पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ११ वर्षे पूर्ण केली आहेत आणि यावेळी देशभरात भाजपकडून मोदी सरकारच्या कामगिरीचा जोरदार प्रचार केला जात आहे. या क्रमाने पत्रकार परिषदांव्यतिरिक्त भाजप नेते समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचत आहेत आणि मोदी सरकारच्या जनकल्याणकारी धोरणांवर चर्चा करत आहेत. असाच एक कार्यक्रम भाजपने दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केला होता. ज्यामध्ये देशभरातून डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्याशी उघडपणे संवाद साधला. हा खरोखरच एक कार्यक्रम होता, ज्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते सर्व प्रश्नांची उत्तरे न डगमगता देत होते. जर पाहिले तर, आजच्या युगात डिजिटल आणि सोशल मीडिया ही सर्वात मोठी शक्ती बनली आहे, म्हणून या व्यासपीठाच्या तज्ज्ञांशी भाजपच्या शीर्ष नेत्यांचा थेट संबंध हादेखील एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि पक्षाचे सर्व राष्ट्रीय प्रवक्ते कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अश्विनी वैष्णव यांनी देशात व्यापक बदल घडवून आणणाºया आणि विकसित भारताचा पाया रचणाºया प्रमुख उपक्रमांचा उल्लेख केला. अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सादरीकरणाद्वारे विरोधकांकडून वारंवार उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली, ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आणि गोंधळाचे वातावरण दूर झाले.
डिजिटल मीडिया प्रतिनिधींशी थेट संवाद साधताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कबूल केले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष अतिआत्मविश्वासाला बळी पडला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कबूल केले की, ‘अबकी बार ४०० पार’ या घोषणेचा विपरीत परिणाम होत आहे, याकडे त्यांनी योग्य लक्ष दिले नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी असेही कबूल केले की, काँग्रेस आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थांनी खालच्या पातळीवर पसरवलेल्या आरक्षणाला विरोध हा भ्रम उशिरा लक्षात आला आणि त्यांनी कारवाई केली, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पक्षाच्या नेत्यांनीही कबूल केले की, अनेक ठिकाणी उमेदवारांच्या निवडीत त्रुटी होत्या. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, सतत विजय मिळवल्यानंतर असा अतिआत्मविश्वास वरपासून खालपर्यंत पसरतो, ज्याचे दुष्परिणाम दिसून आले. पक्षाच्या नेत्यांनी कबूल केले की, अनेकदा भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची चुकीची विधाने पक्षाला लाजिरवाणी ठरतात, विशेषत: निवडणुकीदरम्यान दिलेली वादग्रस्त विधाने अधिक अस्वस्थ करणारी परिस्थिती निर्माण करतात. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, आता ते उमेदवारांच्या निवडीचे निकष आणखी कठोर करत आहेत. अशा चुका कबूल करण्याची, उघडपणे मांडण्याची हिंमत कोणत्या पक्षात आहे? बाकीचे पक्ष आपल्या अपयशाचे खापर आपल्या नाकर्तेपणावर न फोडता ईव्हीएमवर फोडतील, निवडणूक आयोगावर फोडतील. जोपर्यंत विरोधक असे करत राहतील, तोपर्यंत ते पुढे कधीच जाणार नाहीत. भाजप चुकांमधून धडा घेतो आणि पुढे जातो, हे तंत्र सगळ्या पक्षांना जमले तर बरे होईल.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी असेही म्हटले की, मोदी सरकारचे यश असंख्य, अफाट आहे आणि विरोधी पक्ष आतापर्यंत आमच्या एकाही कामगिरीला नाकारू शकलेले नाहीत. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, विरोधी पक्ष केवळ परराष्ट्र बाबींमध्ये जाऊन देशांतर्गत राजकारणात गोंधळ निर्माण करू इच्छितात, परंतु जनता ते स्वीकारत नाही. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की भाजप आणि संघ यांच्यात कोणताही मतभेद नाही आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा सोडवण्यात आला आहे. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर, वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, संघ आणि पक्षामध्ये कोणताही मतभेद नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता नाकारत पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, नजीकच्या भविष्यात अशी शक्यता नाही. राहुल गांधी यांनी संवैधानिक संस्थांवर केलेल्या आरोपांवर, पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, जनता त्यांच्या आरोपांवर नाही तर आपल्या संस्थांवर विश्वास ठेवते. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, जनतेमध्ये केलेल्या सर्व सर्वेक्षणांवरून असे दिसून येते की, राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आजही अव्वल आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले की, नितीश कुमार हे एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. त्यांनी सांगितले की, नितीश कुमार यांचे मत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की बिहारमध्ये स्पर्धा समान असल्याचे दिसते. आपण पुढे कसे जायचे ते आपल्याला पाहावे लागेल. यावेळी एका प्रश्नांच्या उत्तरात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, मोदी-नितीश जोडीची कोणीही बरोबरी करू शकत नसल्याने बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी असेही कबूल केले की बंगालमध्ये त्यांचे प्रभावी नेतृत्व नाही आणि गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने तेथे अनेक चुका केल्या आहेत. पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही आमच्या चुकांमधून शिकून आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याची तयारी करत आहोत. याशिवाय, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्या प्रकारे सर्व राजकीय प्रश्नांची उत्तरे दिली, त्यावरून असे दिसून आले की भाजप हायकमांडने चुकांमधून धडा घेतला आहे. हे कबूल करण्याचे धाडस फार महत्त्वाचे असते, आज ते फक्त भाजपमध्येच आहे, म्हणून तो पक्ष पुढे जात आहे. अन्य कोणताही पक्ष आपल्या चुका कबूल करत नाही, त्यामुळे ते अधिकाधिक चुका करत जातात.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा