शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

सारे काही चर्चेत राहण्यासाठीच


गुरुवारी, १२ डिसेंबरला पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर आपले शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन्ही भाजपच्या नेत्यांनी गोपीनाथ गडावरून त्यांची नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे, पण त्याचवेळी आपण पक्षातच राहणार. आता बॉल भाजपच्या कोर्टात आहे. मी पक्षाला सोडणार नाही, पण पक्षाला जर मला सोडायचं असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा. मी आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं पुढील काम करणार आहे, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही हजर होते. या खदखदीला त्यांनीही उत्तर दिले आणि पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आणायचे नाहीत, असेही सांगितले, पण एकंदर पाहिले, तर भाजपमधील नाराज कधीच पक्ष सोडून जात नाहीत, म्हणजे ओरिजनल जे भाजपवासी आहेत, त्यांच्याबाबत हे लागू होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांतून आलेल्यांचा विचार करायची गरज नाही, पण जे मूळचे भाजपेयी आहेत, ते कधीच पक्ष सोडत नसतात. त्यापैकीच खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आहेत. त्यामुळे हे फक्त चर्चेत राहण्यासाठीच चालले आहे काय? असे वाटते.भाजप हा बहुजनांचा पक्ष आहे, हे बिंबवण्यासाठी हे सगळे चालले होते का? अशीच शंका येते. त्यामुळे गेले काही दिवस एके काळी शेटजी-भटजींचा पक्ष असलेला भाजप बहुजनांचा करण्यात गोपीनाथ मुंडे यांचा वाटा मोठा आहे, ही चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे यांनीही गुरुवारी भाषणात म्हटले की, भाजपची वाटचाल गेली ४० वर्षे पाहिली आहे. शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून पक्षाला ओळखलं जायचं, त्या पक्षाला बहुजन पक्षाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. आता शेटजी म्हटले की गुजराती, मारवाडी किंवा श्रीमंत उद्योजक असे गृहीत धरता येईल, तर भटजी म्हटले तर ब्राह्मणवर्ग म्हणता येईल, पण भटजी हा फक्त पूजापाठ, पौरोहित्य किंवा कर्मकांड करणारा असतो. तो राजकारणात कधीच नसतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षात किंवा जनसंघात हा वर्ग कधी होता, हे आठवत नाही. डोक्याला शेंडी बांधून आलेले संघात असतील, पण भाजपमध्ये कधी दिसले नव्हते, तसेच काही शेठजी संघाच्या कार्यक्रमाला देणगी देत असतील, उदारपणे एखादे प्रायोजकत्व देत असतील, पण प्रत्यक्ष भाजपमध्ये कधीच दिसायचे नाहीत. तरीही हा पक्ष शेटजी-भटजींचा का म्हटला गेला, हे समजत नाही. तसे पाहिले तर कोणत्या पक्षात शेटजी, भटजी किंवा ब्राह्मण नव्हते? काँग्रेसमध्ये एक काळ काकासाहेब गाडगीळ, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, आता आमदार अनंत गाडगीळ ही परंपरा आहे. जयवंतराव टिळक यांच्या घराण्याची परंपरा आहे. अनेक ब्राह्मण लोक ज्यांना भटजी म्हटले जाते, ते काँग्रेसमध्ये होते, आहेत. त्यांचे स्थानही या पक्षात मानाचे होते. शिवसेनेत सुधीर जोशी, मनोहर जोशी असे अनेक दिग्गज आहेत, तसेच केवळ मराठ्यांचा पक्ष म्हटल्या गेलेल्या राष्ट्रवादीतही गुरुनाथ कुलकर्णी यांच्यासारखे अनेक मान्यवर ब्राह्मण होते. समाजवादी पक्षातही होते. इतकेच काय डीएसकेंसारख्या व्यक्तीने बसपातही प्रवेश केलेला होता. त्यामुळे ब्राह्मणवर्ग सर्वात असताना आणि व्यापारीवर्गही सगळीकडे असताना फक्त भाजपच शेटजी-भटजींचा पक्ष कसा काय असू शकतो? सगळेच पक्ष शेटजी-भटजींशिवाय नव्हते आणि नाहीत. असे असताना फक्त शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून भाजपचा वारंवार उल्लेख करण्याचे नेमके कारण काय आहे? तर आता राज्य भाजपकडे काहीही कार्यक्रम हातात नाही. सत्ता गेलेली आहे, म्हणून चर्चेत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी अंतर्गत धुसफूस दाखवून मीडियाला खाद्य पुरवणे हाच यातला उद्देश दिसून येतो. एवढा अन्याय, अत्याचार आपल्या पक्षात होत असेल, तर कोणी तिथे राहणार नाही. त्यासाठी शेटजी-भटजी किंवा बडवे म्हणायचे कारण नाही. पक्ष सोडून जाताना बडवे किंवा शेटजी-भटजी म्हणण्याची एक प्रथा आहे. मग खरोखरच खडसेंना पक्ष सोडायचा असेल, तर कोणता बिनशेटजी-भटजींचा पक्ष त्यांना मिळणार आहे, हेही त्यांनी सांगितले पाहिजे. केवळ चर्चेत राहण्यासाठी हा फंडा वापरून कोणत्याही विशिष्ट जातीला दुखवायचे कारण नाही.भाजप हा माधवचा पक्ष आहे, असे आता बोलले जाते. माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी हा गट भाजपचा मतदार आहे. तो भाजपपासून दूर गेल्यास ती भाजपसाठी धोक्याची घंटा ठरेल. त्यामुळे ही व्होटबँक कायम ठेवण्यासाठी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे या नेत्यांना भाजपला सामावून घ्यावं लागेल. त्यांना विधान परिषदेवर घ्यावं लागेल, ते शक्य नसल्यास या नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रियेत स्थान द्यावं लागेल, त्यासाठी हे दबावतंत्र आहे, पण त्यासाठी जातीय समीकरणे कशी काय लावली जातात? पक्ष पक्ष असतो. ती जातीय संघटना नाही. आपल्याकडे आहेतच की, अशा प्रत्येक जातीवर आधारित संघटना. प्रत्येक पक्षात जातीय सेल आहेतच ना? पण पक्ष वेगळा आणि या संघटना वेगळ्या असतात. हे सगळे माहीत नसेल इतके हे नेते किंवा पक्ष अज्ञान नाहीत, पण भाजपमधील अंतर्गत गटबाजीला जातीय रंग प्राप्त झाले आहेत, हे नक्की. पंकजांना डावलणं म्हणजे ओबीसींना डावलणं आहे का? असा प्रश्न उपस्थित होईल. ब्राह्मण समाजाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेच जर मराठा समाजाचे असते, तर असा प्रसंग उद्भवला असता का? हाही प्रश्न उपस्थित होईल. अर्थात, पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, तर त्यांचं बंड शमू शकतं. भाजपची व्होट बँक ओबीसी आहे, त्यामुळे पंकजा मुंडेंना दुखावून चालणार नाही. त्यांना सामावून घ्यावं लागेल, हे न समजण्याइतके भाजपचे नेते अडाणी नाहीत, पण हे सारे चर्चेत राहण्यासाठी आहे. त्यासाठी जातीय समीकरणांचा आधार घेतला जात आहे, हे वाईट आहे. जोपर्यंत विधान परिषदेच्या नियुक्त्या जाहीर होत नाहीत आणि प्रदेशाध्यक्षपदाची निवड होत नाही, तोपर्यंत नाराज गट सक्रिय राहील. गोपीनाथ गडावरील कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ज्यांचं दमन करण्यात आलं, ते नेते आता एकत्र आलेत. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामुळे या सगळ्या नाराज नेत्यांना एक व्यासपीठ मिळालं आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलंय. याचा अर्थ पराभव झाला असताना मतदारसंघ बांधण्याचा विचार न करता त्या या पद्धतीनं पक्षावर दबाव आणू पाहात आहेत.आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक कार्य करणार, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तेव्हा त्या भविष्यात वेगळा पक्ष काढणार? असा प्रश्न उपस्थित होतो, शिवाय प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्षावर सतत दबावाची टांगती तलवार ठेवणार का? हे पाहावं लागेल, पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या राजकीय काम करणार असल्यास पक्ष त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करेल का? हेही पाहावं लागेल, पण तसं होणार नाही. कारण त्यामुळे पक्ष चर्चेत राहात आहे. बाकीचे विषय बाजूला पाडण्यात त्यामुळे यश येत आहे, हे भाजपचे तंत्र आहे. भाजपमध्ये अमित शहांच्या जवळचे आणि मोदींच्या जवळचे असे दोन गट आहेत. आता मोदी शहा हे एकमेकांच्या जवळचे आहेत, हा भाग वेगळा. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं समीकरण पाहिजे तितकं चांगलं नाही, पण चंद्रकांत पाटील आणि अमित शहा यांचं मात्र चांगलं जमतं. चंद्रकांत पाटील या मेळाव्याला उपस्थित होते, त्यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला अमित शहा यांची मंजुरी नाही, असंही त्यांच्या उपस्थितीतून सांगण्याचा प्रयत्न असू शकतो. विशेषत: २३ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे जी घडामोड झाली, ती कोणाला मान्य होती का? हाही प्रश्न त्यातून दिसून येतो. अमित शहा हे राजकीयदृष्ट्या व्यावहारिक नेते आहेत. प्रत्येक नेत्याची राजकीय ताकद बघून ते त्याचा वापर करतात किंवा त्याला बाजूला सारतात, पण भाजपकडून मुंडे आणि खडसे यांना विश्वासात न घेण्याची चूक नक्कीच झालीय. या दोघांनाही पक्षानं निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यायला पाहिजे होतं, पण ती चूक सुधारून भाजप एकसंघ राहील, यात शंकाच नाही. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नेते भाजपचे आधारस्तंभ आहेत. त्यांना दूर करण्याची चूक भाजप कधीच करणार नाही. पंकजा मुडे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार आहेत, याचे कारण त्यांना मुंबईत शिरकाव हवा आहे. त्यांच्याकडे आज पद नाही. त्यामुळे या प्रतिष्ठानच्या प्रमुख म्हणून त्यांना आपली ताकद दाखवता येईल. ही ताकद भाजपच्याच फायद्याची असणार आहे. त्या फक्त काही कामं प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार आहेत. त्यांनी काही भाजप सोडलेला नाही. फक्त चर्चेत राहण्यासाठी हे सर्व चालले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: