मंगळवार, १५ मार्च, २०२२

संधी निर्माण करा


रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे संपूर्ण देशाला समजले की, युक्रेनमध्ये २० हजार भारतीय लोक आहेत. हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी तिथे गेले आहेत. अगदी महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यांतून हे विद्यार्थी युक्रेनमध्ये गेलेले दिसून आले, पण हे तिकडे का गेले याचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे इथे संधी मिळत नसल्यामुळे ते तिकडे गेले. साहजिकच आता आपल्याकडे जास्तीत जास्त संधी निर्माण करणे हे आव्हान सरकारने पेलले पाहिजे.


युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या युद्धामुळे लक्षात आली. अजून असे कितीतरी देश असतील तिथे शिकण्यासाठी आपली मुले जात असतील. परदेशात जाऊन शिक्षण घेणे हे काही खायचे काम नाही. त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असणार हे नक्की. म्हणजे हे काम काही सामान्य गोरगरीब माणसांचे नाहीच. त्यामुळे असे लाखो रुपये खर्च करून युक्रेन आणि अन्य देशात शिकायला जाणारे श्रीमंत घरातील, बडे बाप के बेटेच असणार यात शंकाच नाही. पण तिकडून शिकून आल्यावर हे डॉक्टर करणार काय? तर भारतीयांवर भरपूर पैसे घेऊन उपचार करणार आणि आपला झालेला शिक्षणाचा खर्च दामदुप्पटीने वसूल करणार, यात शंकाच नाही. त्यामुळे आपल्याकडे स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. अन्यथा उपचाराच्या नावाखाली वसुलीचे प्रकार भविष्यात वाढतील. आज नाहीत असे नाही. सहज जरी तब्येत दाखवायला गेला कोणीतरी वेगवेगळ्या टेस्ट करायला लावून त्याचे नॉर्मल रिपोर्ट आले सांगितले जाते. कारण नसताना अनावश्यक टेस्ट करण्याचे एखादे रॅकेट कार्यरत असल्यासारखे प्रकार आपण नेहमी पाहतो. त्यात आणखी वाढ होण्याची भीती आहे.

आपल्याकडे अशा शिक्षणासाठी सीईटी, नीट अशा परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर त्यांचे कुठे ना कुठेतरी प्रवेश निश्चित होतात. या परीक्षांमध्ये ज्यांचा नंबर लागत नाही, जे नापास होतात ते पैसे खर्च करून अशाप्रकारे परदेशात जातात. तिथे शिक्षणाचा खर्च करणे सोपे नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पैसेवाल्यांचीच शिक्षणात मक्तेदारी निर्माण झाल्याचे दिसून येते. हे अनेक दशकानुदशके चाललेले आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे.


राजीव गांधी पंतप्रधान असताना कॅपिटेशन फी हा मुद्दा प्रचंड गाजला होता. त्यावरून विद्यार्थी आंदोलनेही झाली होती. वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली कॅपिटेशन फी या गोंडस नावाने पैसे उकळायचा धंदा सुरू झाला होता. त्याला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. पण एकूणच हे वैद्यकीय शिक्षण महाग करण्याचे काम आपल्याकडे झाले हे नक्की. सर्वसामान्य माणूस आपल्या मुलांना हे शिक्षण देणे शक्य नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. खासगी वैद्यकीय कॉलेज आणि अभिमत विद्यापीठे ही राजकारण्याची मक्तेदारी झाली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डोनेशन गोळा करून शिक्षण दिले जाते. तरीही आपल्याकडे शिक्षणाच्या संधी कमी होताना दिसतात. त्यामुळे अनेक जण परदेशात जाण्याचे मार्ग पत्करतात. युक्रेन-रशिया युद्धानंतर या संधी आपल्याकडे कमी असल्याने विद्यार्थी तिकडे जातात हे लक्षात आले. त्यानंतर उद्योजक आनंद महिंद्रा यांनी लगेचच आपण असे कॉलेज काढणार असल्याचे जाहीर केले.

आनंद महिंद्रा हे व्यावसायिक उद्योजक आहेत. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा नक्कीच स्वागतार्ह आहे. पण एक उद्योजक याकडे उद्योग म्हणून पाहणार हे लक्षात घेतले पाहिजे. शिक्षणसंस्था ही नफा-तोटा या तत्त्वावर चालवली जात नसते. पण यात उद्योजक उतरले तर ते अशक्य नाही. त्यामुळे सरकारी पातळीवर स्वस्तात शिक्षण देणाºया संस्था निर्माण करणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या राजवटीत बहुतेक नेतेमंडळींनी शिक्षण संस्था काढल्या. अनेक इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारली. पण नंतर त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. इंजिनिअरिंग कॉलेजला विद्यार्थी मिळत नाहीत म्हणून अनेक कॉलेजची मान्यता रद्द करावी लागली. अशा कॉलेजकडे मुले का वळत नाहीत? त्यांना का विद्यार्थी मिळत नाहीत? तर त्याच्या असलेल्या फी परवडत नाहीत हा खरा मुद्दा आहे. त्यामुळेच सरकारकडे सोय नसल्याने त्यांनी खासगी कॉलेजमध्ये सरकारी कोटा निर्माण केला पाहिजे. त्याचे अनुदान अशा संस्थांना दिले आणि काही विद्यार्थी अशा महाविद्यालयांत पाठवले तरी अशी महाविद्यालये पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये सरकारी कोटा तयार केला, तर आपल्याकडे शिक्षणाच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी सरकारने अनुदानाची तरतूद करायला हवी.


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युक्रेन-रशिया युद्धामुळे अनेक विद्यार्थी परत आले आहेत. त्यांचे भवितव्य काय असणार आहे? युद्धाच्या परिस्थितीतून युक्रेनला सावरायला किती दिवस लागतील हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणारच आहे. त्यांना हे शिक्षण भारतात पूर्ण करण्यासाठी काही संधी निर्माण करता येते का हे पाहिले पाहिजे. पण शिक्षण वैद्यकीय, अभियांत्रिकी असे कोणतेही असो त्यासाठी संधी निर्माण करणे गरजेचे आहे. सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षणासाठी परदेशात जाणारे हे लोंढे थांबवले, तर आपल्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाला खरा अर्थ असेल. जे विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून परदेशात शिकायला जातात तोच पैसा भारतात शिक्षणावर खर्च करणे त्यांना शक्य असते. पण त्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही, त्यामुळे हा पैसा बाहेर जातो. त्यासाठीही आपल्याला संधी निर्माण करणे गरजेचे आहे.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: