मागच्याच आठवड्यात अभिनेता कुशल पंजाबी याने आत्महत्या केली. मुंबईतील पाली हिल भागातील राहत्या घरी कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती. अर्थात अभिनेत्याने आत्महत्या करण्याचा हा काही पहिला प्रकार नाही, पण गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे, हे नक्की.कुशल पंजाबी याने ३० हून अधिक टीव्ही सीरिअल्स आणि शोमध्ये काम केले आहे. नऊ चित्रपटांमधून त्याने लहान-सहान भूमिकाही केल्या होत्या, तरीही त्याला नैराश्य आले आणि त्याने आत्महत्या केली. नैराश्य येणे, डिप्रेशनमध्ये जाणे हे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढत आहेत. हे कशामुळे होते, याचाही शोध घेण्याची गरज आहे. या अगोदरही अनेक नामांकीत कलाकारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यामध्ये कृष्णधवल चित्रपटाच्या युगातील भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गज नाव म्हणजे गुरुदत्त. चित्रपट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट अभिनेता अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अशीच नैराश्यातून आत्महत्या केली होती. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, ऋषी कपूर अशा स्टार सुपरस्टार अभिनेत्यांना नाव देणाºया मनमोहन देसाई यांनीही १९९४ च्या मार्च महिन्यात गिरगावमधील घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या परवीन बाबी. त्यांनीही आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. गेल्या काही वर्षांत मोठमोठे पोलीस अधिकारी यांनीही सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. माणसं अशी स्वत:चं जीवन का संपवतात? हे वेदनादायी आहे. इतके नैराश्य अपयशाने येते की, कसल्या भीतीने? वाढती स्पर्धा आणि स्वत:चं स्थान टिकवण्यासाठी होणारी फरफट यामागे आहे का? पण हा काही उपाय नाही.सर्वात आश्चर्यजनक किंवा खेदजनक आत्महत्या दीड वर्षापूर्वी झालेली होती ती राष्टÑसंत किंवा राजकीय गुरू म्हणून ख्याती असलेल्या आणि प्रसन्न चेहºयाच्या भय्यूजी महाराज यांची आत्महत्या. अत्यंत शांत, संयमी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व अशी ख्याती असलेल्या एका अध्यात्मिक गुरूने केलेली आत्महत्या हा अध्यात्मिक क्षेत्राला बसलेला फार मोठा हादराच म्हणावा लागेल. माणूस अध्यात्माकडे का झुकतो? त्याची काय अपेक्षा असते? प्रत्येकाला सुख, शांती आणि समाधान हवे असते. एवढेच मागण्यासाठी सामान्य माणूस देव, गुरू, बाबा, महाराज यांच्याकडे जात असतो. आपल्या चित्तवृत्ती स्थिर करून मानसिक समाधान लाभावे आणि तणावमुक्त जीवन जगता यावे, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. कसल्यातरी तणावातून, अपेक्षाभंगातून माणसाच्या मनात नैराश्य उत्पन्न होते. या नैराश्यातून आत्महत्येचे विचार डोकावतात. हे नैराश्य दूर करण्याचे काम गुरू, महाराज करत असतात. अशा परिस्थितीत भय्यूजी महाराजांसारख्या पोहोचलेल्या संतात्म्याने आत्महत्या करावी हे फार मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल.सर्वांना तणावमुक्त करण्याची ज्या व्यक्तिमत्वात ताकद होती, ज्यांच्या प्रसन्न आणि हसºया चेहºयाने समोरचा मनुष्य संतापलेला असेल, तरी शांत होईल इतकी ताकद होती. तीच व्यक्ती अशी टोकाची भूमिका घेते हे अत्यंत वाईट म्हणावे लागेल. सध्याचे जग हे प्रत्येकाला तणावात ठेवणारे जग आहे. आज प्रत्येक जण कसल्यातरी तणावाखालीच जगतो आहे. सकाळी उठल्यापासून या तणावाचे ओझे घेऊन प्रत्येक जण जगतो आहे. कामावर वेळेवर पोहोचू की नाही? लोकल वेळेवर येईल की नाही? लोकलचा काही घोटाळा होऊन लेटमार्क, तर लागणार नाही ना? इथपासून ते पगार वेळेवर होईल की नाही? मिळणाºया पगारात सगळे खर्च भागतील की नाही? कामाचे दिलेले टार्गेट पूर्ण होईल की नाही? पदोन्नती होईल की नाही? कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जातील की नाही? मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, त्यांचे करिअर, घराचे बांधकाम, आई-वडिलांची काळजी या सगळ्या वातावरणात आपण सगळ्यांना वेळ देऊ शकू की नाही? अशी असंख्य टेन्शन माणसे आपल्या मनावर घेऊन जगत असतात. व्यापारी उद्योजक आपला धंदा व्यवस्थित चालेल की, नाही? मार्केटमध्ये स्पर्धकांकडून कोंडी होणार नाही ना? अशा तणावात जगत असतात. शेतकºयांना कायमचीच चिंता असते. पाऊस वेळेवर पडेल का? पीकपाणी चांगले होईल का? भरपूर पीक आले, तर भाव पडेल का? कमी आले, तर भाव चढेल का? दोन पैसे हातात लागतील का? बँकांचे, सोसायटीचे, सावकाराचे कर्ज फिटेल का? सातबारा कोरा होईल का? सरकारी मदत जाहीर झाली, तरी ती आपल्याला मिळेल का? अशा असंख्य चिंता प्रत्येकाच्या मनात तणाव निर्माण करत असतात. या तणावातून मनात नकारात्मक भावना निर्माण होऊन नैराश्य उत्पन्न होते. या नैराश्येतूनच आत्महत्येचे विचार डोकावत असतात.माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, पण नैराश्यात जातो तेव्हा तो एकटा पडतो. प्रत्येक जण आपापल्या नादात आहेत, कामात गुंतले आहेत, आपल्याकडे बघायलाही कोणाला वेळ नाही, आपण असलो काय नसलो काय कोणाला काही फरक पडत नाही, असे विचार मनात घोंगावू लागतात. त्यातूनच आत्महत्येचे प्रकार घडतात. त्यामुळे घरात एकटेपणाने वावरणाºया माणसांची प्रत्येकाने विचारपूस केली पाहिजे. घरातल्या माणसांनी एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे. एका घरात राहूनही जर स्टेशनवर बसल्याप्रमाणे किंवा प्रवासात भेटलेल्या सहप्रवाशाप्रमाणे संवादहीन होत असू, तर त्यातून असेच प्रकार घडत राहणार. माणसाला व्यक्त होता आले पाहिजे. ते व्यक्त होता आले नाही, तर माणूस एकाकी पडतो. कुढत बसतो. खूप उच्च पदाला पोहोचलेल्या व्यक्ती या बºयाचवेळा समाजाच्या फाजील अपेक्षांमुळे किंवा पद प्रतिष्ठेसाठी व्यक्त होऊ शकत नाहीत आणि आपल्या भावनांचा कोंडमारा करतात. त्यातून तणाव नैराश्य उत्पन्न होत असते. माणसाला मन आहे. मन आहे, म्हणून तो मानव आहे. मनाला भावना आहेत. त्या भावनांना साठवून न ठेवता त्या योग्यमार्गाने मोकळ्या होणे आवश्यक असते. त्यासाठी त्याला मनापासून खळखळून हसता आले पाहिजे. रडता आले पाहिजे. अध्यात्मात आपल्या भावनांवर विजय मिळवत त्यांना वाट मोकळी करून देण्याचेच शिकवले जाते. भावनेच्या आहारी जायचे नाही, तर भावनांना वाट करून मन भावनाविरहीत करायचे. प्रेमाची भावना निर्माण झाली, तर तुम्ही परमेश्वरावर करा, माणसांवर करा, प्राणीमात्रांवर करा. त्यामुळे मिळणारी प्रतिक्रिया ही तुमचा आनंद द्विगुणीत करते. आनंदातून समाधान प्राप्त होते. हीच ती श्रृंखला असते. या श्रृंखलेतून माणसाला जगायचे असते.आपल्याकडे सुभाषितात सांगितले आहे की, आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला । यया बद्धा:प्रधावन्ति मुक्तास्तिष्टन्ति पंगुवत॥ ही जी आशा नावाची बेडी आहे ती आपल्याला गुंतवून ठेवते. त्या बेडीतून मुक्त होणे हे सोपे नसते. त्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड द्यावी लागते. अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही, तर कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही ते अध्यात्म. त्यासाठी श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम।अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम॥ या नवविधा भक्तीचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. त्यातून आपल्याला मानसिक समाधान मिळते आणि नैराश्य दूर होते. ताणतणाव मुक्तीसाठी आत्महत्या हा उपाय नव्हे तर आत्म्याला, मनाला शांती देणारा असा भक्तिमार्ग निवडणे. ती भक्ती देवाचीच असली पाहिजे असे नाही, तर आपल्या कर्माशी कामाशी असली, तरी आपोआप तणाव दूर होतो. तणाव हा संचितामुळे होतो. साचल्यामुळे होतो. नालेसफाई जर वेळीच झाली, तर मुंबई तुंबणार नाही. तसेच प्रत्येकाची कामे वेळेवर झाली, तर मनातला गाळ साचणार नाही. हा मनातला गाळ दूर करण्यासाठी कर्म करणे आणि ते कर्म करण्यासाठी भक्तिमार्ग अवलंबणे याला अध्यात्म म्हणतात. प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच आत्महत्येचा विचार डोकावणार नाही. अरुण दातेंचे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गाणे अशावेळी ऐकले, तर आत्महत्येच्या मार्गावरून माणूस परत फिरेल.
मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा