गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

नरो वा कुंजरोवा


फेक न्यूज, अफवा, पोकळ चर्चा यांनी कळतंय, समजतंय अशा असूत्रांकडून आलेल्या बातम्यांच्या आधारे नसणाºया बातम्या पसरवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्याचा कधी कधी इतका अतिरेक केला जातो की, उगाचच प्रत्येकाला संशयाच्या भोवºयात अडकवले जाते. गेल्या चार-पाच दिवसांपासून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याबाबतची वृत्ते उगाचच पाळणा कधी हलणार म्हणून वाट बघत बसलेल्या गावाकडच्या गप्पांप्रमाणे सुरू आहेत. पंकजा मुंडे काही तरी वेगळा विचार करणार आणि एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार या चर्चांचा उगाचच रतीब घातला जात आहे, म्हणजे आपल्याकडे बातम्यांना आता सत्यतेपेक्षा नरो वा कुंजरोवाचेच स्वरूप का येत आहे, हे अनाकलनीय आहे.कोण कुठे गेला, काय केले यावर लक्ष ठेवून त्याचे तर्क आणि अर्थ काढत चर्चेची एरंडाची गुºहाळे चालू ठेवायची, म्हणजे महाभारत युद्धात श्रीकृष्णाने अश्‍वत्थामा मेला अशी खोटी बातमी पसरवून द्रोणाचार्यांच्या हत्येचा मार्ग मोकळा केला. गुरू द्रोणाचार्यांनी कौरवांची अर्थात असत्याची बाजू घेतली होती आणि ही युद्ध जिंकण्यासाठी वापरलेली नीती म्हणून त्याचे समर्थन केले गेले. फेक न्यूज म्हणजे खोटी बातमी पसरवून स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्याला बदनाम करणे हे जगाच्या पाठीवर अनेक काळापासून घडत आलेले आहे, पण आज हीच कुटनीती मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये वापरताना दिसत आहे. कोण सत्तेत आला पाहिजे, कोण कुठे असला पाहिजे याची चर्चा माध्यमांमधून होती. त्यामुळे २०१९ च्या दोन्ही निवडणुका या राजकीय पक्ष विरुद्ध माध्यमे यांच्यात होत्या की, काय, असे वाटते. अर्थात, यात माध्यमे हरली असेच म्हणावे लागेल. कारण कोणाचेही ठोकताळे बरोबर आलेले नव्हते. त्यामुळे साधारण दोन महिन्यांपूर्वी कमलाकर असलेली माध्यमे आता एकाएकी बाणासूर झाल्यासारखी वागू लागली आहेत. या बाणासूराला सांभाळण्यासाठी घड्याळाची टिकटिक त्यांना महत्त्वाची वाटते.
अर्थात, आपल्याकडे निवडणुकांकडे युद्ध म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे या कथाही रम्य होऊन जातात कधी कधी, पण त्या रम्य कथांचा अतिरेक होतो, तेव्हा त्या रटाळ होऊ लागतात. आज त्याच त्या फालतू चर्चा आणि फेक बातम्यांवरचे तर्क-वितर्क यामुळे सामान्य माणसांना वैताग आला आहे. दुसºया महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात जर्मनीची पीछेहाट चालू असताना प्रसारमाध्यमे सतत जर्मन सैन्याची नेटाने आगेकूच सुरू आहे, अशा बातम्या प्रसिद्ध करीत असत. कुठलीही गोष्ट वारंवार सांगत राहिली, तर कालांतराने ती खरी वाटून लोकांचा त्यावर विश्‍वास बसतो. अ‍ॅडॉल्फ हिटलरचे विश्‍वासू सहकारी जोसेफ गोबेल्स यांनी ही नीती वापरल्यामुळे ती इतिहासात गोबेल्स नीती म्हणून ओळखली जाते. आज प्रसारमाध्यमे नेमके हेच करताना दिसत आहेत. खडसे शिवसेनेत जाणार, पंकजा शिवसेनेत जाणार, ओबीसींचा स्वतंत्र गट तयार होणार, यावर इतके चर्चाचर्विचरण झाले की, त्याचे उत्तर आज माध्यमांना मिळेल.दुसरीकडे सोशल मीडियाने तर सार्वजनिक आणि खासगी यातील अंतर पार मिटवून टाकले आहे. आज एखादी व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही लिहिते, प्रसारित करते, सोशल मीडियाचा वापर करणा‍ºयांना यातले काहीही माहिती नसते, पण बिचारे व्यक्त होत असतात. अपुरी माहिती आणि कोणाच्या तरी दातात अडकलेले चावत बसत असतात. त्यांना आयटी अ‍ॅक्टबद्दल काहीही माहिती नसते. असे लोक विचार न करता आलेली माहिती पुढे पाठवतात. माहिती प्रसार क्रांतीचा निरंतर प्रसार आणि सोशल मीडियासारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या शोधातून माहिती देण्याचे अनेक स्रोत उपलब्ध होऊ लागले आहेत. आलं की, न वाचताच फॉरवर्ड केलं, अमूक इतक्या लाइक पडल्या आणि तमूक इतक्या लोकांनी शेअर केले, पण त्यापैकी किती जणांनी ते मनापासून नाही, निदान ओझरते तरी वाचलेले असते, कोणास ठाऊक, पण हा धुमाकूळ सुरू असतो. आपण कुठेही असलो, अगदी आपण घरी असो, आॅफिसमध्ये असो किंवा पिकनिकला जात असताना मोबाइल हा आपल्या हातात असतोच आणि आपण सतत जिज्ञासू वृत्तीने त्यातील इंटरनेट सुविधांचा वापर करीत असतो. सोशल मीडियातील अनेक संकेतस्थळे आणि इतर सुविधा केवळ मौज-मस्ती आणि मनोरंजनासाठी असतात हाच समज आतापर्यंत होता, मात्र त्यापेक्षाही त्याची ताकद अफाट आणि अचाट आहे. या समस्येचे मूळ कारण हे आहे की, बहुसंख्य लोक इंटरनेटवर उपलब्ध असणारी प्रत्येक गोष्ट ही खरीच आहे, असेच गृहित धरतात. सोशल मीडियाचा वापर करणा‍ºयांनी खबरदारी घेतली नाही, तर धोका सतत असतो. जगभरात निरंतर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर माध्यमांतून एका सेकंदामध्ये संदेश प्रसारित करून हिंसक घटना घडत असतात. आपण त्याला प्रतिसाद किती द्यावा आणि समाजात अराजक माजवण्यात वाटेकरी व्हावे की, आपली विवेकबुद्धी वापरून सामाजिक बांधिलकी जपावी, हे ज्याने-त्याने ठरवावे.
आज याच समाजमाध्यमांमधून आणि प्रसारमाध्यमांमधून खडसे, पंकजा मुंडे, नागरिकत्व विधेयक, एनआरसी, सीएबी याबाबत काय वाटेल ती चर्चा सुरू असते. कसलीही माहिती नसताना त्यावर मते कशी काय व्यक्त होऊ शकतात? हा न सुटणारा प्रश्न आहे, पण त्यालाही लाइक केले जाते आणि फॉरवर्ड केले जाते, तेंव्हा यातून काही तरी भयानक निर्माण होऊ शकते, असे वाटते.म्हणजे पूर्वीच्या काळी कुठल्या तरी देवीचा कोप झाला आहे, तो दूर करण्यासाठी पंधरा पोस्ट कार्ड पाठवा. ती पाठवल्याने तुम्हाला देवी प्रसन्न होईल, नाही पाठवली तर तिचा कोप होईल अशा प्रकारे पत्रं यायची. सूज्ञ लोक ती न वाचता किंवा वाचून फाडून टाकत. भित्रे लोक पंधरा पैशाची कार्ड आणून तशीच लिहून आपल्या ओळखीच्या लोकांना पाठवायचे. तीच मानसिकता आता कॉर्पोरेट झाली आहे, डिजीटल झाली आहे. माध्यम बदलले, मनोवृत्ती नाही.
यामागे एक तंत्र असते. आधी एखादी माहिती एका निर्धारित प्रक्रियेला सामोरे जाऊन ती जनतेसमोर पोहोचत असे. यामागे कायदा न मानणारा एक वर्ग होता. आता आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वच बदलून टाकले आहे. आता प्रत्येक जण स्वत:ला प्रकाशक समजतो. तंत्रज्ञानाने ही सुविधा सर्वांना दिली आहे. माहितीचे स्रोत असंख्य झाले आहेत. ते वापरणा‍ºया अनेक जणांना यातील गांभीर्याची जाण नसते, तर काही जणांना आपल्या सामाजिक दायित्वाचे भान निश्‍िचतच असते. एक बातमी एखाद्या समुदायासाठी लाभदायक ठरू शकते. विकसित देशातील नागरिक अशा फेक न्यूजच्या जाळ्यात अडकत नाहीत. कारण ते आपली विवेकबुद्धी शाबूत राखून निर्णय घेतात.भारतासारख्या विकसनशील देशात जिथे शिक्षण आणि जागरुकतेचा स्तर एकसारखा नाही. तिथे लोक बातमी आणि माहिती यांच्याबद्दल द्विधा मन:स्थितीत असतात आणि असत्याला सत्य मानून मोकळे होतात. वास्तविक आपण जे वाचतो, ते सत्य असेलच याची शहानिशा करणे थोडे कठीण आहे, म्हणून लगेच आततायीपणा करून पुढे प्रसारित करणे टाळले पाहिजे. आपल्या मनावर अनेक वर्षांपासून एका विशिष्ट विचारांचा पगडा असतो. त्यात प्रभावित होऊन फेक न्यूज पसरवण्यात वाढ होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या प्रतिमेला ठेच पोहोचवून किंवा लोकांमध्ये विरोधी बातम्या पसरवून समाजाला भडकावणे, खोट्या बातम्या पसरवून जनतेच्या मनात भीती पसरवणे, सुरक्षा व्यवस्थेला वेठीस धरून विकृत आनंद मिळवणे काही नतद्रष्टांचे काम असते. निवडणुकांच्या काळात अशा फेक न्यूजवाल्यांना सुगीचे दिवस येतात. राजकारणात आधी मुद्यांवर थेट संवाद होत असे. आता तिथे दावे-प्रतिदावे होतात आणि आकर्षक स्वप्ने दाखवली जातात.
राजकीय नेते तत्कालीक हितासाठी अनेक दावे करतात. कधी स्वत:ची प्रतिमा उजळण्यासाठी आणि विरोधकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी एखादा जुना व्हिडीओ प्रसारित करून ही घटना आताच घडल्याचे दर्शवून जनतेला भडकवण्याचे प्रयत्न काही कमी घडत नाहीत. सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून जगातील नेते आणि चित्रपट कलाकारांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्या जातात. कादर खान, शक्ती कपूर अशा किती तरी जणांना गेल्या चार वर्षांत अनेक वेळा मारले होते. अशा वेळी संबंधितांना नाहक मन:स्ताप होतो. त्यांना स्वत: जिवंत असल्याचे जाहीर करावे लागते. या जाळ्यात अडकणारे फक्त मूर्खच बनतात असे नव्हे, तर कळत-नकळत आपण अशा लबाड लोकांच्या हातचे बाहुले बनत असतो. अशा प्रकारची माहिती लोकांच्या मनावर कब्जा करते आणि समाजासाठी दीर्घकाळ घातक ठरू शकते, तसेच नागरिक, संस्था आणि लोकशाही प्रक्रियेला हानिकारक ठरू शकते.आता खडसे काय किंवा पंकजा मुंडे काय, शिवसेनेत गेले काय आणि भाजपमध्ये राहिले काय, याच्याशी सामान्य माणसांना काय फरक पडणार आहे? आज खडसेही आमदार नाहीत आणि पंकजा मुंडेही पराभूत झालेल्या आहेत. विनोद तावडेंचे तिकीट कापले होते. प्रकाश मेहतांना तिकीट दिलेले नव्हते. अशा पाच पंचवीस लोकांना आपल्या पक्षात घेऊन शिवसेना काय करणार आहे? त्यांच्यामुळे त्यांचे विधिमंडळातील संख्याबळ वाढणार आहे का? या कसल्याही गोष्टीचा विचार न करता नाराज आहेत, पक्ष सोडणार, सेनेत जाणार अशा बातम्या पसरत आहेत. अशांवर किती विश्वास ठेवायचा, हे ज्याचे-त्याने ठरवले पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: