रविवार, ८ डिसेंबर, २०१९

बॉलिवूडचे बलात्कार


हैदराबाद येथील एन्काऊंटर प्रकरणानंतर बलात्कार हा विषय चर्चेत आला. त्यामुळे आपला सर्वंचा आवडीचा विषय असलेला भाग म्हणजे चित्रपट. या चित्रपटातील बॉलिवूडचे बलात्कार समोर आले. हिंदी चित्रपटात बलात्कार हा एक अविभाज्य भाग बनलेला असतो, म्हणजे प्रेमाचा त्रिकोण असेल किंवा कोणतीही सामान्य स्टोरी असेल, तरी त्यात बलात्काराचा प्रयत्न करणारा खलपुरुष आणि त्या पीडितेला वाचवणारा हीरो आणि त्यानंतर जमणारे प्रेम हे सर्व अटळ दिसते, म्हणूनच बलात्काराभोवती फिरणाºया बॉलिवूडची कामगिरी समजून घेणे हेही मनोरंजनाचे आहे. अर्थात, बलात्कारातून मनोरंजन ही एक प्रकारे विकृतीच म्हणावी लागेल, पण बहुतेक नामवंत अभिनेत्रींवर पडद्यावर बलात्कार झालेला आहे. काहींना नायकांनी वाचवले आहे, तर कधी कधी त्यांचा त्यात बळी गेलेला आहे. अशाच काही बलात्कारांवरून आता नजर टाकूया.काही चित्रपटांची कथानके ही बलात्कार या विषयाभोवती फिरलेली आहेत. यातील १९८०च्या दशकातील बी. आर. चोप्रा यांचा चित्रपट म्हणजे इन्साफ का तराजू. यातील बलात्कारी आहे, तो राज बब्बर. हा अभिनेता काही काळ समाजवादी पक्षात होता. आता तो काँग्रेसमध्ये आहे. या चित्रपटात झीनत अमानवर तो बलात्कार करतो आणि वकिली डावपेचांमुळे निर्दोष सुटतो. त्यामुळे त्याची बलात्काराची पॉवर वाढते. काही वर्षांनी झीनत अमानची धाकटी बहीण असलेल्या पद्मिनी कोल्हापुरेवर तो बलात्कार करतो. आताही आपल्या बहिणीला न्याय मिळणार नाही म्हणून झीनत उठते आणि राज बब्बरचा खून करते. बलात्कार पीडितांना कसे कोर्टात नागवले जाते आणि त्यांना सहानुभूती न मिळता त्यांची अधिक बेइज्जती केली जाते, हे दाखवणारा हा चित्रपट होता. या चित्रपटाची दखल घेऊन सरकारने खरं तर तेव्हाच महिलांना बळ देणारे कायदे करण्याची गरज होती. तसे झाले असते, तर हैदराबादेत असे एन्काऊंटर करण्याची वेळ आली नसती, पण बॉलिवूडमधील झीनत आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावरचे राज बब्बरने केलेले इन्साफ का तराजूमधले बलात्कार गाजले होते.दिल्ली हे तर बलात्काराचे शहर असेच म्हणावे लागेल. महिलांच्या बाबतीत देशाची राजधानी सुरक्षित नाही हे गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून दिसून आले आहे. निर्भया प्रकरण सात वर्षांपूर्वीचे, पण १९७० च्या दशकातही दिल्लीत असेच प्रकार घडत होते. तशा आशयाचे कथानक असलेला चित्रपट म्हणजे ‘घर.’ विनोद मेहरा आणि रेखा हे नवविवाहित दाम्पत्य असते. दिल्लीत रात्रीच्या सिनेमाला जातात. सिनेमा सुटल्यावर टॅक्सी मिळत नाही, म्हणून दोघे चालत येत असतात, तर चार गुंड दोघांना अडवतात. विनोद मेहराला मारहाण करून जखमी करतात आणि रेखावर सामूहिक बलात्कार करतात. १९७८ साली आलेल्या एन. एन. सिप्पीच्या या चित्रपटात दिल्लीत सामूहिक बलात्कार होत असल्याचे दाखवले होते. बॉलिवूडने उठवलेल्या या प्रश्नावर सरकारने काहीच केले नाही, म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना आणि नंतरही देशात महिला पंतप्रधान असताना, दिल्लीत त्यांचे वर्चस्व असताना महिला सुरक्षित नव्हत्या, हे कसले भयावह चित्र आहे.१९९३ साली आलेला दामिनी हा चित्रपट पीडितांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाºयांची काय अवस्था होते, हे दाखवणारा. मीनाक्षी शेषाद्री ही ऋषी कपूर या श्रीमंत घरातील मुलाची पत्नी. हवेलीत तिचा दीर मोलकरणीची छेडछाड करतो, तो आणि त्याचे तीन मित्र तिच्यावर सामूहिक बलात्कार करतात. त्या मोलकरणीला न्याय देण्यासाठी आपल्या कुटुंबीयांविरोधात पोलिसात न्याय मागण्यासाठी जाणारी आणि कोर्टात साक्षीला उभी राहणारी दामिनी म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. तिला किती संकटांना सामोरे जावे लागते हे यातून भीषणपणे दाखवले आहे, पण एकूणच बलात्काराविरोधात न्याय मागणे सोपे नाही, हेच दाखवण्याचे काम वारंवार बॉलिवूडने केलेले आहे.बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतून मातब्बर अभिनेत्रींना रुपेरी पडद्यावर अशी शिकार होणे भाग पडले आहे. बरसात की एक रात या चित्रपटात आंधळ्या असलेल्या राखीवर अमजद खान बलात्कार करतो. पावसाची ती रात्र आधीच आंधळी असलेल्या अबलेला उद्ध्वस्त करते. चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन आहे. तो त्यानंतर फिल्मीस्टाइल सूड घेतो आणि या बलात्कारीत राखीशी लग्न करतो, पण इथे न्याय करण्यासाठी कोणी कोर्टात जात नाही, तर आपला आपण न्याय केला जातो. बलात्काराच्या बाबतीत आपणच न्याय करायचा असतो, हे अनेक वेळा बॉलिवूडने दाखवून दिले आहे.अमिताभ बच्चनचाच आणखी एक चित्रपट जो १९९० च्या दशकात आला होता, तो म्हणजे आखरी रास्ता. एक अडाणी कामगार शिकलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो म्हणजे अमिताभ आणि जयाप्रदा. त्या जयाप्रदावर सदाशिव अमरापूरकरची नजर पडते. तो अमिताभला कामानिमित्त बाहेर पाठवून जयाप्रदावर बलात्कार करतो. त्यामुळे ती आत्महत्या करते, पण मरताना यांचा सूड घे अशी चिठ्ठी लिहून जाते. त्या चिठ्ठीवरून अमिताभ बच्चन या बलात्काराला प्रोत्साहन देणाºया सर्वांचा सूड कसा उगवतो, हे या चित्रपटात दाखवले आहे, पण बलात्कार हा विषय बॉलिवूडमध्ये अपरिहार्य आहे, हे नक्की.१९७० च्या दशकातच आलेल्या रोटी कपडा और मकान या मनोज कुमारच्या चित्रपटात मौसमी चटर्जीवर रेशन दुकानदार बलात्कार करतो. पिठाच्या गोणीतील तो बलात्काराचा प्रसंग सगळ्यांच्या अंगावर काटा उभा करणारा असा आहे. गरिबी आणि पोटासाठी सामान्य माणसांना कसे लाचार केले जाते, ते न्याय मागायला कुठे जाणार नाहीत म्हणून हे लोक कसे त्यांच्या अब्रूला हात घालतात, हे यातून वास्तवपणे दाखवून दिले आहे.काही निर्मात्यांचे डोके तर अजबच चालते. खून का बदला खून हे ठीक आहे, पण बलात्काराचा बदला बलात्कारातून होतो हे अतर्क्य चित्रणही करणारे निर्माते आहेत. राजकुमार कोहलीसारख्या नेहमीच मल्टीस्टारकास्ट चित्रपट देणाºया निर्मात्याने हा चमत्कार करून दाखवला आहे. इन्सानियत के दुष्मन या चित्रपटात शक्ती कपूर अनिता राजवर बलात्कार करतो. याचा बदला म्हणून राज बब्बर डिंपलवर बलात्कार करतो. या चित्रपटातले संवादही इतके भयानक होते. फोटो काढायला म्हणून शक्ती कपूर अनिता राजला स्टुडीओत आणतो. तिला पोझिशन घ्यायला लावतो आणि हातांना कड्या बांधतो. त्याचा वाईट हेतू समजल्यावर ती म्हणते, ‘भगवान के लिये मुझे छोड दो’ तेव्हा शक्ती कपूर म्हणतो, ‘भगवान के लिये तुझे छोड दू? और क्या खाऊ? परसाद?’ या शक्ती कपूरच्या डायलॉगनंतर प्रचंड हशा आणि टाळ्या चित्रपटगृहात यायच्या. त्यावेळी डोक्यात तिडीक जायची, म्हणजे याला हसून आणि टाळ्या वाजवून दाद देणारेही कोणत्या मानसिकतेचे आहेत?बॉलिवूडमध्ये ज्या चित्रपटातून रजनीकांतची एंट्री झाली, तो म्हणजे अंधा कानून. लहानपणी डोळ्यासमोर बलात्कार करणाºया प्राण, डॅनी आणि प्रेम चोप्रा यांचा बदला घेण्यासाठी मोठा झाल्यावर रजनीकांत जी शक्कल लढवतो, त्याचा मसालेदार चित्रपट. मुख्य नायक रजनीकांत, तर विशेष भूमिकेत अमिताभ बच्चन. हेमा मालिनी, रिना रॉय अशी दणदणीत स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात आपला न्याय आपणच करायचा असतो. कारण कानून अंधा आहे. न्याय मिळत नाही, तर मिळवावा लागतो. त्यामुळेच हैदराबादच्या एन्काऊंटरचे समर्थन करण्याची प्रवृत्ती अशा चित्रपटांतून सहजपणे होते. ते आरोपी वर्षानुवर्षे तुरुंगात जगत राहिले असते, पण पीडितेचे कुटुंबीय मात्र कोर्टाचे खेटे घालत बसले असते. अशा वातावरणात त्यांचा खात्मा करणे गरजेचे आहे, हा विचार अंधा कानूनसारख्या चित्रपटांतून स्पष्ट होतो.याशिवाय बलात्काराचा प्रयत्न होणे हे असंख्य चित्रपटांतून दाखवून दिले आहे. यामध्ये बलात्कार करण्याचा असफल प्रयत्न करण्यात हिंदी चित्रपटात मोहनीश बहल, रमेश देव असे अनेक जण अपयशी झालेले आहेत. अमिताभ बच्चनच्या कसौटी चित्रपटात हेमा मालिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न रमेश देव करतो, त्यावेळी अमिताभ बच्चन येऊन वाचवतो. मोहनीश बहल मैंने प्यार किया चित्रपटात भाग्यश्रीवर बलात्काराचा प्रयत्न करतो, तेव्हा सलमान खान वाचवतो. अशा प्रकारे गोविंदा, जितेंद्र, अनिल कपूर, चंकी पांडे, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी आपापल्या नायिकांवर बलात्कार होण्यापूर्वीच दरवाजा, खिडकी फोडून घुसून नायिकांना वाचवण्याचे प्रयत्न केले आहेत, पण बलात्काराची दृश्ये आपल्या चित्रपटात असणे हे बॉलिवूडचे खास आकर्षण आहे. बहुतेक नायिकांनी पडद्यावर आपल्यावर बलात्कार करून घेतले आहेत किंवा त्यातून त्या वाचल्या आहेत, पण बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर अशा कठीण प्रसंगाला नायिकांना सामोरे जावे लागले आहे, हे नक्की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: