ठाकुर्ली येथे पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी नाताळच्या दिवशीच ब्लॉक घेण्यात आला होता. नाताळच्या निमित्ताने प्रवासी मोठ्या संख्येने बाहेर पडल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. रस्त्यांवरील वाहतूककोंडीत अडकून पडण्याचा त्रास वाचवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रवासाला पसंती दिली. यातच ब्लॉकमुळे कल्याण-डोंबिवलीदरम्यानची वाहतूक चार तास पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांना हाल सहन करावे लागले, मात्र यात प्रसारमाध्यमांनी विशेषत: टीव्ही चॅनेल्सनी रेल्वे प्रशासनाला दोषी ठरवून प्रवाशांच्या मुलाखती आणि कसे हाल झाले, याचे रसभरीत दर्शन घडवले असले, तरी त्यात काही अर्थ नाही. त्याची दुसरी बाजूही बघणे फार महत्त्वाचे आहे.डोंबिवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि पाच वर प्रचंड गर्दी जमली होती. अगदी मधल्या पुलावरही माणसं उभी होती. यातील काही निवडक लोक वगळता कोणीही रेल्वेला दोष देत नव्हते, परंतु माध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘काही तरी बोला हो, टीव्हीवर दिसाल’ असा आग्रह केल्यामुळे काही जण आपले कसे हाल होत आहेत, रेल्वेने कशी गैरसोय केली आहे, किती गर्दी आहे, वगैरे बोलून घेतले. त्यातल्या आपला भांग पाडून, चेहरा ठीकठाक करून उत्स्फूर्तपणे आपल्याला बोलता येत आहे, असे दाखवण्याचे प्रयत्न कोणी केले. यातूनच एखादे नवे नेतृत्व तयार होईल, असा आभास निर्माण करेपर्यंत काहींनी भाषणे ठोकली, पण कोणीही त्या कॅमेरामन, प्रतिनिधीला विचारले नाही की, इतक्या गर्दीत तू आणखी गर्दी करायला कशाला आला आहेस?
वास्तविक हा काही प्रॉब्लेम नव्हताच आणि प्रवाशांनीही त्याबाबत खंत, खेद वा तक्रार व्यक्त केलेली नव्हती, पण काही तरी नवीन दाखवण्याच्या हव्यासापोटी डोंबिवली स्थानकावरील समस्या, गर्दी, रेल्वेच्या कारभारावर टीका करणारी वृत्ते दाखवली आणि त्यांची किव कराविशी वाटली. रोज लोकलने प्रवास करणाºया प्रवाशांनी याबाबत खंतच व्यक्त केलेली नव्हती. प्रवाशांना चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी दुरुस्ती आणि देखभाल ही केलीच पाहिजे. ती नाही केली, तरी लोक तक्रारी करतील. दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. त्यांच्या जिवाशी खेळ नको म्हणून काही मिनिटे, काही तास दुरुस्तीच्या कामासाठी लोकल बंद ठेवावी लागली, तर त्यावर इतका तमाशा वाहिन्यांनी का करावा? ही बातमी कशी काय असू शकते? वास्तविक रेल्वे प्रशासनाकडून नियोजित ब्लॉक वेळेआधीच काम पूर्ण करण्यात आला. यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक ५० मिनिटे आधी आणि जलद मार्गावरील वाहतूक ३० मिनिटे आधी सुरू करण्यात आली. ब्लॉकबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता आणि त्याची माहिती प्रवाशांना अगोदरच दिली होती. त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.२५ डिसेंबर हा नाताळचा सार्वजनिक सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे नोकरदारांना सुट्टी असल्यामुळे त्यांची गैरसोय होणार नव्हती. साहजिकच दुरुस्तीसाठी हा दिवस रेल्वेने निवडला होता. प्रवाशांची त्याबाबत काहीही तक्रार नव्हती. कारण आज ही दुरुस्ती झाली, तर आपण दुसºया दिवशी वेळेवर कामावर जाऊ शकू, याचा विश्वास प्रवाशांना होता. त्यांनी हे मान्यही केले होते, परंतु काही हौशी लोकांनी पिकनीकला जाण्याचा, फिरायला जाण्याचा किंवा नाताळनिमित्त कुठे जाण्याचा प्लॅन केला होता. हे काही रेल्वेचे रोजचे प्रवासी नव्हते. त्यामुळे त्यांना याचे महत्त्वही माहिती नव्हते. ते स्टेशनवर आले आणि गर्दी होऊ लागली, पण त्यामुळे कोणाचेही नुकसान झालेले नव्हते. रात्रीच्या वेळी विशेषत: उत्तरेकडून मुंबईत येणाºया मेल-एक्स्प्रेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या काळात वाहतूक थांबवल्यास मेल-एक्स्प्रेसची लांबच लांब रांग लागते. सहा मार्ग रात्रीच्या वेळी बंद ठेवल्यास त्याचा थेट परिणाम दुसºया दिवशी सकाळच्या वेळेतील लोकल फेºयांवर होतो. यामुळे रात्रीच्या वेळी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचे टाळण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आणि बुधवारी दुपारीच तो घेतला. हे एक चांगले नियोजन होते. त्यामुळे त्यावर विनाकारण टीका करणे हे मूर्खपणाचे ठरेल, मात्र याचे गांभीर्य आमच्या वृत्तवाहिन्यांना का नव्हते? हे समजत नाही.
मुंबईतील जेवढ्या कंपन्या, आस्थापने, कार्यालये आहेत, त्यांनी आणि विशेषत: वृत्तवाहिन्यांनी अशावेळी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करायला हवे होते. ते नेहमी केले पाहिजे. कारण रेल्वे ही मुंबईची लाइफलाइन आहे. त्या लाइफलाइनलाही मोकळा श्वास कधी तरी घेता आला पाहिजे. अशा प्रकारचे जेव्हा दुरुस्ती, देखभालीचे काम असते, तेव्हा त्याची माहिती रेल्वेकडून मिळालेली असताना वाहिन्यांनी आपल्या प्रेक्षकांना खरे तर आवाहन करायला हवे आहे की, कृपया आज बाहेर पडू नका. रेल्वे स्थानकावर गर्दी करू नका. खूप गरज असेल, तरच बाहेर पडा. दुसरा काही पर्याय असेल, तर तो शोधा, असे आवाहन वाहिन्यांनी करणे गरजेचे आहे.नाताळनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी ब्लॉक घेण्यात आला. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी देखभाल-दुरुस्ती, पायाभूत सुविधा उभारणे ही कामे करण्यावर भर देण्यात येतो. ब्लॉकबाबत वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, फेसबुक, ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांवर प्रवाशांना पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या. तरीही प्रवाशांनी गर्दी केली असेल, तर त्यात रेल्वेचा काहीही दोष नाही.
परंतु रेल्वेला आपला श्वास मानणाºया नियमीत प्रवाशांनी मात्र याचाही आनंद घेतला. दोन-तीन तास लोकल बंद आहे ना? हरकत नाही. चला गप्पा मारत बसू. फोटोसेशन करू. इथल्या गर्दीचे फोटो फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर शेअर करू. सेल्फी काढू अशा विचाराने अनेकांनी फोटो काढले आणि ते शेअरही केले, पण आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा गैर आणि चुकीचा अर्थ काढण्याची प्रथा आहे, तसाच अर्थ हे फोटो पाहून लोकांनी काढला. खूप लोकांची गैरसोय झाली, म्हणून बोंबाबोंब सोशल मीडियावर सुरू झाली. हे फार वेदनादायी आहे, अशा अफवा कशा काय पसरवू शकतात? काहीही माहिती नसताना माणसं टीका कशी काय करू शकतात? ही प्रवृत्तीच देशाला घातक आहे. कोणतीही नवी घोषणा आली, विचार आला, सरकारचा निर्णय आला की, पहिल्यांदा त्यावर संशय व्यक्त करायचा, शंका घ्यायची आणि तो समजून न घेताच त्यावर टीका करायला सुरुवात करायची. लोकांना भडकवायचे, रस्त्यावर उतरायचे, आंदोलने छेडायची ही एक सामाजिक समस्या या देशात निर्माण झालेली आहे. हा जो फालतू वेळ आपण वाया घालवतो, कामाचे तास फालतू चर्चांमध्ये वाया घालवतो, तोच वेळ जर खरी माहिती प्राप्त करण्यात घालवला, तर सगळं सुरळीत चालेल, पण तसे होत नाही. या रोगावर काही तरी औषध शोधायची गरज आहे.कित्येक प्रवासी या गर्दीचा खरोखर आनंद घेत होते. आपल्याकडील वस्तूंची देवाण-घेवाण करत गप्पा मारत होते. प्रत्येकाजवळ असलेल्या खाण्याच्या पदार्थांची देवघेव होत होती. नाटक, सिनेमा, राजकारण यावर चर्चा करत होते. असा मोकळा वेळ एरवी गप्पा मारायला मिळतो कुठे? त्यामुळे मध्येच चहा पित होते. स्टेशनच्या बाहेर कुठे चांगला वडा मिळतो यावरही चर्चा रंगत होत्या. कोणाचीही तक्रार नव्हती. याचे कारण एकच होते, गेल्या वर्षी सीएसएमटी स्थानकाच्या शेजारचा पूल कोसळला, तेव्हा खूप चर्चा झाली होती. तो पूल पालिकेचा की, रेल्वेचा, यावर चर्चा झाल्या. त्याची वेळीच दुरुस्ती का झाली नाही? त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले होते का? इथपासून टीका झाली होती. त्यामुळे कोणताही अपघात होण्यापूर्वीच रेल्वे जर गर्डर टाकण्याचे, दुरुस्तीचे काम करते आहे, तर त्याला दोष देण्याची काहीच गरज नव्हती. प्रवाशांना कसलाही त्रास झालेला नव्हता. प्रवाशांनी परिस्थिती मान्य केली होती. आपणच चुकीच्या वेळी आलो आहोत, हे लक्षात घेतले होते. फक्त काही माध्यमांनी रेल्वेला बदनाम करून आपलं दळण दळण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना दाखवायला दुसरे काही नव्हते. ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. अशा घटनांकडे जरा सकारात्मकतेने पाहिले असते, तर रेल्वे किती आव्हाने स्वीकारते आणि कमी वेळेत कामे कशी पूर्ण करते, असे वृत्त दिसले असते. आपली जीवनवाहिनी सांभाळणाºया या लोकांनी सुट्टी न घेता काम केले होते, ते आपल्यासाठी. जरा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला नको का?
शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९
जरा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारा ना...!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा