मराठी रंगभूमीवर आणि मराठी, हिंदी चित्रपटांत असंख्य भूमिका अजरामर करणाºया डॉक्टर श्रीराम लागूंचे मंगळवारी रात्री निधन झाले. पेशाने डॉक्टर असूनही अभिनय क्षेत्रात नाव कमावलेल्या डॉक्टर लागूंनी जी भूमिका स्वीकारली, ती पूर्णपणे समजून घेतली. त्यामुळेच ती जिवंत झाली. अभिनयाला समर्पित अशा जीवनाची मंगळवारी अखेर झाली. त्यांचा अभिनय प्रवास आणि भूमिकेकडे पाहण्याचे कसब हे कोणत्याही अभिनेत्याला एखादी कार्यशाळा, मार्गदर्शन ठरेल, यात शंकाच नाही.डॉक्टर लागू हे कधीही लाऊड अभिनय करणारे नव्हते, पण त्यांच्या अनेक भूमिका या लाऊड झाल्या. एक उच्च कुळातील गोरा गोमटा आणि घाºया डोळ्यांचा नट म्हणजे त्याला टिपीकल भूमिका मिळतील अशी साधारण अपेक्षा असते, पण कोणत्याही भूमिकेत ते चपखल बसायचे, हेच त्यांच्या अभिनयाचे सामर्थ्य होते. ग्रामीण भाषेतील ग्रामीण टोन असलेली भूमिका असो, नाही तर एखादी सोफास्टिकेटेड भूमिका असो, त्यांनी ती तितकीच चपखलपणे केली, म्हणजे किरवंत या नाटकात एका क्रियाकर्म करणाºया ब्राह्मणाची भूमिका असो, चाणक्यची भूमिका असो अथवा सौतनमध्ये एका दलिताची भूमिका, इन्कारमध्ये चर्मकार असून, कष्टाने श्रीमंत झालेला उद्योजक या अगदी टोकाच्या भूमिका होत्या. अशाच या समरसून अभिनय करणाºया डॉक्टर लागूंच्या रंगभूमीवरच्या काही भूमिकांवरून यानिमित्ताने आठवणी जाग्या होतात.नटसम्राट म्हटले की, डॉक्टर श्रीराम लागूंशिवाय दुसरा चेहरा समोर येत नाही. ते नाटक डॉक्टर लागू खºया अर्थाने जगले होते. कारण तात्यासाहेब शिरवाडकरांनी हे नाटक त्यांच्यासाठीच लिहिले होते. त्यांनाच ते नाटक खºया अर्थाने समजले होते, म्हणून तर ते नटसम्राट म्हणून शोभले. हे नाटक समजायला तितके सोपे नाही. यातला कथाभाग काय हे कोणाला विचारले तर तो सांगतो की, मुलं विचारत नाहीत, मुलगी चोरीचा आळ घेते, म्हातारपण वाईट असते, समोरचे ताट द्यावे, पण बसायचा पाट देऊ नये, वगैरे, वगैरे, पण ही तर अत्यंत सामान्य कथा. म्हणजे अवतारसारखा चित्रपट असेल, बागबान असेल अशा सामान्य चित्रपटांच्या या कौटुंबिक कथा वर्षानुवर्षे नाटक, चित्रपटांतून येत असतात. ती दाखवण्यासाठी कोणतीही रिटायर्ड व्यक्ती चालते. त्यासाठी तात्यासाहेबांनी नटसम्राट निवडलेला नव्हता. त्यामुळेच नाटकातील हा कथाभाग जे शोधतात, त्यांना नाटक समजले नाही असेच म्हणावे लागेल. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या भूमिकेतून नाटकाच्या भूमिका केल्या, ते सगळे फसले आणि ज्यांना नाटक कळले असे डॉक्टर लागू नटसम्राट झाले. कोणताही नट, रंगभूमीवरचा कलाकार भूमिकेतून बाहेर येत नाही. तो वास्तव जीवनातही तसाच जगू पाहतो. लांब कशाला, राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी छत्रपतींची भूमिका काय केली, त्यांची एरव्ही भाषणाची, बोलण्याची भाषाही ऐतिहासिक, महाराजांसारखीच असते. तेच वास्तव पन्नास वर्षांपूर्वी लागूंनी जाणले होते. कलाकार आपल्या भूमिकेत अडकून पडतो. त्याचा रंगभूमीवर परकायाप्रवेश होतो, पण मनावर त्या भूमिकेने घातलेले गारुड त्याला बाजूला करता येत नाही. सतत शोकांतिकांमध्ये काम करणारा नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर हा आॅथेल्लो करतो, हेम्लेट जगतो. त्यांच्याप्रमाणेच आपल्याही आयुष्याची शोकांतिकाच होणार याच स्वप्नात वावरणारा तो नटसम्राट आहे. त्या भूमिकांसाठी आपले आयुष्य त्याने समर्पित केलेले आहे, म्हणून तो नटसम्राट आहे, हे या नाटकाचे मर्म डॉक्टरांना सापडले, म्हणून ते श्रेष्ठ नटसम्राट झाले. त्या तुलनेत अगदी नाना पाटेकर, मोहन जोशी, राजा गोसावी, मधुसुधन कोल्हटकर आदी सर्वजण या भूमिकेबाबत अपयशी ठरले. भूमिकेसाठी समर्पण महत्त्वाचे असते, हे डॉक्टरांनी दाखवून दिले. त्यासाठी ती समजून घ्यायची असते.गिधाडे या विजय तेंडुलकरांच्या नाटकातील डॉक्टरांची भूमिका इतकी भयानक होती की, त्यांच्यातील विकृत खलपुरुष डोक्यात जातो. हे डोक्यात जाणे त्यांच्या अभिनयाला दिलेली दाद असते, म्हणजे गर्भवती महिलेच्या पोटात गुडघ्याने लाथा मारून तिचा गर्भपात करणारा क्रूरकर्मा रंगमंचावर दिसतो, तेव्हा अंगावर शहारा येतो. माणसाच्या मनातील दुष्ट भावनांचे प्रकटीकरण त्यांनी समर्पित भावनेने केलेले आहे.तेंडुलकरांच्याच कन्यादान नाटकात तत्त्वज्ञान सांगणारा नाथ हा बोलणारा एक असतो, कृतीत वेगळाच असतो. आज आपण पाहतोच की, टीव्हीवर लाखो रुपयांची सुपारी घेऊन तत्त्वज्ञान सांगणारे, प्रवचन करणारे अध्यात्म, निस्वार्थीपणा, साधेपणाचे धडे देतात आणि त्यांची वागणूक प्रत्यक्षात कशी असते? हे कन्यादानमधील विचारवंत, राजकारणी या भूमिकेतून त्यांनी दाखवून दिलेले आहे. आपल्या विचारवंत वडिलांच्या अभ्यासू वक्तृत्वाने भारावून गेलेली मुलगी त्यांचे विचार आत्मसात करते. माणूस वाईट नसतो, वाईट असते ती प्रवृत्ती. ती दूर केली की, सगळी माणसे सारखीच. ती मुलगी एका दलित तरुणाशी विवाह करते आणि तिचा तो छळ करू लागतो. मारहाण करू लागतो. त्यामुळे माहेरी आलेल्या मुलीला तो स्वीकारत नाही. मी जातपात मानत नाही, याचे भांडवल केले आहे. माझी मुलगी मी दलिताला दिली आहे, हे सांगून तो मोठा झालेला आहे. आता तू परत आलीस, तर माझे काय होईल? हा स्वार्थ अतिशय शांतपणे डॉक्टर दाखवतात, तेव्हा प्रत्येकाला अंतर्मुख व्हावे लागते. माणूस वाईट नसतो, वाईट असते, ती प्रवृत्ती, पण माणसापासून प्रवृत्ती वेगळी करता येत नाही, हे सत्य लपवणारा ढोंगी विचारवंत डॉक्टरांनी रंगवून समाजातल्या विचारवंतांचाच बुरखा फाडला होता. या नाटकात सदाशिव अमरापूरकर, प्रिया तेंडुलकर आणि सुहास जोशी असे त्यांचे दिग्गज सहकलाकार होते. ते नाटक म्हणजे अभिनयाची जुगलबंदीच होती, पण लागूंनी ते नाटक एका वेगळ्याच उंचीवर नेले होते.प्रेमानंद गज्वी यांचे १९९० च्या दशकातील गाजलेले नाटक म्हणजे किरवंत. यातील सिद्धेश्वर शास्त्रीची भूमिका डॉक्टरांनी अतिशय जबरदस्त केली होती. त्यानंतर अनेकांनी ती करण्याचा प्रयत्न केला, पण लागूंसारखी ती झाली नाही. त्यामुळे ते नाटक पुढे थांबले. अंत्येष्ठीचे कर्म करणारा ब्राह्मण आणि शुभ कार्यातले कर्मकांड करणारे ब्राह्मण यांच्यातला संघर्ष दाखवताना डॉक्टर लागूंनी दाखवलेली घालमेल फार भयंकर आहे. केवळ स्मशानकर्म, अंत्येष्ठीचे कर्म करतो म्हणून शुभकार्यातील काम करणाºया ब्राह्मणांकडून होणारी अवहेलना, पत्नीला कुठेही महिलांमध्ये नसलेले स्थान, मुलाची शाळेत होणारी घुसमट, भाऊ वासुदेवाचे बंड आणि अंत्येष्ठी कर्म नाकारल्याने सनातन ब्राह्मणांनी आणलेला सावंतवाडीचा नवा किरवंत. यामुळे झालेली उपासमार, या दरिद्री संसाराच्या वातावरणात झालेली घुसमट ही डॉक्टर लागूंच्या अभिनयातून, रोमारोमांतून बाहेर पडायची. त्या भूमिकेचे करावे तेवढे कौतुक थोडेच. प्रेमानंद गज्वींचा विचार खºया अर्थाने पोहोचवण्याचे काम त्यांनी केले होते.ही वेगळ्या प्रकारची नाटके केली असली, तरी पठडीतल्या नाटकातही ते तितकेच चपखलपणे काम करत असत. साधारण समांतर किंवा वेगळ्या नाटकात काम करणारे व्यावसायिक रंगभूमीकडे वेगळ्या प्रकारे पाहतात, पण ते अभिनय आणि रंगभूमीवर प्रेम करणारे होते, म्हणूनच त्यांनी अग्निपंखमधली संस्थानिकाची मस्तवाल भूमिका असो वा मदतीसाठी थोडेच प्रयोग केलेल्या लग्नाच्या बेडीतील गोकर्ण असो, त्या विनोदी भूमिकेतही ते तितकेच समरसून काम करत, म्हणजे लग्नाची बेडीतील गोकर्ण आणि गार्गी या भूमिका शरद तळवलकर-लता थत्ते, राजा गोसावी-इंदु नावेलकर अशा विनोदी जोड्यांनी केलेल्या. काही वेळा मधुकर तोरडमल यांनीही ती भूमिका केलेली होती. त्यामुळे ती हास्याची कारंजी लागू उडवतील काय? अशी शंका सगळ्यांना होती, पण रोहिणी हट्टंगडींच्या साथीने त्यांनी त्या नाटकातील पंचेस काढले होते आणि यशस्वी नाटक करून दाखवले होते. पु. ल. देशपांडेंच्या सुंदर मी होणार नाटकातील डॉक्टरची भूमिकाही अत्यंत सहजपणे त्यांनी साकारली आहे. संस्थाने खालसा झाली, तरी डोक्यातून न गेलेल्या राजेशाही वाड्यातील माणसांची होणारी कुचंबणा, त्या राजघराण्याचे असलेले फॅमिली डॉक्टर ही भूमिका लागूंनी अत्यंत सहजपणे केलेली आहे. हे शक्य झाले, ते त्यांनी भूमिकेला स्वत:ला सपर्पित केल्यामुळेच. साक्रेटीसचे तत्त्वज्ञान समजणे आणि समजावून सांगणे हे तितकेसे सोपे नाही, पण सूर्य पाहिलेला माणूसमधून त्यांनी तेही सोपेपणाने उलगडून दाखवले होते. त्यांनी अनेक नाटके केली. त्यातील प्रत्येक भूमिका वेगळी होती, पण त्या प्रत्येक भूमिकेशी ते अत्यंत प्रामाणिक राहिले. समर्पणाच्या भावनेने त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती, अशा समर्पित आयुष्याची अखेर मंगळवारी झाली. त्या नटसम्राटाला भावपूर्ण आदरांजली!
गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९
समर्पित अभिनेता डॉ. श्रीराम लागू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा