बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

पवारांच्या पथ्यावर

1/9/2019
क्रिकेटमध्ये एखादा चुकीचा बॉल जसा निकाल बदलू शकतो किंवा चुकीचा फटका कॅच घेऊन बाद ठरू शकतो, तशीच काहीशी परिस्थिती राजकारणातही होत असते. फेब्रुवारी महिन्यात झालेला पुलवामा हल्ला भाजपला लोकसभेच्या वेळी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असताना तारक ठरला, तशीच राष्ट्रवादीला सध्या राज्यात प्रतिकूल परिस्थिती असताना ईडीची चौकशी आणि शरद पवारांवर गुन्हा नोंद होणे हे पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी या कारवाईचा राज्य सरकारशी काहीच संबंध नाही किंवा हे सूडाचे राजकारण नाही, असे स्पष्ट केले असले, तरी सर्वसामान्यांना हे पटवणे अवघड आहे. त्यामुळे अपराधीत्व सिद्ध करण्यापेक्षा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केलेली ही कारवाई आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार, हे नक्की.महाराष्ट्रात निवडणुका आहेत आणि नेमका हा विषय निघणं, यात लोकच काय ते समजतायंत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी इडीने गुन्हा दाखल केल्याच्या वृत्तानंतर बुधवारी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात शरद पवारांचं नाव आहे का? हे अद्याप स्पष्ट नाही, पण या प्रकरणातील चौकशीत आपण पूर्ण सहकार्य करू, असंही पवारांनी बुधवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. मी स्वत: शुक्रवारी दुपारी २ वाजता ईडीच्या आॅफिसला जाणार, असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे या घटनेचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी शरद पवार आता सज्ज झाले आहेत, हे नक्की. म्हणजे राज्य सरकारने ही कारवाई केली आहे अथवा नाही, हे जरी आपण सांगू शकत नसलो, तरी एक चुकीचा बॉल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाकडून टाकला आहे, त्यावर षटकार मारण्याचा प्रयत्न पवारांसारखा मुरब्बी राजकारणी करणार, यात शंका नाही. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या ईडीच्या या कारवाईविषयी शंका उपस्थित केली जात आहे. त्याचा फायदा उठवण्यास ते सज्ज झाले आहेत.ईडीचा राजकीय उपयोग सर्रास देशभरात केला जात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी शस्त्र म्हणून ईडीचा वापर केला जात आहे, असा आरोप या प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी जामिनावर सुटले असले, तरी त्यांना आपले शुद्धीकरण करण्याची ही संधी प्राप्त झालेली आहे, मात्र राज्य सरकार सूडानं वागतंय, कुणाला टार्गेट करतंय असं वाटणं चुकीचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा रोख ईडी आणि कारवाईच्या भीतीने झालेले पक्षप्रवेश हाच असेल, हे स्पष्ट होते. ही कारवाई सूडापोटी होतेय का? या खोलात मी जाऊ इच्छित नाही, असं संदिग्धपणे पवार म्हणाले. मला महाराष्ट्रात जो काही अभूतपूर्व प्रतिसाद लाभतोय, तो पाहिल्यानंतर सूडबुद्धीची शंका अनेकांना येते. माझ्याकडे त्याची माहिती नाही, असंही ते पुढे म्हणाले. त्यामुळे माझा नोहे, धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही या उक्तीप्रमाणे पवारांची वक्तव्ये आहेत. ही आगामी निवडणुकीची प्रचारनिती असेल. त्यामुळं ईडीची कारवाई खरंच सूडापोटी आहे का? आणि या पावलाचा राष्ट्रवादीला काही फायदा होईल का? असे प्रश्न आता चर्चेत आले आहेत. वास्तविक बँक घोटाळ्याच्या कारवाईची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झालीय, पण आता निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल झाल्यानं टायमिंग जुळून आलंय आणि ते राष्ट्रवादीला फायदेशीर ठरणार आहे. तसं पाहिलं तर ही कारवाई सूडापोटी नसेल, पण त्याचा अर्थ तसाच लावला जाईल. प्रत्येक जण या संस्थांचा उपयोग करून घेतच असतो. काँग्रेस सत्तेत असताना मोदी-शहांना खटल्यांना सामोरं जावं लागलं होतं, तो याचाच भाग होता. आता भाजपला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर ते या संस्थांचा वापर करत नसतील, असं म्हणता येणार नाही, पण ज्यांनी काही केलंच नसेल, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. या घोटाळ्याचा मुद्दा कोर्टासमोर होता. कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई झालीय. त्यामुळे सूडाचं राजकारण आहे, असं म्हणता येणार नाही, पण असा विचार सर्वजण करू शकत नाहीत, हेही तितकेच खरे आहे.संधी कशी साधायची, टायमिंग कसे साधायचे हे पवारांना चांगले कळते. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तापुढे झुकणं आम्हाला मान्य नाही. अर्थात, इतिहासाचा आधार घेण्याची महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना सवय आहे, पण याचा काही फायदा होईल, असं वाटत नाही. या वक्तव्यामुळे शरद पवार म्हणजे छत्रपती शिवराय होतील असे नाही. या कारवाईने महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय, असं म्हणण्यात अर्थ नाही. पवारांवर केला जात असेल, पण महाराष्ट्राला मोदी सरकारनं अनेक योजना दिल्यात. त्यामुळे अन्याय होतोय, असं वाटत नाही. तसंही राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय.मात्र गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर शरद पवारांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. या दौºयात त्यांना तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अचानक ही कारवाई झाली, असंही म्हटलं जातंय. मोठ्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे मागच्या फळीतील नेत्यांना पुढे येण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याचा ते फायदा घेणार, हे नक्की. तसं पाहिलं तर कृषी क्षेत्रात अनेक समस्या आहेत, लोकांमध्ये असंतोष आहे. अशा स्थितीत स्वत: शरद पवार प्रचारासाठी बाहेर पडल्यानं ते हमखास या गोष्टी सार्वजनिकरीत्या उपस्थित करतील. त्यामुळे अर्थात त्यांची भीती असणारच, पण हा विषय प्रचाराचा मुद्दा होणे हे दोघांनाही सरकार आणि विरोधकांना अडचणीचं आणि फायद्याचं ठरू शकतं. ते बुमरँगसारखे उलटूही शकते. ईडीच्या कारवाईचा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. राष्ट्रवादीला एक मुद्दा मिळालाय यामुळे. या दाखल केलेल्या गुन्ह्याचा राष्ट्रवादीनं मनात आणलं तर वापर करून घेऊ शकतात, सहानुभूतीत परावर्तित करू शकतात, पण राष्ट्रवादीच्या केडरमध्ये ती ताकदच दिसून येत नाही. त्यामुळे शरद पवारांचा हा एकाकी लढाही ठरू शकतो. तरीही या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस वापर करून घेत असेल, तर ते साहजिकच आहे. भाजप किंवा शिवसेना असती, तर त्यांनीही केला असता, पण सद्यस्थिती पाहता या कारवाईचा भावनिक वापर केला, तरी लोकांवर परिणाम होईल, असं वाटत नाही. शरद पवार, ईडीची नोटीस यापलीकडे महाराष्ट्राची निवडणूक आहे. आताच्या २० ते ३० या वयोगटातील मतदार अधिक आहेत. ते शरद पवार किंवा पूर्वीच्या पक्षांबद्दल भावनिकरीत्या जोडलेले नाहीत. त्यामुळे या कारवाईचा निवडणुकीत एक मुद्दा असेल, पण यावरच निवडणुकीचा निकाल ठरणार नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी केलेलं काम लक्षणीय आहे. ते कुणालाही अमान्य करता येणार नाही. तरीही या कारवाईचा मतांवर थोडाफार परिणाम होऊ शकतो, पण राष्ट्रवादी जिंकेल इतका काही परिणाम होईल, असं वाटत नाही, पण पवारांना आपली चांगली खेळी करण्यासाठी यानिमित्ताने नवे वातावरण तयार झाले आहे, हे नक्की. त्यामुळे गुन्हा नोंद झाल्यावर नोटीस येण्यापूर्वीच आपण ईडीला भेटणार आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. त्याप्रमाणे ते आज जातील, पण ती भेट ईडीपेक्षा निवडणुकीतील प्रचाराची असेल, हे नक्की.1 Sept 2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: