शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

जाऊ ना परत आपण?



डोंबिवली स्टेशन. वेळ सकाळी ९ ची. प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी होती. वैदेही आणि संजिवनी दोघी एकमेकींशी बोलत होत्या. वैदेहीने गेल्या चार दिवसांपासून फारच भीती घेतली होती, कारण तिच्या डोळ्यासमोर चार्मी लोकलमधून पडली होती. त्यामुळे आपणही कधीतरी अशाच पडून मरणार का? अशीच भीती तिच्या मनात होती. ही घटना घडली त्यादिवशी तर तिचे दिवसभर कामात लक्ष नव्हते. आॅफिसमध्ये कामात सतत चुका होत होत्या. बॉसची सारखी बोलणी खावी लागत होती, पण त्याकडेही तिचे दुर्लक्ष होते. दुसºया दिवशी सीएल टाकली आणि नंतर शनिवार, रविवार आला. त्यामुळे आज प्रथमच सोमवारी ती आॅफीसला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे निघाली होती, पण तिच्या चालण्यातला नेहमीचा आत्मविश्वास गेला होता. नेहमी बरोबर असणारी संजिवनी तिला म्हणाली, ‘बरी आहे ना तुझी तब्येत?’‘तब्येत बरी आहे गं, पण मनानं मी खूप खचली आहे’ वैदेही म्हणाली.तशी संजिवनीनं विचारलं, ‘का गं? काय झालं?’‘माझ्या मनात भीती आहे की, माझं तर असं नाही ना होणार? मी पण अशीच रोज लटकत जाते. आता गेली कित्येक वर्ष हे चालूच आहे, पण दिवसेंदिवस आपली ताकद कमी होते. दिवसेंदिवस गर्दी वाढतच चालली आहे. हे येणारे लोंढे. पटापट घुसणाºया मुली, महिला... या चेंगराचेंगरीत मला गाडीत चढता येईल ना? दरवाजापर्यंत पोहोचेन ना मी? दरवाजाच्या आत जायला मिळेल का मला? आणि दरवाजात लटकत राहिले त्या बारला तर आतल्या गर्दीत, ढकलाढकलीत माझा तोल जाणार नाही ना? सारखं या भीतीनं मला ग्रासलंय. गेले चार दिवस मला झोपच लागत नाहीये. चार्मी आपल्याबरोबरच रोज गर्दीतून प्रवास करणारी मुलगी. तिच्याबाबत हे घडलं तसं माझ्याबाबत नाही ना घडणार?’वैदेहीच्या घाबरलेल्या बोलण्याने संजिवनी सावध झाली आणि तिने विचार केला. आता हिला समजावून सांगण्याची गरज आहे. नाहीतर ही डिप्रेशनमध्येही जाईल. माणूस खचून गेला की तो संपतो. हिला आज सावरले पाहिजे. तिने निर्धाराने सांगितले, ‘वैदेही, असं खचून चालणार नाही. मनातली भीती पहिल्यांदा काढून टाक आणि एक लक्षात घे, जे होणार आहे ते कोणीच टाळू शकत नाही. मग स्वप्नातल्या संकटानं गांजून कशाला घ्यायचं? आलीच बघ गाडी.’‘अरे बापरे, फारच गर्दी आहे, आपण पुढची लोकल पकडूया का?’ वैदही म्हणाली. तशी संजिवनी म्हणाली, ‘मुळीच नाही... हीच लोकल पकडायची. गर्दी असली तरीही. अगं, चल... पुढे, मी थांबते तुझ्या मागे, चल..’ आणि त्या गर्दीत संजिवनीने अक्षरश: ढकलून वैदेहीला पुढे गाडीत बसवले आणि स्वत:ही शिरली. लोकल प्रवासात बसण्याचा प्रश्नच नसतो, पण किमान आपली पर्स सांभाळून किंवा सॅक सांभाळून उभं राहता आला तर बरं. दोघीही घामाघूम झाल्या होत्या. म्हणजे डिसेंबर महिन्यात थोडीफार थंड हवा पडत असतानाही संपूर्ण डब्यातल्या महिला घामाने पाझरत होत्या. घाटकोपरपर्यंत प्रवास करायचा होता. त्यामुळे दरवाजाच्या जवळ राहण्यात अर्थ नव्हता. ठाणे, मुलुंडला अनेकजणी उतरणार. त्यामुळे आपण आत शिरणे गरजेचे आहे. या विचाराने दोघी आत आत सरकत गेल्या.‘आलं बाई शिरायला... नाहीतर पुढच्या लोकलने यायचा विचार होता.’ वैदेहीने श्वास घेत सांगितले. तशी संजिवनी म्हणाली, ‘अगं पुढच्या लोकलला आणखी गर्दी वाढली असती. आपणही उभे राहून पाय दुखायला लागलेले असतात. त्यामुळे फ्रेश असताना लोकल पकडलेली कधीही चांगली. पहिली चुकली की दुसरी, तिसरी सहज पकडता येत नाही, कारण आत्मविश्वास आणखी कमी होतो आणि गर्दीही वाढलेली असते. त्यात उशीर होईल याचे टेन्शन आलेले असते. म्हणून प्लॅटफॉर्मवर आल्यावर पहिली लोकल पकडणे सोपे असते.’ संजिवनीने सांगितले त्यात बरेच तथ्य होते.मुंबईची लाइफलाइन असलेल्या या लोकलने कितीही सुधारणा केल्या, तरी त्या कमीच पडतात. पूर्वी आठ डबा होती, मग नऊ डबा झाली, बारा डबा झाली, पंधरा डबा झाली, पण गर्दी आहे ती आहेच. वाढतच चालली आहे. गुदमरून टाकणारे डबे जाऊन सगळीकडे हवा येईल असे डबे आले. डब्यात इंडिकेटर आले, नेक्स्ट स्टेशन कोणते ते सांगणारे. गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढली. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांचे पाय आणि गुडघे दुखू नयेत म्हणून सरकते जिने आले, प्लॅटफॉर्म रूंद केले, वायफाय आले. काय नाही केले रेल्वेने? तिकिटाच्या रांगेत उभे राहायला नको म्हणून एटीव्हीएम मशीन आले, यूटीएस अ‍ॅप आले, पण गर्दीचे लोंढे वाढू लागले तर काय होणार? गाड्यांची संख्या वाढवणे तर शक्य नसते. कल्याण स्थानकावर वाढत्या गाड्यांमुळे प्लॅटफॉर्म मिळत नाही. म्हणून लोकल रखडतात. कसे होणार हे नियोजन?खरं तर मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल हा एक चमत्कारच आहे. लाखो लोक प्रत्येक सेकंदाला प्रवास करत असतात. प्रत्येकाला आपलं ध्येय गाठायचं आहे. कुठेतरी पोहोचायचं आहे. दुसºयाच्या अगोदर तिथे पोहोचायचं आहे. त्यासाठी ढकलाढकली करून, गर्दी करून, घुसून लोकल पकडावीच लागते. काही सेकंदांत लोक उतरणार आणि त्यानंतर खालचे चढणार. हे कसं काय होणार?यातूनच काही प्रवासी टोळ्या तयार होतात. पश्चिम रेल्वेवर विरार लोकल पकडली तर तुम्हाला गोरेगाव, मालाड, कांदिवलीला उतरता येत नाही. उतरून दिले जात नाही. विरार लोकल ही विरार, नालासोपारा यांच्यासाठीच आहे, असा दंडक त्या प्रवाशांनी घातला आहे. मालाड, गोरेगावला जायचे असेल, तर बोरिवली लोकलच पकडावी लागते. तसं सेंट्रलला होत नाही. डोंबिवलीकरांचे प्रश्न सुटतच नाहीत. कर्जत, कसारा इकडून गाड्या भरूनच येतात. त्यामुळे आत शिरणे किती अवघड असते. रस्ता इतका लांब आहे की लोकलला दुसरा पर्यायही नाही. लोकल नको म्हणून बसचा पर्यायही निवडता येत नाही. डोंबिवलीतून सुटणाºया गाड्याही खूप कमी आहेत.अर्थात ही चिंता फक्त महिलांचीच आहे असे नाही. महिलांपेक्षा पुरुषांचेही प्रश्न खूप आहेत. म्हणजे लेडीज डबे असतानाही महिला जनरल डब्यात का येतात? त्याचा त्रास पुरुषांना खूप होतो असे अनेकांना वाटते, पण काही महिला तर मुद्दाम जनरल डब्यातून प्रवास करतात. याचे कारण पुरुष लोकलमध्ये सौजन्याने आत जाऊ देतात. काही गडबड नको म्हणून अंग चोरून बसतात, पण महिला डब्यात बायका रेटून, खेटून बसतात. महिलांचा एक प्रॉब्लेम म्हणजे बहुतेक महिलांची उंची ही पाच फुटाच्या आसपास असते. पुरुषांच्या तुलनेत महिला बुटक्या असतात. त्यामुळे लोकलमध्ये उभे राहताना उंच माणसात त्यांना गुदमरायला होते. त्यांना वरचे हँडल पकडणे कठीण जाते. हाताला पायाला त्यामुळे रग लागते. उंचीमुळे पुरुष जसे सहजपणे हँडल पकडतात तसे महिलांना जमत नाही.पण वैदेहीसारखे टेन्शन हजारो महिलांना आलेले आहे. अनेकजणी व्हीआरएस घेण्याचा विचार करत आहेत, तर कोणी नोकरी सोडणे हाच पर्याय स्वीकारतात. घराला हातभार लागेल, नवºयाने फ्लॅटसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते जात आहेत, मुलांचे शिक्षण आहे, मुलींची लग्नं आहेत. त्यासाठी आपला हातभार लागावा म्हणून महिला नोकरी करतात, पण या लाइफलाइनमधील गर्दीने त्यांचा कोंडमारा होत आहे. सतत त्यांना आपण घरी जाऊ ना परत हीच चिंता ग्रासत आहे. म्हणजे माझा नंबर कधी लागणार असे आपल्याला रांगेत असताना वाटते, पण आता माझा नंबर कधी लागेल हे सांगता येत नाही. कारण ही रांग जणू आता मृत्यूचा सापळा बनते आहे. मृत्युगोलाचा हा प्रवास आहे. त्यामुळेच या चक्रात प्रत्येकीला आज प्रश्न आहे की कधी लागणार माझा नंबर? आपण जाऊ ना परत घरी?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: