भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले जे क्रांतिकारक होते, त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची नावे नेहमी घेतली जातात. आज त्यांचा बलिदान दिन. २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरवलेला असताना ही फाशी कोणी रद्द करू नये म्हणून एक दिवस अगोदरच त्यांना फासावर लटकवले गेले तो हा दिवस. शहीद भगतसिंग हे महान क्रांतिकारक होते, पण त्यांचा आदर्श किंवा फोटो जेव्हा डाव्या पक्षांबरोबरच जेएनयूमध्ये अफझल गुरूचे गुणगान करणारे लोक लावतात, नक्षलवादी त्यांना आपला देव मानतात, माओवादी त्यांना आपला देव मानतात, तेव्हा कोणालाही वेदना होतील. भगतसिंगांनी आपल्या देशाच्या लोकांसाठी ब्रिटिशांविरोधात बंड केले होते. पण जे आपल्याच देशात राहून वैरभाव निर्माण करतात, रक्तपात घडवतात अशा लोकांनी आपण भगतसिंगांचे अनुयायी आहोत असे म्हणणे हा त्यांचा अपमान आहे. त्यामुळे थोडक्यात भगतसिंगांचे नेमके विचार काय होते हे समजून घेतले पाहिजे.
आम आदमी पक्षाने पंजाबातील सत्ता हस्तगत केल्यानंतर भगतसिंगांचे स्मरण ठेवले हे चांगले झाले. त्यांच्या गावातच मुख्यमंत्र्यांनी शपथविधी केला हे अधिक चांगले झाले. त्यामुळे लोकशाही आणि समानता मानणाºया एका क्रांतिकारकाचा खºया अर्थाने गौरव झालेला आहे.
भगतसिंगांनी बालपण हे आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले होते. शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना ‘आत्मप्रौढी व घमेंड’ यांची बाधा झाली आहे, असेही उठवले गेले होते, मात्र आॅक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले मी निरीश्वरवादी का? हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
भगतसिंगांचे विचार होते की, समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे, म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये. या विचारांमुळेच काँग्रेसला ते कधी जवळचे वाटले नाहीत. कारण काँग्रेस ही व्यक्तिपूजक पार्टी होती आणि आजही आहे.
पण भगतसिंग म्हणत, समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही मत होते.
अत्यंत प्रतिकूल व कष्ट साध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे, त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही, परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर, परंतु अर्थपूर्ण असते, असा त्यांचा सिद्धांत होता.
जगात जर सर्वांत भयानक पाप असेल, तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल, तर तो दास्य हाच आहे आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे, असे त्यांनी म्हटले होते.
हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की, त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या, तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: भगतसिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, दुसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हैं.
- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स
9152448055\\