे म्हणून खूश करणारी वक्तव्ये केली की काही सेलिब्रेटींना अशा प्रकारे पुरस्कार दिले जातात. विरोधकांचे उपद्रव मूल्य जास्त असेल, तर त्यांना असे पुरस्कार देऊन गप्प बसवले जाते. असे काही गणित त्यात मांडले जात असावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा