मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

बदलत्या जीवनशैलीचा कितपत परिणाम


स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक आहे. मोकळेपणा वेगळा आणि अघळपघळपणा वेगळा. कालानुरूप आपली जीवनशैली बदलणे स्वाभाविक असले तरी किती त्याच्या आहारी जायचे याचाही विचार केला पाहिजे. वाढते बलात्काराचे प्रकार ही चिंतेची बाब असली, तरी त्यातील किती बलात्कार हे खरे आहेत हे पण तपासावे लागेल. एखादी मुलगी रस्त्याने चालली आहे आणि गुंडांचा घोळका आला आणि तिची छेड काढली, तिच्यावर बलात्कार केला असे खरोखरच घडते का? आजवरच्या असंख्य घटना पाहिल्या तर लक्षात येईल की बलात्कार करणारे त्या तरुणीला कुठेतरी ओळखत होते, नात्यातलेच होते, मित्रपरिवारातील होते. त्यामुळे आपला मोकळेपणा, आपले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य आहे की आपल्या स्वैराचारामुळे आपण अशा प्रसंगांना बळी पडत आहोत हेही पहावे लागेल. निर्भयासारखी किंवा उन्नावसारखी घटना एखादी घडते, पण बलात्काराचे प्रकार सातत्याने होताना दिसत आहेत. अगदी बालिकांवरही बलात्कार होतात. हे बलात्कार करणारे कोण असतात? कुणाच्या तरी विश्वासावर त्या बालिका सोपवलेल्या असतात, त्यांचाच गैरफायदा घेतला जातो ना? लहान बालिकांवर होणारे बलात्कार हे तर ओळखीच्या लोकांकडूनच होत असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच कोणाला किती जवळ करायचे, किती विश्वास ठेवायचा याबाबत पालकांनीच विचार केला पाहिजे.एखादी मुलगी किंवा मुलगा वेळेत घरी येतो की नाही हे पाहण्याची सवय आई-वडिलांनी लावली पाहिजे. आपला मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करतात, कोणाशी बोलतात, काय करतात हे कुटुंबीयांनी जाणून घेतले पाहिजे. कोणत्याही मुलांना किंवा मुलींना चोरून भेटण्याचे प्रकार होत आहेत का? एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांना भेटले, बोलले तर त्यात लगेच गैर आहे असे समजण्याचे कारण नाही. अशा गैर समजण्यामुळेच चोरून बोलणे, भेटण्याचे प्रकार होतात. लिंगभेदाची बिजे मनावर बिंबवली जातात. म्हणूनच घरगुती संवाद असणे गरजेचे आहे. आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत आणि ती काय करत आहेत हे आई-वडिलांनी जाणून घेतलेच पाहिजे. केवळ मुलींनाच नाही तर मुलांनीही घरात वेळेतच आले पाहिजे याकडे कटाक्ष असेल तर अशा प्रकारांना आळा बसेल. मुलगा आहे म्हणून त्याला मोकाट सोडला आणि मुलगी आहे म्हणून घरात बांधून ठेवली ही टोकाची भूमिका आहे. मोकाट सुटलेला मुलगा वळूप्रमाणे वावरेल आणि एखादी भानगड किंवा गुन्हा करून बसेल. बांधून ठेवलेली मुलगी बंधने तोडण्यासाठी म्हणून काही वेगळा निर्णय घेईल. म्हणून मुलगा-मुलगी दोघांनाही सारखेच स्वातंत्र्य आणि समान बंधने असली पाहिजेत.आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट हा जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे. तुमची खरेदी, बँकिंग, सगळे व्यवहार आज एका फोनमध्ये होतात. तुमच्या मीटिंगही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप, कॉन्फरन्सवर करू शकता, पण फक्त यासाठीच फोनचा वापर केला जातो का? ते जसे उपयोगी साधन आहे तसेच ते उपद्रवीही आहे. काही घाणेरडे ग्रुपही असतात. काही स्वैराचाराची डेटिंगची अ‍ॅपही आज आहेत. ही अ‍ॅप आपोआप आपल्याकडे डाऊनलोड होतात आणि अनेकजण त्याच्या चक्रात अडकतात. त्यामुळे आपली वयात आलेली मुले कोणती अ‍ॅप वापरतात आणि फोनवर नेमके काय करत असतात हे पाहण्याचीही गरज आहे. कुठे पाय घसरण्यापूर्वी सावरले पाहिजे. त्यांना धोक्याची सूचना दिली गेली पाहिजे. ती फक्त मुलींना नाही तर मुलांनाही दिली गेली पाहिजे. ही बंधने घातली तर बरेचसे बलात्काराचे प्रमाण कमी होईल.भारतात डिजिटलायझेशनचा वेग २०१४ पासून इतक्या प्रचंड गतीने वाढला आहे की, या वेगाच्या आवेगात समाज स्वास्थ्याची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. देशभरात घडणाºया गुन्हेगारीवर नजर टाकली असता सहज लक्षात येते की, गुन्हेगारांचे वय कमी होते आहे, तर गुन्ह्याची तीव्रता, क्रूरता आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर तपास यंत्रणेच्या आवाक्याबाहेरचा होत चालला आहे. यातच आता सायबर क्राइमची मोठ्या संख्येने भर पडली आहे. हैदराबाद प्रकरणातही हेच सत्य समोर आले आहे. बलात्काराच्या काही तासांनंतरच या चार आरोपींनी ही मोबाइल क्लिप भारतात आणि भारताबाहेरून प्रसारित होणाºया पॉर्न साइटवर व्हायरल केल्याचे वास्तव समोर आले आहे. म्हणजेच फक्त भोग घेणे वा जीव घेणे इथपर्यंतच यांचे कृत्य मर्यादित नव्हते, जर जगलो, वाचलो तर आपण केलेल्या याच विकृतीच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा घाटही त्यांनी घातला होता, मात्र आता हैदराबाद पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे काळसत्र थांबले आहे, पण पॉर्न साइट पाहणे किंवा तत्सम अनेक अ‍ॅपवर अशा काही क्लिप लोड करून त्या व्हायरल करणे आणि त्या माध्यमातून पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याची जी नशा या लाइफस्टाइलमध्ये आहे ती कुठेतरी रोखली पाहिजे. म्हणूनच काही अ‍ॅपवर सरकारने बंदी आणली पाहिजे, तर आपल्या मुलांकडे असलेल्या फोनवरील अ‍ॅप अधूनमधून त्यांना विश्वासात घेऊन आईवडिलांनी जाणून घेतली पाहिजे. ही अ‍ॅप का डाऊनलोड केली, त्याचा फायदा काय, असे मोकळेपणाने संवाद साधून पालकांनी विचारले पाहिजे. सध्या सर्वाधिक डेटिंगची अ‍ॅप डाऊनलोड होतात. यात असंख्य अनोळखी लोक जोडले जातात. त्यातून फसवणुकीचे प्रकार घडतात. म्हणून जीवनशैलीचा हा परिणाम असला तरीही आपण कुठेतरी सावध राहण्याची गरज आहे.२०१४ पासून आजतागायत अनेक मोबाइल कंपन्यांनी आपल्यातील स्पर्धेचा एक भाग म्हणून ट्रायच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वर्षभर इंटरनेट डेटा फ्री, कॉलिंग फ्री, दिवसाला १०० ते ५०० संदेश फ्री अशा अनेक आॅफर्स लागू केल्या. अनलिमिटेड डेटा आणि मोफत इंटरनेटचा परिणाम असा झाला की, ग्राहकांनी आपल्याकडचा ९० टक्के डेटा फक्त पॉर्न साइट्स पाहण्यासाठी आणि त्या डाऊनलोड करण्यासाठीच वापरला होता. ज्या ज्या रेल्वे, एसटी, शहर बस स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरवण्यात आली आहे त्या ठिकाणी वायफायचा अ‍ॅक्सेस अधिकतर पॉर्न पाहण्यासाठीच होतो. मुंबई, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांत जिथे वायफाय फ्री आहे तिथे दिवसभर मुले-मुली मोबाइलमध्ये डोकी घालून बसलेली असतात. त्यांना काही कामधंदा नसतो का? ते काय पाहत असतात? आईवडिलांनी शाळा, कॉलेजसाठी पास काढून दिलेला असता तिथे न जाता स्टेशनवर मोबाइलवर चॅटिंग करणारे असंख्य लोक असतात. त्यांना ना पोलीस कधी हटकतात, ना टीसी कधी काही विचारतात. पास आहे म्हणून दिवसदिवस स्टेशनवर बसून राहायचे आणि मोबाइलची बॅटरी संपली की घरी जायचे. हे प्रकार रोज पहायला मिळतात. बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली येथील काही स्थानकांवरील मोफत वायफाय बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. देशभरात महिला आणि बालिकांवर होणाºया लैंगिक अत्याचारात कमालीची वाढ झाल्याचे आणि याला मोफत इंटरनेट हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे न्यायालयानेही मान्य केले आहे. उत्तराखंड हायकोर्टाने जुलै २०१८ मध्ये दिलेल्या आदेशानुसार ८२७ पॉर्न साइटवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश ट्रायसह सर्व मोबाइल आणि इंटरनेट सेवा पुरवठा करणाºया सर्व कंपन्यांना दिले आहेत. जगभरात आजमितीला सर्वाधिक कमाई करणारा उद्योग म्हणून पॉर्न जगताकडे पाहिले जाते. लाखोंच्या संख्येने पॉर्न साइट्स उपलब्ध आहेत. बलात्कार प्रकरणातील ९० टक्के गुन्हेगार पॉर्नच्या आहारी गेलेले आढळतात. या सर्व पार्श्वभूमीवर आता महिलांविरोधातील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसाठी पॉर्न साइट्स जबाबदार असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केले आहे. इंटरनेटवरील अशा सर्व पॉर्न साइट्सवर बंदी घालण्याची त्यांनी केलेली मागणी रास्तच आहे, पण आपली मुले-मुली फोनवर काय पाहत असतात याकडे आई-वडिलांनी लक्ष ठेवण्याचीही गरज आहे, हेही तितकेच खरे.आज पाश्चिमात्य देशातही संस्काराचे महत्त्व समजू लागले आहे. एकत्र जेवण, एकत्र चर्चा आणि वेळेत घरी येण्याचे महत्त्व त्यांना पटले आहे, पण बदलत्या जीवनशैलीत टीव्ही मालिका पाहण्यात अडकलेले आई-बाबा मुले काय पाहतात आणि करतात याकडे दुर्लक्ष करत आहेत. मुलीच नाही, तर मुलांनीही कसले कपडे घालावेत यावरही काही बंधने असली पाहिजेत. आज काही मुली अशा प्रकारचे टॉप वापरतात की त्यावर खांदे उघडे असतात आणि पुढे बाह्या असतात. म्हणजे कोणीतरी जबरदस्ती करून ती बाही फाडली आहे असे वाटावे असा तो टॉप असतो. फाटक्या उसवलेल्या जीन्स वापरून मुले-मुली आपले अंगप्रदर्शन करत असतात. हे कशासाठी असते? यालाच फिल्मी भाषेत सेक्स अपिल म्हणतात. आपल्या आकर्षक शरीराकडे चाळवणे यालाच म्हणतात. मग या स्वैराचाराचा कोणी गैरफायदा घेतला तर नंतर ओरडण्यात काय अर्थ आहे. तिजोरी तुम्ही उघडी टाकलीत आणि कोणी चोरी करून गेले तर त्याला काहीच अर्थ नसतो. म्हणूनच आपलं जपावं आणि दुसºयाला यश द्यावं हेच खरं आहे. जीवनशैली बदलली म्हणजे संस्कार त्याज्य झाले असे नव्हे. कौटुंबिक संवाद संपला असे नव्हे, तर घरातील कुटुंबाचा सदस्य कोण केव्हा येतो, किती वाजता आले पाहिजे, याबाबत नियम असले पाहिजेत, ते काटेकोरपणे पाळले पाहिजेत. म्हणजे जर काही वेळ चुकली तर गडबड आहे हे समजेल. लाइफस्टाइल किंवा जीवनशैली ही काही गुन्हेगारांना फायदेशीर होईल यासाठी बदलण्याची गरज नाही. म्हणूनच वाढते अत्याचार, गुन्हेगारी यात जीवनशैलीचा कितपत परिणाम आहे हे पाहण्याबरोबरच आपली मुले-मुली नेमकी काय करतात यावरही लक्ष ठेवण्याची तितकीच गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: