मागच्या एक महिन्यातील नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात आता दुसºया राजकीय नाट्याची सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी ग्रामविकास, तसंच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या अवतीभोवती हे नाट्य घडताना दिसत आहे. रविवारी (१ डिसेंबर) पंकजांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी 'पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचंय? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार आहे. १२ डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...' असं लिहिलं होतं. झालं... एवढी पोस्ट पडली की, लगेच सगळ्या माध्यमांमधून पंकजा मुंडे नाराज आहेत, त्या भाजप सोडणार, शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशा मथळ्यांच्या बातम्या रंगू लागल्या, पण भाजपमध्ये ही मुंडे नाराजीची परंपरा आहेच. २००९ मध्ये असेच गोपीनाथ मुंडे नाराज झाले होते. त्यावेळी विलासराव देशमुखांच्या कृपेने ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत इथपर्यंत बातम्या आल्या होत्या, परंतु तसे काहीही घडले नाही. गोपीनाथ मुंडे हे निष्ठावंत भाजप नेते होते, तीच परंपरा पंकजा मुंडेही सांभाळतील, यात शंकाच नाही.रविवारच्या या फेसबुक पोस्टमध्ये पंकजांनी 'मावळे' हा शब्द वापरला होता. हा खास शिवसेनेकडून वापरला जाणारा शब्द असल्यानं पंकजा भाजपला सोडणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनेक बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत, असे वक्तव्य करून नरो वा कुंजरोवाची भूमिका घेतली. पंकजांबद्दल १२ डिसेंबरला काय ते स्पष्ट होईल, असं विधान राऊत यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. लगेच त्या शिवबंधन बांधणार अशा चर्चांना ऊत आला. अर्थात, भाजपने मात्र पंकजा मुंडे पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नसल्याचं सांगत अशी शक्यता फेटाळून लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं, पण तरी पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काढून टाकलेला भाजपचा उल्लेख आणि त्यांची फेसबुक पोस्ट यांमुळे पंकजा भविष्याबद्दल काय निर्णय घेणार याबद्दलच्या चर्चा सुरूच आहेत. पक्षांतर्गत नाराजीमुळे पंकजा मुंडेंनी अशी पोस्ट लिहिली आहे का? हा पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यामुळे तर्क-वितर्कांना ऊत आला तर नवल नाही. निवडणुका होऊन जेमतेम दीड महिना झालेला आहे. सरकार स्थापन होऊन आठवडाही झालेला नाही. त्यामुळे आता पक्षांतर करून त्यांच्या पदरात काय पडणार? कोणत्याही निवडणुका समोर नसताना कोणीही पक्षांतर करत नसते. त्यामुळे या तर्कात काहीही अर्थ नाही. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात कट्टर प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. हा पराभव पंकजा यांच्या जिव्हारी लागला होता. पराभव झाल्यानंतर पक्षाकडून पंकजा यांचं सांत्वन होणं अपेक्षित होतं, पण अशा स्थितीतही पक्षाने त्यांना आधार दिला नाही, असा त्यांचा समज झाला असण्याची शक्यता आहे, असे तर्क सध्या लढवले जात आहेत, पण भाजपला जय-पराजय काही नवीन नाही. गेल्या पाच वर्षांत त्यांना यश मिळायला लागले आहे. त्यापूर्वी फक्त पराभवच पत्करण्याची मानसिकता त्यांच्यात होती. त्यामुळे अशा पराभवाने खचून जाणारा भाजपचा विचार नाही.पराभवानंतर आजतागायत पंकजा मुंडे प्रचंड अस्वस्थ आहेत. ते स्वाभाविक आहे, पण याचा अर्थ त्या पक्ष सोडतील असे बिल्कूल नाही. परळीतील पराभवापासूनच पंकजा अस्वस्थ असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या मनात या पराभवाची खदखद आहे. या अस्वस्थतेला तोंड फोडण्यासाठीच त्यांनी हा मार्ग निवडला आहे. वडिलांच्या जयंतीनिमित्ताने त्या काही कार्यक्रम घेऊन जनतेशी संवाद साधणार असतील, तर ते शक्तिप्रदर्शन आहे आणि त्या शिवसेनेत जातील असे तर्क करण्यात काही अर्थ नाही. पंकजा मुंडे यांचा महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीतील नेत्यांमध्ये समावेश आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यानंतर झालेल्या बैठकांमध्ये त्यांना निमंत्रण देण्यात आलं, पण हे निमंत्रण फक्त औपचारिकता म्हणून देण्यात आले होते. त्यामुळे याबाबतची नाराजी त्यांच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसून येत होती. पक्षामध्ये आपल्याला दुर्लक्षित करण्यात येत असल्याची भावना त्यांच्या मनात तयार झाली असण्याची शक्यता आहे, असे तर्क करण्यात आले होते, पण त्यात काहीही तत्थ्य नाही. मुंडे कुटुंबीय भाजपशी कधीही प्रतारणा करणार नाहीत. भाजप स्थापनेत त्यांचा वाटा आहे. ज्या पक्षाच्या स्थापनेचा एक भाग असलेल्या मुंडे कुटुंबीयांकडून असे काहीही होणार नाही. २००९ ला राज्यात सत्ता आणण्याचे युतीचे स्वप्न भंगले होते. मनसेमुळे भाजपच्या खूप जागा कमी झाल्या होत्या. शिवसेनेलाही फटका बसला होता. त्यामुळे गोपीनाथ मुंडे नाराज झाले होते. त्यावेळीही ते पक्ष सोडणार अशा चर्चा आल्या होत्या, पण तसे काहीच घडले नव्हते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना निवडणुकीसाठी तिकीट दिलं नाही. मोदी, शहा यांच्याप्रमाणे राजकारण करून अनेक नेत्यांचे पंख छाटण्याचा प्रकार महाराष्ट्रात दिसून आला. त्याचप्रमाणे ८० तासांच्या सरकारमध्ये फडणवीस यांची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक असल्याच्या चर्चांनाही ऊत आला होता. आपल्याला सरकार स्थापनेची कल्पना न देता हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पंकजांनी नाराजी व्यक्त केली असेल, पण त्यात काहीच गैर नाही. नाराजी व्यक्त करणे याचा अर्थ पक्ष सोडणे असा कधीच होत नाही. पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे यांच्यामुळे नव्हे, तर भाजपमधील काही लोकांमुळे झाला. त्यासाठी रसद पुरवण्यात आली, असा आरोप परळीमध्ये करण्यात येत आहे. याबाबत पंकजा यांच्याही मनात अनेक शंका-कुशंका आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुंडे यांची फेसबुक पोस्ट समोर आली असल्यामुळे यामागे फडणवीस यांचं पक्षांतर्गत राजकारण हे खरं कारण असू शकतं, पण आता सत्ता गेल्यावर अपयशाचे खापर कोणावर तरी फोडावेच लागते. अपयशाची कारणमिमांसा करताना कोणावर तरी टीका ही करावीच लागते. सध्या भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वात सोयीस्कर असे टीकेला पात्र असलेले नेते आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्यांना जबाबदार धरता येऊ शकते.आज पंकजा मुंडे यांना ओबीसी नेत्या म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यामागे ओबीसी, माळी, धनगर असा वर्ग आहे. सत्ता कायम असताना कार्यकर्ते नेत्यांच्या आजूबाजूला दिसतात, पण पराभूत नेत्यांच्या मागे कार्यकर्ते किती वेळ टिकणार? हा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांची संघटना जपण्यासाठी पंकजा यांची धडपड दिसून येत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी अशा प्रकारची सभा किंवा मोठा निर्णय घेण्याचा मार्ग निवडला असण्याची शक्यता आहे. सत्ता नसली, तरी तुमचे प्रश्न वाºयावर सोडणार नाही हा विश्वास देण्यासाठी त्यांनी ही संधी साधली असेल, तर त्यात गैर काहीच नाही, पण याचा अर्थ त्यांनी नाराजीने भाजप सोडण्याची तयारी केली आहे, असा तर्क करणे चुकीचे आहे. पंकजा मुंडे नाराज आहेत, असं वाटत असलं, तरी त्या पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत. पंकजा यांच्या वडिलांवरही असा प्रसंग ओढवला होता, पण त्यांनी त्यावेळी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अखेरपर्यंत ते पक्षासोबतच होते. त्यामुळे पंकजासुद्धा वडिलांप्रमाणेच पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतील, त्या पक्ष सोडतील असं सध्या तरी वाटत नाही. आता १२ तारखेपर्यंत तरी कोणीच कोणत्या निर्णयावर यायची गरज नाही, पण ही त्यांच्या घरातील नाराजीची परंपरा आहे. त्या वडिलांच्याच मार्गावरून जाऊन भाजपमध्येच राहतील, यात शंकाच नाही.
बुधवार, ४ डिसेंबर, २०१९
नाराजीची परंपरा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा