रविवार, २९ डिसेंबर, २०१९

राजा नावाचा गोसावी



मराठी रंगभूमीवर विनोदाचा बादशहा असा सर्वात प्रथम नावलौकिक कमावलेला अभिनेता म्हणजे राजा गोसावी. १९५० ते १९६० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी व्यापून टाकणारा हा हीरो रंगभूमीवर मनापासून रमला तो विनोदी नट म्हणूनच. त्यामुळे त्यांनी सादर केलेल्या नाटकांपैकी काही भूमिका या केवळ आणि केवळ त्यांच्यासाठीच होत्या असे वाटते.राजा गोसावी हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. राजा गोसावींना विनोदाचा बादशहा म्हणत. त्याचप्रमाणे ते मराठीचे डॅनी के म्हणूनही ओळखले जात होते. चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत प्रचंड नाव कमावलेल्या या कलाकाराने संघर्षही भरपूर केलेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. राजा गोसावी हे मास्टर विनायकांच्या घरी घरगड्याचे काम करीत. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्यांनी आधी आॅफिसबॉयचे व नंतर सुतारकाम केले पुढे मेकअप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करत ते एक्स्ट्रा नट बनले. पुढे दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते प्रॉम्प्टर झाले. त्यानंतर त्यांना भावबंधन या नाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली. तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका होती. त्यानंतर ते पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात चित्रपटाची तिकीटबारीवर तिकिटे विकायचे काम करू लागले. त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट अखेर जमलं, आणि लाखाची गोष्ट जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागले, तेव्हाही राजा गोसावींनी आपल्याच चित्रपटाची तिकिटे विकली होती. आपल्याच चित्रपटाची तिकिटे विकणारे ते पहिलेच मराठी कलाकार होते. त्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलका कुबल यांनी मागच्या दशकात तिकीट विक्रीचा उपक्रम केला होता. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असताना अलका कुबल यांनी राजा गोसावींचा कित्ता गिरवला होता.राजा गोसावी यांचे शिक्षण जेमतेम मराठी चौथीपर्यंत झाले असले, तरी त्यांच्या शब्दांत ते बी. ए. (बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातीला कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि नटसम्राट म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १०० हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. भावबंधनमधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात धुंडीराजची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत.मराठी सिनेमात निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली असली, तरी ती पुढे समर्थपणे चालवली राजा गोसावी यांनी. राजा गोसावी खºया अर्थाने चतुरस्त्र कलावंत होते. त्यांनी रंगविलेला मध्यमवर्गीय/शहरी नायक रसिकांना मनापासून भावला. त्यांच्या चित्रपटाची घोडदौड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच सुरू होती. त्यांचा बोलबाला एवढा होता की, १९५८ मध्ये पुण्याच्या बाबुराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत राजा गोसावीची गोष्ट हा चित्रपट काढला होता. साठच्या दशकात राजा गोसावी यांनी शरद तळवलकर, दामुअण्णा मालवणकर यांच्यासमवेत अनेकानेक उत्तमोत्तम सिनेमे दिले. त्यांच्या अभिनयातील विनोदात निरागसता आणि नैसर्गिकता होती. रंगभूमी हेच आपले जीवन मानणाºया राजा गोसावी यांना मेकअपच्या खोलीतच चेहºयाला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.राजा गोसावींनी केलेल्या नाटकांतील काही भूमिकांमध्ये त्यांनी साकारलेला एकच प्यालामधल तळीराम हा फारच भारी होता. ही भूमिका अनेकांनी केली. शरद तळवलकारांनी केली, काही प्रयोगात सुधाकरचा कंटाळा आल्यामुळे चित्तरंजन कोल्हटकरांनीही तळीराम रंगवला होता. पण राजा गोसावींचा तळीराम हा सर्वात वेगळा होता.करायला गेलो एक या नाटकातील हरिभाऊ हर्षे ही भूमिका साक्षात राजा गोसावींसाठी लिहिली होती असेच वाटते. अरविंद गोखले यांच्या या नाटकात राजा गोसावी, अरविंद गोखले, शरद तळवलकर यांची जुगलबंदी असायची. या नाटकावरून सगळीकडे बोंबाबोंब हा चित्रपट काढला होता, तेव्हा त्यातील राजाभाऊंची भूमिका ही अशोक सराफ यांनी केली होती. अरविंद गोखले हे आचार्य अत्रे यांना गुरुस्थानी मानत. अत्र्यांचे गुरू गडकरी होते. विशेष म्हणजे राम गणेश गडकरींचा एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, आचार्य अत्रे यांचा भ्रमाचा भोपळा, कवडीचुंबक, लग्नाची बेडी आणि नंतर अरविंद गोखले यांच्या करायला गेलो एक या नाटकात अशा गुरू शिष्य लेखक परंपरेला सजवण्याचे काम राजा गोसावींनी केले होते.आचार्य अत्रे यांच्या कवडीचुंबक नाटकातील पंपूशेठ हा ज्या धमालपणे राजा गोसावींनी रंगवला होता त्याला तोडच नव्हती. पंपूशेठ हे नाटक लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर राजा गोसावींच होते की काय असेच वाटल्याशिवाय रहात नाही. पण आपल्या अंगविक्षेप आणि मुळातच आचार्य अंत्रेंची कुठेही अ‍ॅडीशन घेण्याची गरज नसलेली भाषा आणि विनोद हे राजा गोसावींनी जबरदस्त साकारले होते.वसंत सबनीस यांच्या घरोघरी हीच बोंब या नाटकात त्यांनी दाजिबा ही भूमिका केली होती. ही भूमिका राजा गोसावी आणि शरद तळवलकर अशी अलटून पालटून केली होती. दोघेही एकाचवेळी हे प्रयोग करत होते. विशेष म्हणजे दोघांबरोबर राधाकाकूची भूमिका ही लता थत्तेच करत होत्या.१९७० च्या दशकात मधुसुधन कालेलकर यांचे आलेले नाटक म्हणजे डार्लिंग डार्लिंग. यात लफडेबाज बायकोला शेंडी लावणाºया प्रभाकरची भूमिका त्यांनी केली होती. त्या नाटकात अशोक सराफ, मच्छिंद्र कांबळी, प्रकाश इनामदार अशी जुगलबंदी होती. पण राजा गोसावी यांचे वर्चस्व नाटकात हीरो असल्यामुळे कायम होतेच. त्यात जोडीला त्यांची खास नायिका नयना आपटे होती. त्या काळात राजा गोसावी म्हटले की सोबत नयना आपटे असणारच असे समीकरण होते.पु. ल. देशपांडे यांचे तुझे आहे तुजपाशी हे नाटकही राजा गोसावींनी केले होते. त्यात श्याम ही भूमिका ते साकारत होते. मुळात ही भूमिका डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी केली होती. त्यामुळे राजा गोसावींना या भूमिकेवर आपली छाप पाडता आली नव्हती. राजा गोसावींच्या फसलेल्या भूमिकांमध्ये या भूमिकेचा समावेश होतो. अर्थात बदली कलाकार म्हणून किंवा रिप्लेसमेंट म्हणून आल्यावर हा फटका सर्वांनाच बसतो. पण तरीही त्यांनी उतरत्या काळात अशाही भूमिका केल्या होत्या. तोच प्रकार नटसम्राट नाटकातील गणपतराव बेलवलकरच्या भूमिकेबाबत म्हणता येईल. ही भूमिका त्यांनी पेलवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे विनोदी अभिनेता म्हणून बघायची सवय प्रेक्षकांना लागली असल्यामुळे गंभीर नाटकाचे त्यांनी प्रहसन केले असे झाले. ही त्यांच्या आयुष्यातील शोकांतिका होती. विनोदी कलाकाराला हे भान फार सांभाळावे लागते.राजा गोसावींनी आपल्या विनोदी शैलीचा कस लावला तो सौजन्याची ऐशी तैशी या नाटकातील नाना बेरके या भूमिकेत. भांडखोर कुटुंब, वल्ली मुलं आणि शेजाºयांचा त्रास या परिस्थितीत सौजन्याचा पाळलेला सप्ताह आणि त्याला दिलेल्या वाटाण्याच्या अक्षता हा अगदी पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा प्रयोग होता. लता थत्ते, प्रकाश इनामदार, संजिवनी बिडकर आणि अविनाश खर्शिकर यांच्याबरोबर त्यांची अक्षरश: जुगलबंदी पाहण्यासारखी होती. त्यांच्या हातवारे आणि ऐनवेळी काय करतील या प्रकारामुळे कित्येकवेळा सहकलाकारांना रंगभूमिवरही हसू आवरायचे नाही. मग प्रेक्षकांची काय कथा?नवरा माझ्या मुठीत गं, नवºयाला जेव्हा जाग येते, वरचा मजला रिकामा या नाटकांतून त्यांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवण्याचे काम केले. लग्नाची बेडी या नाटकातला अवधूत आणि गोकर्ण त्यांनी रंगवला. त्यात त्यांनी घालून दिलेला गोकर्णचा पायंडा नंतर त्यांचा सख्खा भाऊ बाळ गोसावी यांनी सांभाळला होता. कित्येक वर्ष लग्नाची बेडीत ही जोडगोळी होती.अभिनयाचा तो राजा होता. विनोदाचा बादशहा होता. पण जाताना मात्र एखाद्या गोसाव्यासारखाच गेला. आपल्या मुलाखतीत त्यांना अनेकवेळा प्रश्न विचारला जायचा की तुम्ही इतकी वर्ष इथे काम करून काय कमावलं? तर त्यावर त्यांचे उत्तर असायचे की योगायोगानं कमावलं आणि भोगाभोगानं गमावलं. पण जनतेच्या प्रेमामुळे या मायबाप प्रेक्षकांच्या जनता बँकेच्या खात्यात लाखो हशा आणि टाळ्यांचा बॅलन्स आहे, तीच माझी कमाई आहे. अशा प्रकारे राजा नावाचा हा गोसावी मराठी रंगभूमीवर विनोदाची बादशाही कायम आपल्या नावावर नोंदवून गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: