बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

खरंच आहे का भीतीचे वातावरण?


भारतातील प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशातील सध्याच्या स्थितीवरून काही तिखट प्रश्न विचारले आहेत. देशात सध्या भीतीचे वातावरण बनले असून, लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. एका चर्चात्मक कार्यक्रमामध्ये बजाज यांनी आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे उपस्थित होते, पण यामुळे सामान्यांना प्रश्न आहे की, खरंच भीतीचं वातावरण आहे का? ही भीती नेमकी कोणाला आहे? कशाची आहे? ज्याची भीती आहे, त्याबाबत फारसं कोणीच बोलत नाही, याचेही आश्चर्य वाटते.राहुल बजाज म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही? लोकांना यूपीएच्या सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. यूपीए-२च्या कार्यकाळात आम्ही कोणावरही टीका करू शकत होतो. पण अशी परिस्थिती आहे, असे वाटण्याचे कारण नाही. बजाज यांची ही भीती अनावश्यक आहे. कारण असे असते, तर सोशल मीडियावरून या सरकारवर जी टीका सातत्याने होते ती झाली नसती. निवडणुकांतही सरकारला जो कौल मिळाला तो मिळाला नसता. सरकारला प्रश्न विचारायची भीती वाटायचे काहीच कारण नाही. तशा प्रकारची कोणतीही दहशत आहे, असा समज हेतुपुरस्सर पसरवला जात आहे, हे मात्र नक्की. आज देशात कोणी सरकारची स्तुती केली किंवा कामाचे कौतुक केले की, त्याला भक्त म्हटले जाते. त्याहीपुढे जाऊन त्याला अंधभक्त म्हटले जाते. त्यामुळे अशा भक्तांवर टीका करणाºयांवर बाकीचे भक्त किंवा समर्थक तुटून पडतात आणि खालच्या पातळीवरचे युद्ध सुरू होते. सोशल मीडियावर हा धुडघूस सातत्याने पाहायला मिळत असतो. म्हणूनच जर भीतीचे वातावरण असते, तर अशा प्रकारची टीका सोशल मीडियावरूनही करता आली नसती. काही लोकांना सरकारशी संवाद साधता येत नाही, त्यामुळे त्यांचे प्रश्न पोहोचत नसावेत. हे प्रश्न त्यांच्यामुळे न पोहोचल्यामुळे भीतीचे वातावरण आहे, असा समज पसरवला जातो. प्रत्यक्षात ती एक कम्युनिकेशन गॅप आहे, असेच वाटते. हे लक्षात न घेता सरकारची भीती वाटते, असे बजाज म्हणतात त्यावेळी आश्चर्य वाटते.अर्थात राहुल बजाज यांच्या या प्रश्नांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लगेचच उत्तर दिले. अमित शहा म्हणाले, देशात कुठल्याही प्रकारच्या भीतीचे वातावरण नाही. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. मोदी सरकारवर माध्यमांमधून कायमच टीका होत राहिली आहे, तरीही तुम्ही म्हणत असाल की, देशात असे वातावरण आहे, तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत आहे. कोणती टीका होत असेल, तर त्याला गांभीर्याने घेत आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करीत असतो. ही दखल या संवादातच अमित शहा यांनी घेतली आहे. दहशत किंवा भीतीचे वातावरण असतेच, तर राहुल बजाज असे थेट जाहिरसभेत बोलू शकले नसते, हेच भीतीचे वातावरण नसल्याचे उदाहरण म्हणता येईल.भीतीचे वातावरण नेमके आहे कुठे, हेही लक्षात घेतले पाहिजे. चारच दिवसांपूर्वी हैदराबाद येथील एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आले. त्यामुळे साहजीकच अशा प्रकारचे भीतीचे वातावरण आहे. हे वातावरण आजच नाही, तर गेली दहा वर्ष आहे. १६ डिसेंबर, २०१२ ला दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभर अशी मालिकाच तयार झाली. मुंबईत, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे सामूहिक बलात्कार प्रकरणांचे प्रकार होऊ लागले. या भीतीबाबतही बोलले पाहिजेच ना? इथे सरकारला प्रश्न विचारण्याचा प्रश्न नाही, पण सरकारने अशा लोकांना ढिले सोडल्यामुळे गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढली आहे. असे प्रकार वाढत चालले आहेत. राहुल बजाज यांनी यावरही बोलले असते, तर अधिक बरे झाले असते. गृहमंत्री अमित शहा सीमेवरच्या शत्रूला, पाकला चांगले पुरून उरत आहेत, पण त्यांनी या देशात बसलेल्या अशा शत्रूंना, राक्षसांना, पशूंनाही धडा शिकवावा म्हणजे हे भीतीचे वातावरण संपुष्टात येईल. २०१२ चे दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण यूपीए-२ सरकारला महागात पडले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला महागात पडले होते. तशी परिस्थिती एनडीए किंवा मोदी २ वर येऊ नये ही अपेक्षा आहे. राहुल बजाज यांनी याबाबत बोलले असते, तर बरे झाले असते.काही विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वेगळा विचार करणारे प्रसिद्धीच्या वलयात असणारे लोक सरकारवर टीका करतात. सरकारकडून त्याला कधी उत्तर दिले जाते कधी नाही, मग पुरस्कारवापसीसारखे प्रकार होतात. हे प्रकार अत्यंत निर्भयपणे होत असतात. तरीही सरकारवर टीका केली जाते. ही केवळ पूर्वग्रहदूषित भावनेतूच. यामध्ये काही वाहिन्यांचे पत्रकार, नसरुद्दीन शाहसारखे अभिनेते, स्वत:ला डावे समजणारे आणि पुरोगामी म्हणवणारे काही मुखवटे सरकारवर सातत्याने टीका करत असतात. ही टीका करत असताना कसलीही भीती मनात नसते. त्यामुळे प्रश्न पडतो की, या देशात खरंच भीतीचे वातावरण आहे का?उद्योग जगताला नेमकी कसली भीती वाटते आहे? सरकारवर टीका करावीशी का वाटते हे त्यांनी माध्यमांपुढे येऊन उघडपणे सांगितले पाहिजे. आज संपूर्ण उद्योगापुढे मंदीचे सावट आहे. आर्थिक संकट समोर असल्यामुळे भीती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत सरकारने काय पावले उचलली पाहिजेत याबाबत देशातील टाटा, बिर्ला, अंबानी, बजाज, अदानी अशा कुटुंबीयांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. चर्चा करण्याची गरज असताना त्यांच्या मनात भीती आहे, असे का बोलले जात आहे? केवळ एक कोणीतरी बोलला देशात भीतीचे वातावरण आहे आणि त्याचीच री ओढली जात असेल, तर ते चुकीचे आहे. आभाळ पडलं पळा पळा असे सशासारखे एक पळाला, दुसरा पळाला असे राहुल बजाज यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींनी करू नये. त्यांना आणि उद्योग जगतातील लोकांना कसली भीती वाटते, ते त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. देशात भीतीचे वातावरण आहे, ते गुन्हेगारी जगताचे आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण उद्योगात सरकारची कसली दहशत आहे, भीती आहे हे स्पष्ट करायला पाहिजे. त्यासाठी माध्यमांपुढे आले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: